ठाणे : मागील दहा वर्ष दिव्यात तीव्र पाणीटंचाई आहे. ही पाणीटंचाई कृत्रिम असून दिव्यात मनमानी कारभार करणाऱ्या शिवसेनेचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी आणि माजी नगरसेवक शैलेश पाटील या जोडगोळीच्या गलथान कारभारामुळे पाण्याची समस्या लोकांना भेडसावत आहे. असा घणाघाती आरोप भाजपचे दिवा शहर अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केला आहे.
लोकांना पिण्यासाठी असणारे पाणी माजी उपमहापौर रमाकांत मढवी हे बिल्डरांकडून प्रत्येक स्लॅबमागे पैसे घेऊन बांधकाम करण्यासाठी देतात,परिणामी लोकांना प्यायला पाणी मिळत नाही. असा गंभीर आरोप रोहिदास मुंडे यांनी केला आहे.दिव्यातील जनतेला मागील १० वर्षे पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नाही आणि अनधिकृत बांधकामे करायला मात्र मुबलक पाणी उपलब्ध होते. याचे उत्तर रमाकांत मढवी यांनी जनतेला द्यावे.शैलेश पाटील यांनी मनमानी पध्दतीने स्वतःच्या लोकांना जलवाहिन्या दिल्या असल्याने दिव्यातील अन्य जनतेला पाणीच मिळत नाही. मढवी आणि पाटील या जोडगोळीमुळे दिवा परिसराला पाणी समस्येचा शाप लागला आहे. असा आरोप रोहिदास मुंडे यांनी केला आहे.मागील वर्षेभरात दोन वेळा पाणी वाढविण्याच्या घोषणा झाल्या मात्र वाढलेले पाणी कुठे मुरते याचे उत्तर आता मिळत असून मढवी हे पैसे घेऊन बिल्डरांना बांधकामे करायला देत असल्याने नागरीकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. असे मुंडे यांनी म्हटले आहे.
पाईपलाईन गटारात
पाणी टंचाई इतकी भयानक आहे की, नागरिकांना गटारातून येणाऱ्या पाईपलाईनचे पाणी प्यावे लागत आहे.काविळीने एका चिमुकलीला नुकताच जीव गमवावा लागला आहे.तेव्हा,आता तरी प्रशासनाने डोळे उघडावेत.(रोहिदास मुंडे, दिवा शहर अध्यक्ष भाजप)