संकल्प २५ वर्षांपूर्वीचा...

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे लोकार्पण

    26-Apr-2023   
Total Views |

Cancer Institute

(Nagpur Cancer Institute - Devendra Fadnavis)

नागपूर, दि. २६ :
साधारणत: २५ वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधर फडणवीस यांना कर्करोगाच्या उपचाराकरिता मुंबई गाठावी लागली. त्यांच्यावर टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार झाले. देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी तेथील परिस्थिती पाहून नागपूरमध्ये असेच किंवा यापेक्षाही भव्य असे कर्करोगाच्या उपचारासाठी रुग्णालय उभारण्याचा संकल्प केला तो गुरुवार, दि. २७ एप्रिल रोजी पूर्ण होत आहे. नागपुरात ‘आबाजी थत्ते सेवा’ आणि ‘अनुसंधान’ संस्थेतर्फे संचालित ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ची भव्य आणि सुसज्ज वास्तू तयार झाली असून, या ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’चे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होते.
 
देशाचे मध्यवर्ती शहर, महाराष्ट्राची उपराजधानी, भारताचा भौगोलिक मध्यबिंदू दर्शविणारे शहर, ‘टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’ आणि मध्यंतरी देशाच्या पंतप्रधानांनी ‘समृद्धी महामार्गा’ची भाग्यरेषा नागपुरातून ओलांडली. नागपूर आणि संपूर्ण विदर्भासाठी स्वप्नपूर्तीचा आनंद राहील, अशीच अभिमानाची घटना आहे. कारण, आज मध्य भारतातील सगळ्यात मोठे ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’चे लोकार्पण होत आहे. एका अर्थाने आज नागपूरच्या दोन मातब्बर नेत्यांनी शहरात जी विकासगंगा आणली त्यासाठी ते कौतुकास पात्र आहेत. २०१४ ला देशात परिवर्तनाची लाट आली आणि पाठोपाठ महाराष्ट्र ही विकासासाठी तत्पर झाला. त्यावेळी विक्रमी विजय संपादन करत नवे सरकार आले आणि त्यावेळी झालेले हेच परिवर्तन कमी वेळेत अतिशय दर्जेदार विकासकार्य नागपूरला झाले. डॉ. शैलेश जोगळेकर यांनी दिवसरात्र एक करून डॉ. मालिनी जोशी, डॉ. डी. के. शर्मा यांच्यासारख्या अनेक सहकार्‍यांच्या मदतीने ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ सत्यात उतरवले आहे. अर्थात ही संकल्पना सत्यात उतरवणे तसे कठीण काम होते. पण जिद्द आणि चिकाटी आणि सतत काहीतरी उदात्त करण्याच्या ध्येयाने प्रेरित असे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पेतून ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ उभे राहिले आहे.
 
मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रुग्णांची लांब रांगा बघता क्षणीच नागपुरात भव्य कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचं स्वप्न देवेंद्र फडणवीस यांनी पाहिले. डॉ. शैलेश जोगळेकर, परिणय फुके, सुमित वानखेडे, दिलीप राजूरकर, आनंद पाठक अशा आपल्या विश्वासू टीमलासोबत घेऊन फडणवीस यांनी हे स्वप्न सत्यात उतरवलं आणि आज तो सुदिन आला आहे की, या संपूर्ण प्रकल्पाचे लोकार्पण होत आहे.
 
नागपूरच्या आऊटर रिंग रोडवर असलेल्या जामठा येथे आज हजारो रुग्णांवर ‘महात्मा फुले योजना’ आणि ‘धर्मादाय रुग्णालय योजना’अंतर्गत मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार सुरू आहेत. या इन्स्टिट्यूटमधील जनरल वॉर्डसुद्धा एखाद्या पंचतारांकित हॉटेलला लाजवेल असा आहे. येथील ‘रेडिएशन थेरपी’साठी उभारण्यात आलेली यंत्रणा जगातील अद्ययावत तंत्रज्ञानवर आधारलेली आहे. नियमित केमोथेरपी घेण्यासाठी येणार्‍या रुग्णांचे वॉर्ड प्रशस्त, आल्हाददायक आणि स्वच्छ आहेत. येथे अ‍ॅॅडमिट असणार्‍या रुग्णासोबत एका नातेवाईकाची याठिकाणी राहण्याची आणि जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.
 
