कल्याण ; कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावातील विविध समस्या सोडविण्यासाठी तसेच २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी. यासह २७ गावातील नागरिकांना दहा पट मालमत्ता कर आकारला जात आहे. कोणत्याही सोयी सुविधा दिल्या जात नसताना हा कर भरणे नागरीकांना अशक्य आहे. त्यामुळे तो रद्द करण्यात यावा. २७ गावे महापालिकेतून वगळल्यास कराचा हा प्रश्न संपुष्टात येईल या मागणीसाठी सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी सुभाष मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले.
या धरणे आंदाेलनात समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार आणि उपाध्यक्ष गुलाब वझे यांच्यासह पदाधिकारी चंद्रकांत पाटील, रंगनाथ ठाकूर, गजानन मांगरुळकर,अर्जून चौधरी, अरुण वायले, विजय भाने, तुळशीराम म्हात्रे, कुंदा मढवी, वासूदेव गायकर आदी सहभागी झाले होते. समितीच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेतली.
गुलाब वझे म्हणाले, २७ गावे महापलिकेत समाविष्ट केली. त्यानंतर २०१७ पर्यंत ग्रामपंचायतीप्रमाणे कर वसूल केला गेला. त्यानंतर थेट दहा पट मालमत्ता कराची आकारणी ही जाचक आहे. २७ गावातील शाळा आणि आराेग्य केंद्र हे आजही जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आहे. भाल व भोपर गावातील डम्पिंग ग्राउंड रद्द करणे, गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करणे, २७ गावातील एक अद्ययावत रुग्णालय बांधणे, पाणी प्रश्न सोडविणे, रस्ता बाधित शेतकऱ्यांना रोख स्वरूपात मोबादला द्यावा, ग्रामपंचायत मधील वर्ग ४९९ कामगारांना कायम करणे अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या.
या धरणे आंदाेलनास शिंदे गटाचे युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी भेट दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने धरणे आंदाेलन करणाऱ्यांना त्यांनी सांगितले की, २७ गावांच्या दहा पट मालमत्ता करा विषयी लवकर प्रशासन पातळीवर बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले.
त्याचबराेबर या धरणे आंदाेलनास ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भाेईर यांनी ही भेट देऊन २७ गावांच्या मागण्यांना जाहिर पाठिंबा दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सांगतात की, ते सामान्यांचे मुख्यमंत्री आहेत. तर त्यांनी २७ गावच्या सामान्यांचा प्रश्न मार्गी लावावा. आणि २७ गावांची स्वतंत्र नगररपालिका करण्याची घाेषणा करावी असे सांगितले.