महिला आणि बालके, सुधारगृहातील मुलांसाठी काम करणार्या कालिंदी हिंगे यांना नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या ‘सावित्रीबाई फुले पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. त्यांच्या जीवनकार्याचा हा आदर्श प्रवास...
कालिंदी देविदास हिंगे यांचा जन्म पुण्यात झाला. नाशिक शिक्षण मंडळाचे संस्थापक सदस्य ल. पा. सोमण यांच्या त्या कन्या. त्यांचे शिक्षण वडिलांच्या शाळेत म्हणजे आदर्श विद्यालयात झाले. नंतर नाशिकच्या पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालयातून त्यांनी शालांत परीक्षा उत्तीर्ण केली. पुढे एचपीटी महाविद्यालयामध्ये ‘बीए’ आणि नंतर पुणे विद्यापीठातून हिंदी विषय घेऊन नोकरी करत करत ‘एम.ए’ही पूर्ण केले. शिक्षण घेतानाच त्या ‘सेंट फिनोमेना’ आणि शारदा मंदिर शाळेत त्या अध्यापन करत. पुढे ‘मविप्र’ संस्थेतून त्यांनी ’बीएड’ पूर्ण केले.
दरम्यान, मालेगाव येथील अॅड. देविदास हिंगे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. १९६५ मध्ये त्या रुं. झुं काकानी कन्या विद्यालय किल्ला येथे शिक्षिका म्हणून रूजू झाल्या. इतिहास, हिंदी, मराठी हे विषय त्या अत्यंत तन्मयतेने, रंजक पद्धतीची जोड देऊन शिकवत. साहजिकच त्यात विद्यार्थीप्रिय शिक्षिका झाल्या. हुशार, होतकरू मुले केवळ परिस्थितीअभावी शिक्षण घेऊन शकत नाही याची त्यांना खंत वाटे. आपल्या शेतात काम करणार्या मजुराला होतकरू मुलाला त्यांनी आपल्या घरी नेले आणि शिक्षण देण्यासह त्याचा सांभाळही केला. आज हाच मुलगा ‘आयटीआय’ करून शासकीय सेवेत नोकरी करत आहे. संजय कारभारी वाघ या विद्यार्थ्यालाही त्यांनी शिक्षणासाठी दत्तक घेऊन आयुष्याला शिक्षणाचा परिस लावत मोठे केले. आज संजय हेही मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत.
कालिंदी हिंगे यांनी वडील आणि आपले मोठे बंधू गोमांकत लढ्यातील स्वातंत्र्यसैनिक हेमंत सोमण यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला. ज्या समाजात राहतो, त्यासाठी काहीतरी काम केले पाहिजे, असे कालिंदीताईंना वाटे. साहजिकच त्यांची पाऊलेही समाजकार्याकडे न वळली, तर नवल. मुंबईत मामा कुलकर्णी त्याकाळी हुंडा निर्मूलनाचे काम करत. कालिंदीताईंचे ज्ञान, समाजासाठी योगदान देण्याची इच्छाशक्ती, समर्पण भाव पाहून त्यांनी हुंडा निर्मूलनाच्या कामात कालिंदीताईंनाही सदस्य करून घेतले. पुढे त्यांनी एक हजार विद्यार्थिंनींना ‘मी विवाहात हुंडा देणार नाही’ अशी शपथ दिली. असे कार्य मालेगावी करणार्या त्या प्रथम महिला ठरल्या. हुंड्याचे दुष्पपरिणाम दाखवणारे चित्र, छायाचित्राचे प्रदर्शन मालेगाव येथे त्यांनी भरवले. ते काम पाहून पुष्पाताई हिरे कालिंदीताई यांच्या कामावर प्रभावित झाल्या होत्या. याच कामाची नोंद घेऊन कालिंदी हिंगे यांना राज्य शासनाच्या समाजकल्याण खात्याने पुरस्कार देऊन गौरव केला.
