सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार, संगीतकार, पटकथालेखक आणि अभिनेते अशा अनेक कलांमध्ये माहीर असलेले ज्येष्ठ कलावंत पुरुषोत्तम बेर्डे यांचे नवे नाटक रंगभूमीवर दाखल होत आहे. तब्बल नऊ वर्षांनी येणार्या ‘सुमी आणि आम्ही’ या नाटकानिमित्त पुरुषोत्तम बेर्डे यांच्याशी साधलेला हा खास संवाद...
पुरुषोत्तम बेर्डे यांचा अल्पपरिचय
पुरुषोत्तम गजानन बेर्डे हे मराठीतले एक यशस्वी चित्रकार, लेखक, एकांकिकाकार, नाट्यलेखक, नाट्यदिग्दर्शक, संगीतकार, अभिनेते, प्रकाशयोजनाकार, वेशभूषाकार आणि सिनेदिग्दर्शक आहेत. ’चौरंग’ नावाची त्यांची नाट्यसंस्था आहे. पुरुषोत्तम बेर्डे यांनी १९७५ मध्ये मुंबईच्या जे.जे. आर्ट स्कूलमधून डी.जी. आर्ट (ऊीरुळपस झरळपींळपस रपव ॠीरहिळल ईीं) ही ‘अप्लाईड आर्ट’मधील पदविका घेतली आणि पुढे आठ वर्षांपर्यंत जाहिरात क्षेत्रात काम केले. १९७८ मध्ये पुरुषोत्तम बेर्डे यांना ’या मंडळी सादर करू या’ या नाट्यसंस्थेकडून ‘अलवार डाकू’ या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन आणि संगीतावर काम करायची संधी मिळाली आणि त्यांची नाट्यकारकिर्द सुरू झाली. त्यांनी २०१० सालापर्यंत दहा नाटकांचे लेखन, २० नाटकांचे दिग्दर्शन, ६० नाटकांचे संगीत दिग्दर्शन आणि पाच नाटकांची व नऊ चित्रपटांची निर्मिती केली आहे.
या महिन्यात तुमचे ‘सुमी आणि आम्ही’ हे नाटक रंगभूमीवर येणार आहे. यानिमित्ताने जवळपास नऊ वर्षांनंतर प्रदीर्घ काळाने तुम्ही पुन्हा नाट्यदिग्दर्शनाकडे वळलात. त्याविषयी काय सांगाल?
मी काही प्रदीर्घ काळाने या क्षेत्राकडे वळलो नाही. खरंतर मध्ये टाळेबंदीच्या तेवढ्या दोन वर्षांत सगळंच ठप्प झाल्याने संवाद तुटला असेल तेवढाच, बाकी लिखाणाचं काम जोरात चालू होतं. २०१४ मध्ये ‘आई तुला कुठे ठेवू’ हे नाटक केलं. त्यानंतर आता २०२३ ला पुढचं करतोय, हा गॅप जास्त झाला खरं. पण, मी इतर गोष्टीत गुंतलो होतो. माझी लेक गौतमी हिने मालिकेची निर्मिती केली, म्हणून तिच्यासोबत काम करत होतो. याकाळात लक्ष्मीकांतवर प्रयोग केले. त्यालाच लागून महेश कोठारे आणि अशोक सराफ असे तीन ‘इव्हेंट’ लागोपाठ केले. ’क्लोज एन्काउंटर्स’ नामक सीरिजही लिहिली. यावेळी वेगळ्या परिस्थितीतून जात होतो त्यामुळे लिखाणाच्याच ‘मूड’मध्ये होतो. ‘कामाठीपुरा’ ही थीम घेऊन २६ व्यक्तिचित्रे लिहिली. प्रतिसाद चांगला मिळाल्याने ‘राजहंस’ने लेखसंग्रह प्रकाशित केला. ‘क्लोज एन्काऊंटर्स’वर एक वेबसीरिज करतोय, एका चित्रपटाचे कामसुद्धा चालू आहे. याकाळात ‘थरार’ नावाचे एक नाटक लिहिले. ’जाऊ बाई जोरात द्वितीय’च्या लिखाणात गुंतलो होतो. पण, आता शनिवार, दि. २२ एप्रिलला पुण्यात बालगंधर्वला ’सुमी आणि आम्ही’च्या शुभारंभाचा प्रयोग करतोय. असे वेगवेगळे ‘फॉर्म्स’ हाताळायला मला आवडतात. जसे की नाटक, चित्रपट, वाद्यवृंद, लेखन, इव्हेंट्स, चित्रकला, जाहिराती कित्तीतरी सांगू शकेन... म्हणून पुढचं नाटक यायला वेळ लागला. आता चित्रपटांचं पाहिलंस तर २००९ नंतर मी चित्रपट केला नाहीये, तो आत्ता करतोय. मग तो किती वर्षांनी होईल, हे लक्षात घे. मी हा असा, सगळीकडेच असतो!
‘सुमी आणि आम्ही’ या नाटकातून कोणता विषय तुम्ही मांडणार आहात? या नाटकाच्या संहितेत असे काय वेगळेपण तुम्ही पाहिलेत?
