द केरला स्टोरी - चित्रपटाची बदनामी करणे आव्हाडांना भोवले

वर्तकनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा

    10-May-2023
Total Views |
Case against NCP Leader Jitendra Awhad

ठाणे : द केरला स्टोरी या चित्रपटाची बदनामी करणे, मुंब्य्राचे आमदार जितेंद्र आव्हांड यांना चांगलेच भोवले आहे. ठाण्यात पत्रकार परिषद घेवुन हा सिनेमा खोट्या गोष्टीवर आधारीत असल्याच्या वावड्या उठवुन सिनेमाच्या निर्मात्याला फाशी देण्याची तसेच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आव्हाडांनी केली होती. याप्रकरणी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात फौ.दं.प्र.सं. कलम १५५ नुसार आव्हाडावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

केरळ राज्यातील मुलीच्या फसवणुकीचे वास्तव चित्रण दाखवणारा देशभरात चर्चेत असलेल्या 'द केरला स्टोरी' या चित्रपटाला सर्वत्र प्रतिसाद मिळत असताना आ.जितेंद्र आव्हाड यांनी मात्र या चित्रपटावरून थयथयाट सुरु केला होता. यासंदर्भातील वृत्त ठाण्यातील तक्रारदार यांनी ५ मे रोजी खाजगी वृत्तवाहिनीवर पाहिले. यात "द केरला स्टोरी” हा सिनेमा खोट्या गोष्टीवर आधारीत आहे, खोटा आहे, सदर चित्रपटाच्या डायरेक्टरने हा सिनेमा बंद करायला हवा. असे बोलून आव्हाडांनी चित्रपटाची बंदनामी केली म्हणुन वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरिक्षक सदाशिव निकम यांनी आव्हाडांवर गुन्हा दाखल केला. अशी माहिती पोलिसांनी दिली.

 
आव्हाडांची टीवटीव सुरूच

चित्रपटाची बदनामी केली म्हणून काही भक्तांनी वर्तकनगर पोलीस स्टेशन येथे माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि गुन्ह्यामध्ये म्हटलं आहे की द केरला स्टोरी या चित्रपटाची जितेंद्र आव्हाड यांनी बदनामी केली. माझा प्रश्न असा आहे की, कुरुलकर या अतिशय महत्वाच्या जागी असलेल्या संशोधकाने या देशाची अत्यंत गुप्त माहिती पाकिस्तानला दिली. तो कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या राज्याचा प्रतिनिधी नाही तर तो गद्दार आहे. आता कुरुलकरवर बोललो म्हणजे मी कुठल्या जातीबद्दल बोललो असे होत नाही. किंवा कुठल्या धर्माबद्दल बोललो असे होत नाही. विकृतीला गद्दारीला आणि आतंकवादाला धर्म, जात, पंथ.राज्य .राष्ट्र नसते .हे यावरुन तरी आपल्या लक्षात येईल. कुरुलकरचे मूळ आणि कुळ शोधा मग कळेल आपल्याला. नशीबाने द केरला स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित व्हायला आणि कुरुलकरने एका बाईसाठी देश विकायला एकच वेळ आली. यालाच योगायोग म्हणतात. हाच कुरुलकर पुण्यामध्ये सावरकर व्याख्यानमालेत देशभक्तीचे व्याख्यान देत होता. आता याला आपण काय म्हणाल ? याच्या नावाने कोणती फाईल्स किंवा कोणत्या स्टोरीचा चित्रपट बनवायचा. आतामात्र ट्रोलर्स आणि माझ्यावर आग ओकणारे तोंडावर बोट ठेवून आज दिवसभर शांत राहतील. ज्यांच्या डीएनएमध्येच गद्दारी आहे, फितुरी आहे ते आम्हांला काय अक्कल शिकवणार. ह्याला इतिहासच साक्ष आहे.