पुणे : “सेवा हाच भारताचा खरा स्वभाव आणि चेहरा असून, ’स्वस्थ भारत’ हे आमचे लक्ष्य आहे. ’रोगमुक्त भारत’ ही त्यातली पहिली पायरी आहे. प्रत्येक जण निरामय असावा,” अशी आपल्या संस्कृतीची शिकवण असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य भैय्याजी जोशी यांनी केले.
पुणे वैद्यकीय सेवा मंडळ आणि संशोधन प्रतिष्ठानच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या बाळासाहेब देवरस रुग्णालयाचे भूमिपूजन शनिवार, २२ एप्रिल रोजी झाले. यावेळी झालेल्या समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ‘सीरम इन्स्टिट्यूट’चे आदर पुनावाला, प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, संस्थेचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे उपस्थित होते, तर केंद्रीय स्वास्थ्य व परिवार कल्याणमंत्री डॉ. मानसुख मांडविया, संस्थेचे मानद अध्यक्ष तथा श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांनी दृकश्राव्य माध्यमातून उपस्थिती लावली. यावेळी भैय्याजी जोशी म्हणाले, “शरीर स्वास्थ्यापेक्षा मानसिक स्वास्थ्याचा प्रश्न अधिक जटील होत चालला आहे. मानसिकदृष्ट्या व्यक्ती व समाज सक्षम होणे आवश्यक आहे. औषधोपचाराने शरीर स्वास्थ्य जपता येऊ शकते. परंतु, मानसिक स्वास्थ्यासाठी काम करावे लागणार आहे. त्यामुळे स्वस्थ भारताची व्यापक संकल्पना घेऊन कामे उभी केले जात आहेत,” असेही ते म्हणाले.
भैय्याजी जोशी म्हणाले, “वैद्यकीय क्षेत्रातील सेवेची प्रचंड आवश्यकता निर्माण झाली आहे. समाजातील एका वर्गाला वैद्यकीय उपचार सहज मिळतात. परंतु, दुसरीकडे वनवासी, कष्टकरी, उपेक्षित घटकातील वर्गाला उपचार मिळत नाहीत. उपचारांची उपलब्धता सर्वांना समान पद्धतीने मिळणे अत्यंत आवश्यक आहे. भारतामध्ये मठ, मंदिरे व आश्रमांनी आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम उभे केले आहे. हा भारताचा खरा स्वभाव, मानस आणि खरा चेहरा आहे,” असे त्यांनी सांगितले. “अनेक संत महंतांच्या संस्थांनी भारतभरामध्ये रुग्णालये काढल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
ते पुढे म्हणाले, “बाळासाहेब देवरस यांचे नाव हीच या संस्थेची मोठी संपत्ती आहे. या नावासोबतच जबाबदारी अधिक वाढली आहे. साधने उपलब्ध करता येतात. परंतु, समर्पित भावना निर्माण करणे अधिक महत्त्वाचे असते. केंद्रातील सध्याचे सरकार संवेदनशील आहे. कर्तव्याची भावना आणि संवेदना जपणारी ही माणसं आहेत. जनसामान्यांच्या प्रश्नाशी जोडलेले लोक केंद्रात सत्तेमध्ये आहेत. विचारांनी प्रेरित होऊन ते काम करत आहेत. संविधानामध्ये स्वास्थ्य हा मूलभूत अधिकार म्हणून सांगितला आहे. १९४८ पासून नंतर जगाच्या सोबतीने पुढे जाण्यासाठी या देशामध्ये सर्वांचेच योगदान राहिलेले आहे. भारताच्या उत्थानात उद्योगपतींची मोठी मालिका राहिलेली आहे,” असेही त्यांनी सांगितले.
दृकश्राव्य माध्यमातून मनसुख मांडवीया म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दरिद्रीनारायण आणि दरिद्री देवो भव हे मंत्र घेऊन काम करीत आहे. संघ कार्यकर्ता सेवा करण्यात सतत आघाडीवर असतात. कोणत्याही आपत्तीमध्ये ते सेवेसाठी हजर असतात. आरोग्य भारतीच्या विविध प्रकल्पांमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. ही सेवा भावना कॉर्पोरेट रुग्णालयांमध्ये पाहायला मिळणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबी पाहिलेली आहे. त्यामुळेच त्यांनी सर्वांसाठी ‘जनआरोग्य’ योजनेसारख्या योजना आणल्या आहेत,” असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “ ‘कोविड’निमित्ताने आपण आरोग्याच्या क्षेत्रामध्ये किती मागे आहोत याची जाणीव झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे अनेक गोष्टीमध्ये आपण आधुनिकता प्राप्त केली. उपकरणे, औषधोपचार, संशोधन आणि आरोग्य क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ आपल्याकडे नव्हते. ते वाढवण्यास याच काळात सुरुवात झाली. संघाच्या माध्यमातून दूरदृष्टी ठेवून वैद्यकीय क्षेत्रातदेखील मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असल्याचे पाटील म्हणाले. लातूर येथील विवेकानंद रुग्णालय, संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रुग्णालय, नाशिक येथील गुरुजी रुग्णालय, विविध रक्तपेढी हे त्याचेच द्योतक असल्याचे ते म्हणाले.
‘सीरम इन्स्टिट्यूट’चे आदर पुनावाला म्हणाले, “आरोग्य हा सर्वसामान्यांचा प्राथमिक अधिकार आहे. सर्वसामान्यांना परवडणारे उपचार मिळणे कठीण झाले आहे. ‘सीरम’च्या स्थापनेपासूनच सर्वसामान्यांच्या वेदना कमी करण्यासाठी काम केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारता’चा नारा देऊन आरोग्य क्षेत्रातदेखील मोठी क्रांती घडवण्यास सुरुवात केली आहे. भारत देशासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल आम्ही समाधानी असल्याचे ते म्हणाले.”
आनंद देवगिरी महाराज यांनी आपल्या दृकश्राव्य माध्यमातून दिलेल्या संदेशामध्ये डॉ. हेडगेवार यांनी संघटनेचा मंत्र दिला. श्री गुरुजींनी संस्काराचा मंत्र दिला, तर सेवेचा मंत्र बाळासाहेब देवरस यांनी दिल्याचे सांगितले. पिडाग्रस्त लोकांची सेवा हे देशसेवेचे माध्यम आहे. धर्माचे साधन आणि संस्कारांचे शिखर सेवा असल्याचे ते म्हणाले. सेवेची भावना आजच्या काळातही संघ आणि साधुसंतामुळे जीवंत असल्याचे त्यांनी नमूद केले. सेवेतच जीवनातील सार्थकता असून समाजऋण फेडणे म्हणजे जीवन धन्य करणे होय, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरीष देशपांडे यांनी केले, तर सूत्रसंचालन अनिरुद्ध दडके यांनी केले. आभार कार्यवाह बद्रीनाथजी मूर्ती यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. बहार कुलकर्णी आणि डॉ. अजित कुलकर्णी यांनी रुग्णालयाच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली. डॉ. तेजस्विनी यांनी सेवा गीत सादर केले. त्यांनीच गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.