आज दि. २३ एप्रिल. हा दिवस ‘जागतिक ग्रंथ दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला होतो. अमेरिकेत सुमारे ५७ वर्षांपूर्वी म्हणजेच १९६६ मध्ये मार्गारेट मॅकनमारा या महिलेच्या पुढाकारानं 'Reading is Fundamental' (R.I.F.)ही चळवळ सुरू झाली. आपल्या देशातही आता ‘पुस्तकांचं गाव’ ही संकल्पना रुजवणं सुरू आहे. पण, खरी गरज आहे ती ‘वाचकांची गावं’ साकारण्याची! जागतिक ग्रंथदिनानिमित्त विशेष लेख...
महाराष्ट्रात पूर्वीपासून ‘गाव तिथं ग्रंथालय’ ही घोषणा दिली गेली. वाड्या-वस्त्या सोडल्या तरी राज्यात २७ हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायती असून शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या मात्र १२ हजार, ८४६ इतकी आहे. म्हणजेच अजूनही निम्म्यापेक्षा अधिक गावांमध्ये शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये नाहीत. या पार्श्वभूमीवर अलीकडेच उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने याबाबत घेण्यात आलेले निर्णय सार्वजनिक ग्रंथालयांच्या आणि पर्यायाने वाचनसंस्कृती वाढवण्याच्या चळवळीला सक्षम करणारे दिसतात.
देशभरातील एकूण शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांपैकी सुमारे २० टक्के ग्रंथालये एकट्या महाराष्ट्रात आहेत. मात्र, गेली अनेक वर्षे शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या नव्या प्रस्तावांना मान्यता मिळत नव्हती. दैनंदिन महागाई आणि ग्रंथनिर्मितीचं मूल्य वाढलं तरी ग्रंथालयांच्या अनुदानामध्येही शासनाने वाढ केली नव्हती. त्यामुळे ग्रंथपालांच्या वेतनापासून ते ग्रंथालयं सक्षमपणे चालवण्यामध्ये अनेक अडचणी होत्या. वाचनाची माध्यमं बदलत चालल्यामुळं आणि मराठी माध्यमांच्या शाळांचीच संख्या इंग्रजीच्या प्रभावामुळे रोडावत चालल्याने ‘मराठी वाचणारी नवी पिढी’ या ग्रंथालयांमध्ये जाण्याचेही प्रमाण घटत चाललं होतं.
मात्र, कोरोना काळात ग्रंथालयं जरी बंद ठेवण्यात आली होती, तरी घराघरांमधून संग्रही असलेल्या पुस्तकांचं आणि नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक साधनांद्वारे वाचन वाढू लागल्याची चिन्हं दिसू लागली. या पार्श्वभूमीवर कोरोनाची लाट ओसरल्यावर पुन्हा वाचन चळवळीला आणि सार्वजनिक ग्रंथालयांना गती देण्याची आवश्यकता होती. सामाजिक संस्था आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने काही व्यक्तींनी या कामासाठी पुढाकार घेतल्याची उदाहरणं समोर येऊ लागली होती. पण शासनानं पुढाकार घेणं गरजेचं होतं.या पार्श्वभूमीवर ‘गाव तिथे ग्रंथालय’ या घोषणेला गती देऊन ग्रामपंचायती असलेल्या प्रत्येक गावात अनुदानित सार्वजनिक ग्रंथालय सुरू करण्याचा निर्णय आता उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केला असून त्यानुसार नियोजन सुरू झाले आहे. याखेरीज सार्वजनिक ग्रंथालयांना देण्यात येणार्या अनुदानात नुकतीच ६० टक्के वाढ करून ही ६६ कोटी रु. रक्कम आणि थकित अनुदानदेखील ग्रंथालयांना वितरित करण्यात आले आहे, ही समाधानाची बाब आहे.