राजन महाडीकरांनी या नाटकाची संहिता हातात दिली. मोहन जोशी काम करणार असं ठरलं. दोन अंकी नाटक आहे. फॅमिली ड्रामा, कौटुंबिक नाती, आई-वडील आणि मुलगी अशा तीन मुख्य भूमिका आणि एकूण सात पात्र या नाटकात आहेत. तरुण मुलगी गाठू पाहणारं एक वेगळंच ध्येय आणि त्यावेळचे तिचे आई- वडिलांशी संबंध असं खेळकर कुटुंब या नाटकातून पाहायला मिळेल. उदय लागू, चंद्रशेखर भागवत, प्रदीप जोशी, श्रद्धा पोखरणकर, सविता मालपेकर या कलाकारांसोबत हे नाटक करतोय. माझी रंगभूमी तशी हलक्या-फुलक्या विषयांचीच! ‘जाऊबाई जोरात’, ‘शामची मम्मी’ अशी हलकी-फुलकी नाटकच मी केली. प्रत्येक नाटक मी वेळ घेऊन करतो. घाई गडबडीत विषयाला हात लावत नाही.
’गांधी विरुद्ध सावरकर’ या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य आणि संगीतदेखील तुम्ही केलेत. समाजातील एका मोठ्या गटाकडून टीका होऊ शकते, असे नाटकाचे नाव असूनही विषयाला तुम्ही हात घातलात. पण, हल्ली असे वैचारिक विषय नाटकांतून का दिसून येत नाही?
खरंतर हे नाव फसवं आहे. गांधी आणि सावरकर ही दोन तत्व आहेत. प्रत्यक्ष गांधी आणि प्रत्यक्ष सावरकरांशी नावाचा संबंध नाही. हे भ्रष्टाचारविरोधी नाटक आहे आणि विषय प्रखर सामाजिकच आहे. पण,सावरकर एक तत्व आणि गांधी एक तत्व, अशी दोन परस्पर विरुद्ध तत्व या नाटकातून मांडली आहेत. अहिंसा आणि हिंसा अशीही दोन तत्व आहेत, त्यांची एकमेकांशी लढाई यात दाखवण्यात आली आहे.
तुम्ही नेपथ्य, प्रकाशयोजनेपासून लेखन-दिग्दर्शन अशा सर्वच भूमिका अगदी खुबीने साकारता. पण, या सर्वात तुमचा अधिक ओढा कशाकडे आहे?
मला ‘परफॉर्मिंग’ जास्त आवडतं. त्यात मी जास्त रमतो. चित्रकला, वाद्यवृंद... आता नुकतंच संज्या छायासाठी संगीत मी दिलयं. अनेक वाद्ये वाजवतो, भारतीय पाश्चात्य सर्वच. या सर्व कला मला निसर्गानेच दिल्या आहेत. मी शिकलो नाहीये. जे सहज जमलं तेवढं करत गेलो. जेवणाची वाट पाहताना टेबल वाजवण्यातून आणि ड्रायव्हिंगला बसल्यावर स्टेअरिंग वाजवताना मला माझा सूर गवसला. संगीताचं शास्त्रशुद्ध ज्ञान मला नाही. त्यामुळे वाद्यांच्या माध्यमातून ज्या सुरावटी मी निर्माण करतो, त्या कोणत्या रागातल्या, कोणत्या तळातल्या हे काही मला सांगता येत नाही. पण, त्यातून कानांना मनाला सुखावणारे सूर निघतील याकडे माझे लक्ष असते. ही दैवी देणगीच आहे. कित्येकांना लाभली आहे ती, किशोर कुमार महान किंवा इतर संगीतकार महान. ती माझ्याकडेही आहे. तिचा मी पुरेपूर वापर करतो. ‘अप्लाईड आर्ट्स’ हा माझा आवडता प्रकार. कोणत्याही प्रकारचे ‘अॅप्लिकेशन’ हे मी जाहिरातीत शिकलो. नेहमीच ’लार्जर दॅन लाईफ’ हा दृष्टिकोन ठेवला. ’थिंक बिग अॅण्ड गेट इट’ ही जाहिरात क्षेत्रातील थिअरी मी नेहमीच वापरतो. लोककलांवर आधारित ‘खंडोबाचं लगीन’, ‘जाऊबाई जोरात’ सारखं ‘मल्टिमीडिया’ नाटक केलं, ‘शामची मम्मी’ किंवा ‘पर्याय’ बॉक्स थिएटरमध्ये केलं, नेपथ्यात अनेक प्रयोग करून पाहिलेत. वाद्य म्हंटली, तर तबला मला अतिशय आवडतो, पण त्याबरोबरच, लोककलांमधली वाद्ये.. दिमडी, संबळ ही सर्व माझ्या संग्रही आहेत. मी जेव्हा ‘पुरुक्रमा’चा प्रयोग केला होता, त्यात गुब्रुसारखं लहानसं वाद्यही घेतलं होतं. या वाद्याचे महत्त्व सांगायचा प्रयत्न यातून असतो. एकंदरीत कला सादर करायला मला आवडते.
पुरुषोत्तम बेर्डे यांना मिळालेले पुरस्कार
- ’अलवार’ नाटकासाठी राज्य स्तरावरील व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार
- ‘इंडियन नॅशनल थिएटर’चा सर्वोत्तम साहाय्यक अभिनेता म्हणून गौरव
- ’जाऊबाई जोरात’ या नाटकासाठी (२००० मध्ये मिळालेले) २७ पुरस्कार
- ’तावीज’ चित्रपटासाठी महाराष्ट्र सरकारचा राज्य पुरस्कार आणि भारत सरकारचा पुरस्कार
- पी सावळाराम पुरस्कार (२०१०)
- ३० वर्षांच्या नाट्यसेवेसाठी नाशिक नाट्य परिषदेचा वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार (२००३)
- ’भस्म’ चित्रपटासाठी महाराष्ट्र सरकारचा राज्य पुरस्कार आणि भारत सरकारचा पुरस्कार
- ’हमाल दे धमाल’ चित्रपटासाठी चार राज्य पुरस्कार