बालगृह नव्हे बालगोपालनगरी

    02-May-2023
Total Views | 91
swami

मित्रांनो समाजामध्ये आतापर्यंत आपण मुलांच्या समस्या जर ऐकल्या, वाचल्या असतील तर आपल्याला बालगृह, वसतिगृह, आश्रमशाळा, अनाथालय असे ठरावीक शब्द बघायला मिळतात. अनेकदा या सर्व गोष्टी आपल्याला एकच वाटतात कारण तिथे लहान मुले असतात. मुले म्हटले की भावनिकता आपोआपच येते, संवेदनशीलता जागृत होते. या पार्श्वभूमीवर समतोल केंद्राची ‘बालनगरी’ संकल्पना समजून घेऊ...

लांचा अभ्यास करताना आता असे दिसून येते की, कौटुंबिक समुपदेशन करण्यासाठी वेगळी व्यवस्था करावी लागत आहे. नव्हे, तर तयार झाली आहे. ज्या ज्या ठिकाणी मुले आहेत त्या त्या ठिकाणी घरपण आहे, असे आपण म्हणतो म्हणजेच जिथे मुले असतात तिथे आनंद, प्रेम हे असतेच. परंतु याच समाजामध्ये अनेक घरात अशीही कुटुंबे आहेत जी घरात मुले नसल्यामुळे मुले दत्तक घेण्याच्या प्रतिक्षेत आहेत, तर दुसर्‍या ठिकाणी बेघर, निराधार मुलांची संख्या इतकी मोठी आहे की एकट्या महाराष्ट्रात किमान ४५० बालगृहे आहेत. त्यामध्ये निरीक्षणगृह किंवा खुले निवारागृह वगैरे असतीलच.

या सर्व बालगृहांमध्ये विचार केला, तर २० ते २५ हजार मुले असणार आहेत. मी जेव्हा बाल हक्क संरक्षण आयोग महाराष्ट्र राज्याच्या सदस्यपदावर होतो. (२०१७ ते २०२०) तेव्हा ही संख्या अजून मोठी होती. ‘कोविड’नंतर अनेक बालगृहातील मुले पुन्हा घरी पाठवली होती व बालगृहेसुद्धा बंद झाली होती. सांगायचे तात्पर्य असे आहे की, मुलांच्या संदर्भात प्रत्येक जण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघत आहे व त्यानुसार त्यावर काम करीत आहे.

बालगृहांमध्ये असणारी ही मुले कुठून येतात किंवा का ठेवली जातात यावर कधीही चर्चा होत नाही. मुलांचे पुनर्वसन होत नसल्यामुळे त्यांची ओळख पुसली जाते आणि पुढे अनाथ म्हणून ही मुले समाजासमोर आणली जातात. एखाद्या संस्थेत जास्त मुले असतील, तर त्यांचा सन्मान, सत्कार, गौरव केला जातो. वेगवेगळ्या प्रकारे त्या संस्थांना देणग्या मिळतात आणि याचे कारण म्हणजे मुले निराधार, बेघर आहेत आणि त्यांना सुविधा मिळत आहेत, असे विकासाचे चित्र तयार केले जाते.

अनेक संस्था चांगले काम करतही आहेत परंतु यामध्ये मुलांच्या नावाखाली डोनेशन उकळून स्वतःचा स्वार्थ साधणारी अनेक मंडळी याच समाजात आहेत. ही निराधार मुले चांगल्या कुटुंबात दत्तक दिली जात नाहीत. कारण त्यांना पालक असतात परंतु, सांभाळ करू शकत नाहीत. त्यामुळे पालकही मुले लहान असेपर्यंत आश्रमात ठेवतात व जशी मुले मोठी होतात तसे पालक घरी घेऊन जाण्यासाठी येतात. कारण, मुले कामधंदा करण्यासाठी उपयोगात येतात. मुलांना परत पाठवले नाहीतर पाला कोर्टापर्यंत जातात. संस्थांना मग नाईलाजाने मुले पालकांना द्यावी लागतात आणि तसेही १८ वर्षांनंतर मुले बालगृहात न राहता बाहेर पडतात. तेव्हा या मुलांचं काय?, असा अजून एक नवीन प्रश्न तयार होतो.

समतोल या चक्रात अडकून न राहता मुलांचे पुनर्वसन ही प्रक्रिया सुरुवातीपासूनच अतिशय सक्षमपणे करीत आहे. मुले कुठेही राहत असली तरी ही मुले आपलीच आहेत अशी भावना असलीच पाहिजे. मुलांच्या विकासासाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत. समतोलच्या मनपरिवर्तन केंद्रात याची व्यवस्था सुरुवातीपासूनच होती. त्यामुळे अक्षय जावळे, लता वानखेडे, सपना श्रीवास्तव, लक्ष्मी मुकादम असे हजारो कार्यकर्ते केंद्रात मनपरिवर्तन होऊन स्वतः सक्षम होतात व दुसर्‍याही मुलांचे मनपरिवर्तन करतात. नैसर्गिक पद्धतीने मुले वाढली पाहिजे व विकाससुद्धा झाला पाहिजे यासाठी समतोल केंद्रात गोसेवा, सेंद्रिय शेती, कला कौशल्य प्रशिक्षण याची रचना आहे.

भारतीय पद्धतीने मुलांच्या बौद्धिक व शारीरिक क्षमतेमध्ये वाढ झाली पाहिजे. कृत्रिम पद्धतीने मुले हुशार करता येत नाहीत कारण तो किंवा ती मानव प्राणी आहे. बुद्धी आहे, मन आहे, विशेष म्हणजे त्याला बोलता येते.त्यामुळेच उगाचच दिखावा करण्यात काही अर्थ नसतो. मुलांच्या या बाबतीत अनेक संस्था मुले लहान असताना म्हणजेच मुले बालगृहात असताना कौतुक दाखविण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच मुलांना १८ वर्षांनंतर बाहेरचा रस्ता दाखवतात... हे दुर्दैवच म्हणाव लागेल, अशा मुलांच्या बाबतीत पुढे अनेक प्रश्न तयार होतात व ही मुले वाईट मार्गाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी तयार होतात, हे चित्र बदलावे म्हणून संस्थांनी प्रयत्न केले पाहिजेत.

आपल्याच शहरात वाढणारी मुले ही बालगोपाल नगरीत राहायला पाहिजेत. समतोलच्या या ‘बालनगरी’ केंद्रात अशी अनेक मुले व्यवस्थित सक्षम होत आहेत. कायद्याचा विचार केला, तर त्यामध्येसुद्धा बदल करण्याची गरज जिथे असेल तिथे बदल अपेक्षित आहे. अनेकांना या बाबतीत कल्पना नसतानाही अधिकारी बनवून चार्ज दिला जातो. त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी घडण्याऐवजी वाईट गोष्टी घडतात. यामध्ये बदल घडवायचा आहे. प्रत्येक बालगृह हे बालगोपालनगरी बनले पाहिजे. मुलांमध्ये व सरकारी अधिकारी, नियम, विभाग, योजना, समित्यांमध्ये समतोल असला पाहिजे, तर प्रत्येक ठिकाणी बालगृहाऐवजी बालगोपाल नगरी होईल. प्रत्यक्ष समतोल केंद्राला भेट देऊन ‘बालनगरी’ संकल्पना समजून घ्यावी एवढीच अपेक्षा कशासाठी तर केवळ समाज बालप्रेमी होण्यासाठी...

९८९२९६११२४

विजय जाधव

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121