एक ठिकाणी छान वाचनात आले की, प. पू. गोळवलकर गुरूजी यांच्या निधनानंतर खूप जणांनी त्यांच्यावर पुस्तक लिहिली. मात्र, त्यांच्यासोबत जे सावली म्हणून सर्व सार्वजनिक आणि संघाच्या कार्यक्रमातसोबत म्हणून राहिले ते डॉ. आबाजी थत्ते होते त्यांना जेव्हा पुस्तक लिहिण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी केला तेव्हा ते म्हणाले, “श्रीरामजी के साथ हनुमान जी बहुत समय तक रहे; पर श्रीराम का चरित्र ऋषी वाल्मिकीने लिखा, हनुमान ने नहीं”अशाच देवदुर्लभ असलेल्या ‘आबाजी थत्ते सेवा’ आणि ‘अनुसंधान’ संस्थेतर्फे संचालित ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ची ही भव्य वास्तू निर्माण झाली आहे.
 
आपल्या वडिलांवर मुंबईत उपचार सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी मनाशी पक्का निर्धार केला होता की विदर्भ, बाजूचा छत्तीसगढ, मध्य प्रदेश, येथील रुग्णांना अत्याधुनिक तंत्रज्ञान असणारे, सर्व सोईसुविधा असणारे, माफक दरात असणारे कॅन्सर हॉस्पिटल सुरू करायचा विचार मनात आला आणि सोबतीला मित्र म्हणून असणारे शैलेश जोगळेकर यांच्या सोबतीने हा प्रकल्प आज सत्यात उतरला आहे. या द्वय संघ स्वयंसेवकांनी एकत्रितपणे हे कार्य पूर्णत्वास नेले आहे.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी प्रेरित होऊन सुरू झालेल्या या देवदुर्लभ कार्याला आबाजी थत्ते यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या देवेंद्र फडणवीस आणि शैलेश जोगळेकर यांच्या मेहनतीने स्वप्नवत वाटावे, असे भव्य ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’चे लोकार्पण होत आहे. त्यांनी यासाठी केलेले कष्ट आणि परिश्रम यासाठी हे दोघेही कौतुकास पात्र आहेत. २७ एप्रिल ही तारीख नागपूरकरांनी सदैव स्मरणात ठेवावी अशीच आहे. एखाद्या शहराचा सर्वांगीण विकास कसा असू शकतो याचे सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे आजचा दिवस आहे. मग ते पायाभूत सुविधा, वाहतूक, आरोग्य, पर्यावरण अशा कुठल्याही क्षेत्रात असले तरी तो एका शहराला सर्वांगीण विकासाकडे नेणारा असणार आहे.
 
पूर्वीचे नागपूर आणि आताचे नागपूर यात नक्कीच फरक जाणवणार आहे. मागास विदर्भाचा चेहरामोहरा बदलण्याचे कार्य नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांच्या दूरदृष्टी आणि विकासाच्या माध्यमातून बदलणारे आहे. ही विकासगंगा अशीच सतत प्रवाहित राहावी हीच नागपूरकर म्हणून सदिच्छा आहे. आपण वेळोवेळी जे प्रकल्प या भागात आणले ते पूर्णत्वास गेल्याने आपल्याला झालेला आनंद आम्ही अनुभवतो आहे. आपण निर्माण केलेली ही विकासगंगा येणार्‍या अनेक पिढ्यांना मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरणार आहे हा पूर्ण विश्वास आहे आणि हीच समृद्धी आणि आरोग्य क्षेत्रातील हा मैलाचा दगड महाराष्ट्राला आणि विशेषतः विदर्भाला अग्रेसर ठरणार आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सर्वेश फडणवीस

युवा लेखक सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विषयाचे अभ्यासक, सुरुवातीला 'नागपूर तरुण भारत' येथे दोन वर्ष स्तंभ लेखन. दै. 'सोलापूर तरुण भारत'मध्ये 'गाभारा' ही मंदिरावर आधारित लेखमाला प्रकाशित. महाराष्ट्र टाइम्स, पुण्यनगरी या वृत्तपत्रांसाठी विविध विषयांवर लेखन. इंदूरहून निघणाऱ्या 'मराठी गौरव' या पाक्षिकासाठी लेखन. 'प्रज्ञालोक' या त्रैमासिकात लेखन तसेच 'प्रज्ञालोक अभ्यासक मंडळात संपादकीय मंडळात सक्रिय'. दै. 'मुंबई तरुण भारत'च्या 'कालजयी सावरकर' या नावाने प्रकाशित सावरकर विशेषांकात 'सावरकर आणि युद्धशास्त्र' या विषयावर लेखन. अनेक दिवाळी अंकांसाठीही लेखन. 'साप्ताहिक विवेक'मध्ये गेली दोन वर्षे झाले 'पद्मगौरव' स्तंभ सुरू. आकाशवाणी व इतरही माध्यमातून सतत लेखन.