हत्ती प्रकल्पाची ३० वर्षे...

    06-Apr-2023
Total Views | 195
30 years of Elephant Project

जैवविविधतेचे संवर्धन हा हवामान बदलावर मात करण्याच्या उत्तम उपायांपैकी एक असल्याचे दिवसेंदिवस स्पष्ट होऊ लागले आहे. जैविक समुदायांचा आपापल्या पर्यावरणाशी जटील संबंध असल्यामुळे जैवविविधतेचे संवर्धन ही गुंतागुंतीची प्रक्रिया ठरते. त्यातील आव्हानांवर एक उपायकारक योजना ही कळीच्या प्रजाती ओळखून त्यांच्या संवर्धनावर लक्ष केंद्रित करणे, ही आहे. अशी कळीची प्रजाती असलेल्या ‘भारतातील आशियाई हत्ती (एलिफस मॅक्सिमस) चे संवर्धन’ या विषयाचा थोडक्यात आढावा.

 
भारतात हत्ती आणि लोक यांचे साहचर्य तसे फार जुने. इथे हत्तीला भरभराटीचे चिन्ह मानतात. आपला धर्म, कला, साहित्य आणि लोककथांमध्ये हत्ती ही सांस्कृतिक प्रतिमा आहे. ‘महाभारत’ हे महाकाव्य गणपतीने आपल्या मोडक्या सुळ्याने लिहिले होते, असे मानले जाते.वर्ष १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हापासून हत्ती असलेल्या इतर देशांच्या तुलनेत भारतातील हत्तींची संख्या साधारणपणे स्थिर राहिली आहे. पाळीव असो वा वन्य; भारतातील वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत हत्तींना सर्वोच्चसंरक्षण आहे. ‘वन संवर्धन कायदा, १९८०’ मुळे हत्तींच्या अधिवासाच्या र्‍हासाला आळा घालणे शक्य आहे. गेल्या नऊ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने हत्तीच्या संवर्धनासाठी ठोस योजना केल्या आहेत.भारताच्या एकंदर भूभागापैकी पाच टक्के प्रदेशात हत्ती आढळतात. सध्या त्यांची व्याप्ती संरक्षित क्षेत्रे आणि इतर विविध प्रकारच्या वनांमध्ये आहे. वनांना जोडणार्‍या अधल्यामधल्या मानवी अधिवासातही त्यांचा वावर असतो.

आफ्रिकेतील हत्तींना असलेला हस्तिदंतासाठी शिकारीचा धोका भारतात नियंत्रणात आहे. मात्र, १९७० आणि १९८०च्या दशकात परिस्थिती वेगळी होती. त्या काळात हस्तिदंताच्या बेकायदा आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी भारतातील हत्तींची शिकार करण्यात आली. त्यामुळे हत्तींच्या अस्तित्त्वाला धोका निर्माण झाला आणि त्यांच्या संरक्षणासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी समन्वयाने तातडीच्या उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली. त्यातून १९९२ मध्ये व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर हत्ती प्रकल्पाची सुरुवात झाली.केंद्र पुरस्कृत हत्ती प्रकल्पात हत्तींच्या संरक्षण संवर्धनासाठी केंद्राकडून तांत्रिक आणि आर्थिक पाठिंबा दिला जातो. या योजनेअंतर्गत देशभरात ८०, हजार ७७८ चौ. किमी व्याप्तीच्या परिसराला ‘हत्ती प्रकल्प’ क्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. वर्ष २०२२ मध्ये हत्ती प्रकल्पाला सुरुवात झाल्याला ३० वर्षे पूर्ण झाली.

