मुंबई : अवकाळीमुळे राज्यातील जनता त्रस्त झाली असताना या आठवड्यात देशभरात उष्णतेची प्रचंड लाट येण्याची शक्यता आहे. राज्यातील तापमानातही लक्षणीय वाढ होण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवसांत तापमानात झापाट्याने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष नको, असा हवामान विभागाने दिला आहे.
पुढील काही दिवस देशभरातील तापमान दोन ते चार अंश सेल्सियसने वाढणार आहे. त्या दरम्यान, राज्यातील पाराही चढताच राहणार आहे. त्यात काही भागात तापमानात हळूहळू वाढ अपेक्षित असून तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.
राज्यात पुढील दोन दिवस तापमानाचा पारा वाढणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले. दोन ते तीन अंशाने ही तापमान वाढ होणार असून पुढील काही दिवसात राज्यात ढगांच्या गडगडासह वादळी पाऊसही होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. राज्यातील तापमानात सातत्याने वाढ होत असून काही शहरांमध्ये तापमानाने ४०शी पार केली आहे. विदर्भात सलग सहाव्या दिवशी तापमानाने उच्चांक गाठला आहे. त्यात नागपूर, अमरावती आणि बुलढाणा या शहरांतील तापमान ४० च्या आसपास नोंदले गेले आहे.
मागील सहा दिवसांपासून चंद्रपूरचे तापमान सतत वाढत आहे. सलग सहाव्या दिवशीसुद्धा चंद्रपूरच्या तापमानाने उच्चांक गाठला आहे. भुसावळमध्ये कमाल तापमान ४३.३ अंश नोंदवले गेले.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दि. १८ ते १९ एप्रिल दरम्यान पूर्व पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहारमध्ये उष्णतेची लाट आहे. तसेच पुढील २४ तासांत सिक्कीम ओडिशामध्ये तर झारखंड, आंध्रप्रदेश, पुद्दुचेरीमध्ये उष्णतेची लाट असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.