वाढीव अनुदानासह ग्रंथालयांना देण्यात येणार्या एकूण अनुदानापैकी ७५ टक्के रक्कम पुस्तकांच्या खरेदीसाठी तर २५ टक्के रक्कम ग्रंथपालांसह कर्मचार्यांच्या वेतनावर खर्च होतात. मात्र, आता पुस्तक खरेदीसाठी त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून काही रक्कम उपलब्ध करून द्यावी, त्यामुळं ग्रंथपाल आणि कर्मचार्यांच्या वेतनासाठी अधिक रक्कम उपलब्ध होईल, अशी भूमिका मंत्री पाटील यांनी घेतली आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यात ग्रंथखरेदीसाठी शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना जिल्हा नियोजन मंडळातून निधी देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.
याशिवाय सार्वजनिक ग्रंथालयांनी वर्षभरात ग्रंथप्रदर्शने, ग्रंथप्रसारासाठी काही उपक्रम, विविध व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत, यासाठीही स्वतंत्र निधी देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याशिवाय जिल्हा स्तरावर फिरती ग्रंथालये सुरू करण्याबाबतही प्रोत्साहन देण्याची भूमिका घेण्यात येणार आहे. पुण्यात त्यांच्या पुढाकाराने वर्षभरापूर्वीच दहा हजार ग्रंथांचे फिरते ग्रंथालय सुरू करण्यात आले असून, दीड हजारांपेक्षा अधिक सभासद या मोफत सेवेचा लाभ घेत आहेत.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, शताब्दी ओलांडलेली ९५ पेक्षा अधिक सार्वजनिक ग्रंथालये महाराष्ट्रात उत्तमपणे कार्यरत आहेत. मात्र, शासनाच्या अनुदानाव्यतीरिक्त जर त्यांना कर्मचार्यांचे वेतन, ग्रंथखरेदी, सांस्कृतिक कार्यक्रम स्वतंत्रपणे करणे यावर अधिक रक्कम खर्च करायची असेल, तर त्यांना व्यक्ती, संस्था, अनेक देणगीदारांची मदत मिळवावी लागते. या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांपूर्वी दापोली तालुक्यातील चिखलगाव इथे झालेल्या कोकण विभागीय ग्रंथालय संघाच्या अधिवेशनात आणि पाटण (जि. सातारा) इथे २०१८ मध्ये झालेल्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अधिवेशनाचा उद्घाटक या नात्याने मी माझ्या भाषणांत ‘सार्वजनिक ग्रंथालयं ही ग्रंथविक्री केंद्रं व्हावीत,’ हा मुद्दा आणि त्याबाबतची काही ठोस योजना मांडली होती. काही वृत्तपत्रांतून त्याबाबत सविस्तर लेखही लिहिले होते. अर्थात, हे मीच पहिल्यांदा सुचवलं असा माझा दावा नव्हता आणि आजही नाही. तथापि ग्रंथालये, प्रकाशक आणि वाचक या तिन्ही घटकांना लाभदायी ठरेल, अशी ही योजना होती.
१. वाचकांना ग्रंथालयातील आवडलेली पुस्तकं जर खरेदी करायची असतील, तर ती आपल्या गावातच उपलब्ध करून देणं सध्याच्या यंत्रणेत अशक्य आहे. पण, ती जर त्यांना सभासद असलेल्या ग्रंथालयातच नोंदणी करून सवलतीच्या दरात मिळणार असतील, तर वाचकांना आर्थिक लाभही होईल आणि सोय देखील.
२. वितरक म्हणून सार्वजनिक ग्रंथालयांनी/ग्रंथपालांनी जर काही प्रकाशनांची पुस्तकं विक्रीसाठी ठेवली, तर त्याचे रितसर मानधन त्या-त्या मंडळींना मिळेल.
३. महाराष्ट्रातील अनेक प्रकाशकांना त्यामुळे विश्वासार्ह विक्रेते सार्वजनिक ग्रंथालयांच्या रूपाने मिळू शकतील.