हत्तींच्या संवर्धनासाठी ‘हत्ती प्रकल्पां’तर्गत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत हत्तींच्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या ठिकाणी नवे हत्ती प्रकल्प अधिसूचित करण्यात आले. उत्तर प्रदेशातील दुधवा व त्या भोवतीच्या परिसराला तेराई हत्ती प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. भारत आणि नेपाळच्या सीमेलगतच्या प्रदेशातील हत्तींच्या व्यवस्थापनाचा प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने हा हत्ती प्रकल्प घोषित करण्यात आला. पेरियार आणि अगस्त्यमलाई प्रदेशांतील वन्य अधिवासाला जोडण्यासाठी तामिळनाडूमध्ये सह्याद्रीच्या दक्षिण भागात अगस्त्यमलाई हत्ती प्रकल्प अधिसूचित करण्यात आला.हत्ती संवर्धनासाठी आणि माणूस व हत्ती यांच्यातील संघर्ष नियंत्रणात आणण्यासाठी हत्ती प्रकल्पांतर्गत देशभरात हत्तींचे भ्रमणमार्ग ओळखून त्यांच्या नोंदी करण्यात आल्या. उत्तराखंडातील चिल्ला-मोतीचूर, केरळमधील तिरुनेल्ली-कुदराकोटे यांसह अन्य काही भ्रमणमार्गांचे पुनरुज्जीवन करण्यात आले. ओडिशातील एका महत्त्वाच्या हत्ती भ्रमणमार्गाचा समावेश ‘वन्यजीव संरक्षण कायदा १९७२’मधील तरतुदीनुसार, संवर्धन राखीव क्षेत्रात करण्यात आला आहे.
 
रेल्वेच्या धडकेमुळे हत्तींना हानी पोहोचण्याच्या घटना टाळण्याकरिता रेल्वे आणि केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयांमध्ये वेळोवेळी चर्चा होते. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी दोन्ही मंत्रालये राज्यांचे वन विभाग आणि संशोधन संस्थांच्या मदतीने प्रयत्नशील आहेत.भारतातील हत्ती संवर्धनासमोर सगळ्यात मोठे आव्हान हे माणूस व हत्ती यांच्यातील संघर्षाचे आहे. समस्येचे गांभीर्य ओळखून सरकार जनतेच्या पाठीशी उभे राहिले आहे. ‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’त आता वन्य प्राण्यांमुळे होणार्‍या पिकाच्या नुकसानीचा समावेश करण्यात आला आहे. जेणेकरून शेतकर्‍यांना वेळीच नुकसान भरपाई मिळावी. संघर्षाच्या घटनेनंतर किमान कालावधीत नुकसान भरपाईची रक्कम दिली जावी, याकरिता प्रयत्न केले जात आहेत.

आर्थिक विकासाकडे भारताची वेगाने आगेकूच सुरू आहे. त्याचबरोबर निसर्ग आणि संस्कृतीशी आपली असलेली नाळ टिकवून ठेवणे गरजेचे आहे. आपल्या पुराणकथा, कला, धर्म, वारसा हे सारे निसर्गातील विविधतेतील एकतेचा पुरस्कार करते. हत्ती संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय आणि असम वन विभागाच्या वतीने हत्ती प्रकल्पाला ३० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून ‘गजोत्सव’ साजरा केला जाणार आहे. हत्तीच्या भव्य प्रजातीच्या संवर्धनाप्रती आपली वचनबद्धता दर्शवण्यासाठी ‘गजोत्सव’ हे व्यासपीठ ठरेल.



-भूपेंद्र यादव

(लेखक केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री आहेत.)








अग्रलेख
जरुर वाचा
महाराष्ट्र रेडिओ महोत्सवात ५ आर.जे. घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत!

महाराष्ट्र रेडिओ महोत्सवात ५ आर.जे. घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत!

जागतिक संगीत दिनानिमित्त उद्या दि. २१ जून रोजी सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आयोजित महाराष्ट्र रेडिओ महोत्सव अंतर्गत आशा रेडिओ पुरस्कार २०२५चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ५ नामांकित आर जे देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. नरिमन पाँईट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दुपारी २ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आदी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121