फडतूसगिरीचा कळस

    05-Apr-2023
Total Views |
Editorial policetical row on sena ubt worker claims beaten up

असंगाची गत उद्धव ठाकरेंना इतकी भोवली की त्यांचे मुख्यमंत्री पदही गेले आणि पक्षही! आता ते काय बरळतात आणि त्याचा काय अर्थ असतो, हे गंभीरपणे घ्यायचे नसते. पण, परवा त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख ‘फडतूस गृहमंत्री’ म्हणून केल्यामुळे त्यांचा समाचार घेणे क्रमप्राप्त आहे.
 
हातात काही उरले नाही की माणूस फक्त तोंडाच्या वाफा दवडत राहतो. वाफा दवडता दवडता त्याच्या हे मात्र लक्षात येत नाही की, आपण काय आणि कोणाबद्दल बरळून गेलो आहोत! उद्धव ठाकरेंचीही गत सध्या तशीच. असंगाची गत त्यांना इतकी भोवली की मुख्यमंत्री पदही गेले आणि पक्षही! आता ते काय बरळतात आणि त्याचा काय अर्थ असतो, हे गंभीरपणे घ्यायचे नसते. पण, परवा त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख ‘फडतूस गृहमंत्री’ म्हणून केल्यामुळे त्यांचा समाचार घेणे क्रमप्राप्त आहे. खरंतर या दोघांनाही राजकीय घराण्यांचा वारसा आहे. फडणवीसांच्या घरातही राजकारणाचा वारसा आहे आणि ठाकरेंच्याही; पण दोघांच्याही कर्तबगारीतला फरक जगजाहीर आहे. एकाने वडिलांनी ज्या पक्षाची विचारधारा आपली मानली त्याला महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आणून ठेवले, तर दुसर्‍याने आपल्या वडिलांचा पक्षच संपवून टाकला.मी, माझे वडील, ठाकरे हे आडनाव या सगळ्याची तर इतकी पराकोटीची घमेंड की त्याआड आपले स्वत:चे कर्तृत्व शून्य असल्याचा साधा लवलेषही नाही. उलट केवळ बापामुळे आपण आहोत, ही गौरवास्पद बाब म्हणून मिरवण्यातच हे महाशय व्यस्त!

खरंतर उद्धव ठाकरेंच्या जिभेला हाड नाहीच, हे एव्हाना त्यांच्या वीट आणणार्‍या फेसबुक लाईव्ह, संभांमधूनही वारंवार सिद्ध झालेले. आता तर त्यांच्या सभा मैदानाऐवजी ‘मातोश्री’च्या अंगणातील ओट्यावरही भरतात म्हणा! पण, मुख्यमंत्री असतानाही आणि आता नसतानाही शाब्दिक गलिच्छपणा आहे तो तसाच! कुठे शिवसेनाप्रमुखांची ती बाणेदार, विरोधकांचा खरपूस समाचार घेणारी ठाकरी शैली आणि कुठे उद्धव ठाकरेंचा समस्त सासवांनाही लाजवेल असा टोमणेबाजपणा! त्याचाच प्रत्यय परवा आला. जेव्हा, ठाण्यातील कार्यकर्त्याच्या मारहाण प्रकरणाच्या ऐकीव माहितीवरून त्यांनी मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांनाही लक्ष्य केले. कुठलीही मारहाण मुळात समर्थनीय नाहीच. परंतु, केवळ ठाकरे गटातील कार्यकर्त्याला मारहाण झाली म्हणून गृहमंत्र्यांवर एवढा टोकाचा संताप कशासाठी? हे खरं म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखेच आणि तेसुद्धा केवळ आणि केवळ प्रसिद्धीसाठीच!आपण आजही ठाकरे गटाचे प्रमुख आहोत, कार्यकर्त्यांची बघा मला किती काळजी, हे दाखविण्यासाठीचे रचलेले हे सगळे राजकीय नाट्य. याची स्क्रिप्ट लिहिणारेही त्यांचेच ठाण्याचे उरलेले अ‘विचारी’ खासदार. पण, या असल्या खोट्या, बोथट सात्विक संतापाने ठाकरेंनीच फडतूसगिरीची भाषा करत, टीकेच्या काडतूसांना आयते आवताण दिले, हेच खरे!

देवेंद्र फडणवीसांविषयी उद्धव ठाकरेंनी काहीही बोलावे, यासाठीची योग्यता तर ते कधीच गमावून बसले आहेत. कारण, आज खर्‍या, बाळासाहेबांच्या विचारांचे नेतृत्व करणारी शिवसेना ही एकनाथ शिंदेंच्या पाठीशी भक्कमपणे उभी दिसते. त्यामुळे पक्षसंघटनेतील नेतृत्व असेल, महाराष्ट्रातील राजकीय स्थान आणि एक कुशल प्रशासक म्हणून राज्य कारभारावर वचक, अशा सगळ्याच निकषांवर उद्धव ठाकरे हे सपशेल अपयशीच ठरले. त्यांच्या अडीच वर्षांच्या काळात महाराष्ट्राचा विकासरथ पूर्णपणे रुतून गेला. आरे मेट्रोची कारशेड असेल अथवा अन्य महत्त्वाचे फडणवीस सरकारच्या काळातील प्रकल्प, त्यांच्यावर ठाकरेंनी अहंकारातून कुर्‍हाड चालवली. ‘जलयुक्त शिवार’सारख्या कित्येक लोकहिताच्या प्रकल्पांना स्थगिती दिली. नैसर्गिक संकटांचा तडाखा सहन करणार्‍या कोकणवासीय, शेतकर्‍यांची मदतीच्या नावाखाली केवळ थट्टाच केली. उद्योगधंद्यांना परवानग्या देताना आपले धंदेही कसे गतिमान होतील, त्याचीच तजवीज करण्याचा प्रयत्न केला.परिणामी, त्या अडीच वर्षांत येऊ घातलेल्या उद्योगधंद्यांनीही महाराष्ट्राकडे पाठ फिरवून शेजारच्या राज्यांचा रस्ता धरला. कोरोना महामारीच्या संकटातही ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणून ठाकरेंनी महाराष्ट्राला असेच वार्‍यावर सोडले.