परिणामी, कुणालाही कोणतीही स्वतंत्रपणे आर्थिक/जागेची/वेळेची स्वतंत्र गुंतवणूक न करता सध्या आहे त्याच ग्रंथालयांमध्ये ही सुविधा वाचक/सभासदांना आणि इतरांनाही उपलब्ध करून देता येईल. जेणेकरून ग्रंथालयांचे मासिक उत्पन्न वाढेल आणि ग्रंथपालांचे पगारही वाढतील.लोकमान्य ग्रंथालय, बेळगाव या संस्थेनं हा उपक्रम यशस्वीपणे गेली काही वर्षे राबवलेला आहे.
आज महाराष्ट्रातील अनेक वितरकांनी वाढत्या खर्चामुळे ग्रंथप्रदर्शनांसारखे उपक्रम बंद केले आहेत किंवा कमी केले आहेत. पुणे, मुंबईसह काही प्रमुख शहरांमध्येच प्रकाशक आणि विक्रेत्यांची संख्या अधिक आहे. मात्र, महाराष्ट्रात सर्वदूर किमान तालुका पातळीवरही अद्याप पुस्तकांच्या वितरणाची यंत्रणा वाचकांच्या तुलनेत पुरेशी उपलब्ध नाही असं दिसून येतं. शिवाय अशी विक्रीयंत्रणा उभारणं खर्चिक झालं असल्यानं सार्वजनिक ग्रंथालयांमध्येच जर पुस्तक विक्री केंद्र सुरू केलं, तर अतिरिक्त जागा, मनुष्यबळ आणि भांडवली गुंतवणूक काहीच न करता अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचता येऊ शकेल, असा त्यामागचा विचार आहे.
या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई इथे झालेल्या बैठकीत उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘अनुदानित सार्वजनिक ग्रंथालयांना त्यांच्या आवारात नवीन ग्रंथविक्री करण्यास शासनाची हरकत नाही’ हे स्पष्टपणे सांगितले. उलट अशी ग्रंथप्रदर्शनं, ग्रंथप्रसार, विक्री याला प्रोत्साहन देण्याचेच धोरण असेल, असेही सांगितले. या संदर्भात ग्रंथालय संचालकांनी दि. २१ नोव्हेंबर, २०२२ रोजी सविस्तर परिपत्रक पाठवून सर्व ग्रंथालयांना कळवले आहे. काही ग्रंथालयांनी अशी ग्रंथप्रदर्शने आणि विक्रीदेखील सुरू केली आहे. त्याचबरोबर सुमारे ५० वर्षांपूर्वीच्या सार्वजनिक ग्रंथालयांबाबतच्या कायद्याचा फेरआढावा घेणे. दरवर्षी, २० टक्केच ग्रंथालयांची तपासणी करावी अन्यथा श्रेणीवाढीची मागणी झाल्यास त्या त्या ग्रंथालयाचे ऑडिट व्हावे, अशा स्वरुपाचेही बदल आता दृष्टिपथात दिसत आहेत.
ज्याप्रमाणे अमेरिकेत वॉशिंग्टन इथे १९६६ पासून "Reading is Fundamental' ही चळवळ सुरू आहे की, ज्या चळवळीत आज दहा लाखांपेक्षा अधिक शिक्षक आणि स्वयंसेवक कार्यरत आहेत. सुमारे साडेबेचाळीस कोटींपेक्षा अधिक पुस्तकं या चळवळीमार्फत १६ कोटी, ३० लाख मुलांपर्यंत केवळ पोहोचवलीत असं नाही, तर अमेरिकेतल्या वाचन संस्कृतीला साक्षरता मोहिमेला या चळवळीनं दिशा दिली आहे. त्याचप्रमाणे आता आपल्याकडेदेखील केवळ शासनावर अवलंबून न राहता, उत्तम वेतन घेणार्या मंडळींनी स्वतःच्या कुटुंबासह एक सामाजिक जबाबदारी म्हणून राष्ट्रहिताच्या भूमिकेतून ‘वाचकांची गावं’ साकारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. जागतिक ग्रंथदिनाचा हाच एक मुख्य संदेश मानून आपण सर्व ग्रंथप्रेमी कार्यरत होऊया.
-डॉ. सागर देशपांडे
(लेखक पुण्यातील जडण-घडण मासिकाचे मुख्य संपादक आहेत.)