नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘व्हिजन २०४७’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठीच्या कृती आराखड्याविषयी चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे चिंतन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह शिबीराच्या अध्यक्षस्थानी होते.
चिंतन शिबिराच्या प्रारंभी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यापूर्वीच्या चर्चासत्रात दिलेल्या निर्देशांची किती अंमलबजावणी झाली आहे, याचा आढावा घेतला. त्यासाठी त्यांनी गृहमंत्रालयाचा डॅशबोर्ड, केंद्र सरकारची भूमी माहिती व्यवस्था, अर्थसंकल्पातील निधीचा विनियोग, ई-ऑफिस आणि विशेष भरती मोहीम अशा सर्व बाबींचा आढावा घेतला. येत्या काही वर्षात मंत्रालयाच्या अखत्यारीतील विविध विभागांनी ठरवलेले प्राधान्यक्रम आणि आधीच्या योजनांची स्थिती तसेच आत्मनिर्भर भारत आणि अर्थसंकल्पातील विविध घोषणा आणि महत्वाच्या प्रलंबित मुद्यांवर चर्चा केली.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री शाह शिक्षणाच्या महत्त्वावर भर दिला. गृह मंत्रालयाच्या सर्व विभागांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना नियमित प्रशिक्षण दिले पाहिजे, असे ते म्हणाले. गृहमंत्रालयाशी संबंधित विकास योजनांवर देखरेख ठेवण्यासाठी गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी नियमित दौरे करावेत अशी सूचना केंद्रीय गृहमंत्र्यांनी केली.तसेच सीमाभागात कुंपण आणि रस्ते बांधणीची कामे तातडीने करण्याचे त्यांनी निर्देश दिले. गृहमंत्र्यांनी संवेदनशीलतेच्या महत्त्वावर आणि सर्व वरिष्ठ कर्मचार्यांनी वैयक्तिक संबंध विकसित करण्याच्या गरजेवर भर दिला. विभागाच्या भविष्यासाठी त्यांनी विशेष सूचनाही दिल्या. चिंतन शिबिरात झालेल्या चर्चेमुळे राष्ट्रीय धोरण तयार करण्यास आणि या क्षेत्रांमध्ये चांगले नियोजन आणि समन्वय साधण्यास मदत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
पोलिस दलांच्या आधुनिकीकरणावर भर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सायबर गुन्हे व्यवस्थापन, पोलिस दलांचे आधुनिकीकरण,गुन्हेगारी सिद्धता व्यवस्थेत माहिती तंत्रज्ञानाचा वाढता वापर, सीमा सुरक्षा व्यवस्थापन आणि किनारपट्टी सुरक्षा, अशा सर्व गोष्टींबाबत एक समग्र व्यवस्था विकसित करण्यावर भर दिला. शाह यांनी गुन्हेगारांचे महत्वाचे विश्लेषण करण्यासाठी सीसीटीएनएस च्या डेटाबेसचा व्यापक वापर करण्यासाठी, कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करण्यावर भर दिला. जेणेकरून, महिला, मुले आणि दुर्बल घटकांसाठी सुरक्षित वातावरण तयार केले जाऊ शकेल, असेही ते म्हणाले.