आपण या काळात ‘फेसबुक लाईव्ह’मधून जनतेशी फुटकळ संवाद साधत होतो, याचेच आजही किती ते अप्रूप! ‘मी घरी बसून राज्य कारभार चालवला’ या नामुष्कीलाही अशी उलट कौतुकाची झालर चढवित ‘बेस्ट सीएम’ म्हणून नुसत्या झांजा वाजवण्यातच त्यांनी धन्यता मानली. त्यातच पोलीस यंत्रणा आणि गृहमंत्रालयातही हस्तक्षेप करत बदल्यांपासून ते राजकीय विरोधकांचा बदला घेण्यापर्यंत ठाकरेंनी सर्व मर्यादांचे उल्लंघन केले. सचिन वाझेसारख्या भ्रष्ट पोलीस अधिकार्‍याचे पाठीराखे होऊन, अंबानींच्या घराबाहेर स्फोटके रचण्याचे प्रकरणही ठाकरेकालीनच. मग तत्कालीन आणि नंतर १०० कोटींच्या वसुली प्रकरणी तुरुंगवारी करून आलेले त्यांचेच गृहमंत्री अनिल देशमुख ठाकरेंना फडतूस का वाटले नाहीत? त्यांचा राजीनामा घेण्यासाठी ठाकरेंची बोबडी तेव्हा इतकी का वळली? नवाब मलिक तर कुख्यात दहशतवादी असलेल्या दाऊदशी संबंधित प्रकरणात कारावासात आहेत. मग मलिक एवढा मोठा गुन्हा करूनही ठाकरेंना फडतूस का वाटले नसावे? त्यांचाही राजीनामा घेण्याची हिंमत ठाकरेंनी त्यावेळी का दाखविली नाही?संजय राठोड प्रकरणातही ठाकरेंनी कारवाई करण्यापूर्वी इतके आढेवेढे का घेतले? हे तर केवळ मंत्रिमंडळातील गैरप्रकार, त्याहीपलीकडे राजकीय सूडापोटी कोणाला तुरुंगात टाक, तर कोणाच्या बंगल्यावरच बुलडोझर फिरव, अशी गुंडगिरी ठाकरेंना फडतूस आणि फाल्तू अजिबात वाटली नाही.

त्यातच राजकीय आणि अल्पसंख्याकांच्या लाळघोटेपणाचे तर जनाब ठाकरेंनी सर्व विक्रम मुख्यमंत्रिपदाच्या काळात मोडीत काढले. अझान स्पर्धा काय, उर्दू कॅलेंडर काय... शिवसेनेचे, बाळासाहेबांचे सच्चे हिंदुत्व तर ठाकरेंनी कधीच खुंटीवर टांगले. सावरकरांचा ठाकरे मुख्यमंत्री असतानाही काँग्रेसकडून वारंवार अपमान झाला. त्यावेळी राहुल गांधींना फडतूस म्हणून हिणवण्याचे धारिष्ट्य उद्धव ठाकरे तुम्ही का दाखविले नाही? त्यामुळे फडतूसगिरीच्याही पलीकडे कळस गाठणार्‍या अशा शेकडो घटना खरंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राने पाहिल्या, अनुभवल्या. पण, ठाकरेंना त्यात फडतूसपणा तर सोडाच, साधा ‘फॉल्ट’ही दिसू नये, इतकी त्यांची सदोष दृष्टी! त्यामुळे ठाकरेंच्या लंगड्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारची अडीच वर्षं ही अशी केवळ आणि केवळ संभ्रमाची आणि अनागोंदीची आणि ठाकरेंच्याच शब्दांत फडतूस, फसवाफसवीचीच ठरली!त्याउलट फडणवीस सरकारने सत्तेत आल्यापासून वेगवान निर्णयांचा, विकासकामांचा एकच धडाका लावला. मेट्रो प्रकल्प गतिमान केले, ‘समृद्धी महामार्ग’खुला केला. उद्योगधंदे, शेतकरी, महिला आणि सर्व सामाजिक घटनांना पंचामृताच्या अर्थसंकल्पातून सर्वंकष दिलासाही दिला. म्हणूनच फडणवीस हे सर्वार्थाने महाराष्ट्राच्या विकासाचे आधुनिक शिल्पकार ठरावे. त्यामुळे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नासवण्याचेच उद्योग करण्यात गर्क उद्धव ठाकरेंनी आपण कोणाविषयी काय बोलतोय, त्याचे भान बाळगावे. ठाकरेंचा बरळूपणा जर असाच कायम राहिला, तर ‘फडतूस’ ही त्यांच्याच मुखीची उपाधी, त्यांच्याच नावापूर्वी कायमची चिकटल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित!