मुंबई : स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ७५ दिव्यांग गरजू व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने शिलाई मशीन व पिठाची चक्की समारंभपूर्वक भेट देण्याचा कार्यक्रम राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे रविवारी संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग, हेतू चॅरिटेबल ट्रस्ट, जिल्हा न्यायिक सेवा प्राधिकरण - मुंबई उपनगर व ’सक्षम’ कोकण प्रांत या संस्थांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी दिव्यांग व्यक्तींच्या स्वावलंबनासाठी कार्य करणार्या ‘हेतू चॅरिटेबल ट्रस्ट’ला राज्यपालांनी पाच लाख रुपयांची देणगी जाहीर केली.
कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य विकास, पर्यटन व महिला आणि बालकल्याणमंत्री मंगलप्रभात लोढा, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती ए. ए. सय्यद, राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. कमलकिशोर तातेड (नि.), ‘सक्षम’ कोकण प्रांताचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश सावंत, ‘हेतू चॅरिटेबल ट्रस्ट’चे संस्थापक सचिव रिखबचंद जैन, मणी लक्ष्मी तीर्थचे विश्वस्त दिनेश मणिलाल शाह, राज्य मानवाधिकार आयोगाचे सदस्य एम. ए. सईद व भगवंत मोरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मुंबई उपनगरचे सचिव न्या. सतीश हिवाळे तसेच, दिव्यांग व्यक्ती व समाजसेवक उपस्थित होते.