कालिंदी यांनी महिलांसह बालकांसाठी मोठे कार्य उभारले. मालेगाव येथील बालसुधारगृहात जाऊन त्या त्यांना संस्कार, मूल्य, ज्ञान देण्याचे कार्य करू लागल्या. याकामाची दखल घेऊन त्यांची केंद्र शासनातर्फेे ‘ज्युएनाईल मॅजिस्ट्रेट’ सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. निवृत्त होईपर्यंत त्यांनी हे काम अत्यंत नि:स्पृहपणे केले. शिक्षण क्षेत्रात केेल्या कामाबद्दल १९९३ मध्ये कालिंदीताईंना महाराष्ट्र शासनाचा ‘आदर्श पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. शाळेमधील गरीब विद्यार्थिंनींना संचयिका म्हणून बचत करण्याची सवय लावली. प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असलेल्या विद्यार्थिंनींसाठी मार्गदर्शन करून सर्वतोपरी मदत करण्याचे व्रत त्यांनी जोपासलेे. अनेक होतकरू, हुशार विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कालिंदी हिंगे यांनी पालकत्व स्वीकारले. निवृत्त होऊन त्या २९ वर्षं उलटूनही त्यांचे हे कार्य आजही अव्याहत सुरू आहे.
निवृत्तीनंतर हिंगे स्वा. विवेकानंद यांचे विचार व्याख्यानातून पोहोचविण्यासाठी कार्यरत राहिल्या. एकूण ५० हजार विद्यार्थ्यांपर्यंत त्यांनी स्वा. विवेकानंदांचे विचार पोहोचवले. विशेष म्हणजे, २१ उर्दू शाळांमधील विद्यार्थ्यांमध्येही त्यांनी विवेकानंदांचे विचार रुजवले. राष्ट्रीय एकात्मता, मानवता याचे विचार त्यांनी नवीन पिढीत पोहोचवण्यासाठी निवृत्तीनंतर अथक योगदान दिले. ‘महिलांची सुरक्षितता’ या विषयावर लिहिलेल्या स्तंभलेखनाबद्दल त्यांना एका वृत्तवाहिनीतर्फे विशेष पुरस्काराने गौरविण्यातही आले.मालेगाव एज्युकेशन सोसायटीतर्फे कालिंदी यांना निवृत्तीनंतर ‘जीवनगौरव’ पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. ‘शिवाजी मेमोरिअल ट्रस्ट’ नवी दिल्ली यांच्याकडूनही त्यांना मालेगावतील प्रतिभावंत महिला पुरस्कारने गौरवण्यात आले.
या सर्व सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने कालिंदी यांना नुकतेच ‘पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर पुरस्कार’ने सन्मानित करण्यात केले. आपले बंधू स्वातंत्र्यसैनिक हेमंत सोमण यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे निमित्त साधून त्यांच्या गोमांतक लढ्याविषयी कालिंदीताईंनी ‘क्रांतिसूर्य हेमंत सोमण’ पुस्तक लिहिले.लिखाण करणे, कुंदन काम, कलात्मक वस्तू तयार करणे, सुरेख डिझाईनच्या पर्स, पिशव्यांची निर्मिती करणे हे त्यांचे आवडते छंद. कलाकृतीतून आनंद मिळतो, असे त्या सांगतात. प्रवास, पर्यटन हाही त्यांचा आवडता छंद! आपल्या मैत्रिणींसह त्यांनी संपूर्ण भारतदर्शन केले. तसेच शैक्षणिक, सामाजिक विषयावरही त्यांनी विपुल लेखन केले. सध्या ‘क्रांंतिसूर्य हेमंत सोमण’ या मराठी पुस्तकाचे हिंदी भाषांतर करण्याचे काम त्यांनी वयाच्या ८७व्या वर्षी हाती घेतले आहे. त्यांच्या या कार्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून अनेक शुभेच्छा...!
-निल कुलकर्णी