जयंत सहस्रबुद्धे

‘राष्ट्राय स्वाहा’ या तत्वाने संघकार्य पुढे नेणारा संन्यासी योद्धा

    11-Jun-2023
Total Views | 86
Jayant Sahasrabudhe passes away


जयंत सहस्रबुद्धे गेल्याची बातमी वाचून बसलेला धक्का, हा माझ्यासाठी साधा धक्का नाही. कारण, ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव माझ्या विचारसरणीवर आहे, ती व्यक्ती या जगात नाही, यावर विश्वास ठेवणे वेदनादायक आहे. आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती भेटत असतात, पण आपल्या आयुष्याला समृद्ध करणार्‍या त्यातील काही व्यक्तींना आपण सदैव गुरुस्थानी पाहतो. १९८० ते १९९९ या काळात संघकार्य करताना अनेक विदूषींचा सहवास लाभला. त्यात प्रामुख्याने संघ प्रचारक होते होते. १९९०-९२ या काळात जयंतजी वांद्रे ते सांताक्रुझ या शांतीनगर भागात प्रचारक होते. मी वांद्रे पूर्वमधील गांधीनगर सायंशाखेचा कार्यवाह होतो.


 जयंतजी ‘भाभा अणुसंशोधन केंद्रा’त वैज्ञानिक म्हणून कार्यरत होते आणि त्या पदाचा त्याग करून १९८७ पासून त्यांनी स्वत:ला संघकार्यास वाहून घेतले होते. हे समजल्यावर त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. पुढे त्यांच्या सहवासात जे शिकायला मिळाले, ते अतुलनीय आहे. एकदा त्यांच्या रात्रीच्या भोजनाची व्यवस्था करण्याची माझ्याकडे जबाबदारी होती आणि मी नेमका विसरून गेलो. पण, जयंतजींना त्या रात्री माझी चूक लक्षात आल्यावर मंद स्मित हास्य करून कसला तरी उपास असल्याचे कारण पुढे करून ते निघून गेले. अपराधीपणाच्या भावनेत त्या रात्री मी संघ प्रचारकांच्या जगण्यातील कण्टकाकीर्ण मार्गाचा विचार करत राहिलो. जयंतजी प्रचारक असताना त्यांच्या बोलण्यातली सात्विकता, संयम आणि धीरोदात्त दृष्टी मला ‘प्रचारक’ या संकल्पनेवर विचार करायला भाग पाडत होती.

 
 त्याचा परिणाम म्हणून मी १९९२ साली रेगड जिल्ह्यात रोहा तालुक्यात विस्तारक म्हणून अनुभव घेतला. प्रचारकही जायची इच्छा होती, पण सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून पदवी झाल्यानंतर पुढे १९९६ साली 'Film and TV Institute of India' मध्ये प्रवेश मिळाल्यामुळे जयंतजींनी मला तो अभ्यासक्रम पूर्ण करून झाल्यानंतर प्रचारक निघायचे की नाही, त्याचा विचार करायला सांगितले. मुख्य म्हणजे, इच्छुक म्हणून मला त्याचवर्षी मॉरिशसमध्ये प्रचारक म्हणून जाण्याची संधी होती. कोणतेही पाऊल उचलण्याच्या आधी आपली वैचारिक पातळी निर्णयक्षम होणे आवश्यक असते. जयंतजींचा हाच वैज्ञानिक दृष्टिकोन मला महत्त्वाचा वाटतो. पुढे म्यानमारमधील बौद्ध धर्माच्या इतिहासाच्या प्रचाराचे कार्य करणारे प्रचारक स्व. धीराजी यांच्यावर माहितीपट करण्याच्या योगाने जयंतजी आणि धीराजी यांच्यासोबत यशवंत कार्यालयात बर्‍याच बैठका झाल्या.
 
त्यावेळेस जयंतजी ८२ वर्षांच्या धीराजींसमोर एखादा बालस्वयंसेवक बसावा तसे धीराजींचे बोलणे ऐकत असत. याच काळात माझ्या मनात संघ प्रचारकावर एका आंतररराष्ट्रीय स्तरावर डॉक्युमेंटरी फिल्म तयार करण्याचा विचार घोळू लागला. नवीन पिढीला संघ प्रचारकांचे आयुष्य कसे होते, त्यांनी कशा प्रकारे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघकार्य पुढे नेले, याचे दस्तावेजीकरण महत्त्वाचे वाटले. संघातील काही अधिकार्‍यांशी मी या विषयावर बोललोसुद्धा, पण म्हणावा तसा मला प्रतिसाद मिळाला नाही. २०१८च्या फेब्रुवारीत सुदैवाने जयंतजींना मुंबई विद्यापीठात एका भारतीय वैज्ञानिक परिषदेच्या परिसंवादाचे उद्घाटन करण्यास बोलावले होते. ती संधी साधून मी जयंतजींना आवर्जून भेटलो आणि संघ प्रचारकांच्या माहितीपटाची संकल्पना त्यांना सांगितली.

त्यावर त्यांनी माझ्या कल्पनेला अतिशय गांभीर्याने घेऊन मला त्यावर संपूर्ण प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. माझ्या संकल्पनेस जयंत सहस्रबुद्धेंसारख्या प्रचारकाने मान्यता दिली, ही माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण गोष्ट होती.अशा या अतिशय उच्च अभिधारणा असलेल्या अध्यातिक अनुभूतीच्या वैज्ञानिकाचे अपघाती निधन ही राष्ट्रीय हानी आहे. जयंतजी, संघ प्रचारकाच्या आयुष्याचे यज्ञकार्य कसे चालते, याविषयीच्या चित्रपटाची सुरुवात तुमच्यापासूनच करायची होती....पण, त्या आधीच आपणा आमच्यातून निघून गेलात...मी आपणास सांगितलेला संकल्प नक्की पूर्ण करीन. कारण, पुढच्या पिढीला कळले पाहिजे - जयंत सहस्रबुद्धेंसारखे ‘राष्ट्राय स्वाहा’ या तत्वाने संघकार्य पुढे घेऊन जाणारे संन्यासी योद्धे होते.


-बापू सर्वगोड

(FTII) लेखक/दिग्दर्शक)




 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121