मराठी तरुणांकरिता : ‘अग्निवीर’ भरती मेळाव्यापूर्वी ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षा

    11-Mar-2023   
Total Views |
'Agniveer' recruitment

‘अग्निवीर’ भरतीसाठी परीक्षा ऑनलाईन हिंदी किंवा इंग्लिशमध्ये आहे. नव्या बदलानुसार आता आधी ही ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. २०२३-२४च्या भरतीद्वारे लष्करात भरती होऊ इच्छिणार्‍या उमेदवारांना हा नवा बदल लागू होईल. ‘अग्निवीर’ भरतीसाठी पहिली ऑनलाईन चाचणी एप्रिलमध्ये देशभरात सुमारे २०० ठिकाणी घेतली जाणार आहे. नव्या बदलामुळे भरतीदरम्यान होणारी गर्दी कमी होईल आणि भरतीचे व्यवस्थापन व आयोजन सोपे होईल.


‘अग्निपथ’ योजनेला आव्हान देणार्‍या सर्व याचिका मंगळवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या. या निर्णयामुळे या योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेत हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण दिसत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. ही योजना आणण्याचा उद्देश देशाच्या सैन्याला उत्तम पद्धतीने तयार करणे हा आहे आणि ते देशाच्या हिताचे, असे मत न्यायालायने याचिका फेटाळताना म्हटले आहे.

‘अग्निपथ’ योजनेला आव्हान देणार्‍या याचिका देशाच्या विविध भागांत दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्चन्यायालयात पोहोचले होते. सर्वोच्च न्यायालयाने या सर्व प्रकरणांची सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयाकडे वर्ग केली होती.
सर्व याचिकांवर दिल्ली उच्च न्यायालयात सरन्यायाधीश सतीश चंद्र शर्मा आणि सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. त्यात या खंडपीठाने ‘अग्निपथ’ला आव्हान देणार्‍या सर्व याचिका फेटाळून लावल्या. ‘अग्निपथ’ योजना ही संरक्षण भरतीमधील सर्वांत मोठ्या धोरणात्मक बदलांपैकी एक बदल असेल.

‘अग्निपथ’ योजना भारतीय लष्करातील तज्ज्ञांनी तयार केली

न्यायालयानं म्हटलं की, “ ‘अग्निपथ’ योजना ऐच्छिक आहे. ज्यांना याबाबत कोणती अडचण असेल, त्यांनी सशस्त्र दलात भरती होऊ नये. भरतीसाठी ‘अग्निपथ’ योजना भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलातील तज्ज्ञांनी तयार केली. न्यायाधीश हे लष्करी तज्ज्ञ नसतात, असं त्यांनी स्पष्ट केलं.सरकारनं याबाबत विशेष धोरण केलं आहे. कोणते अधिकार काढून घेतले आहेत हे सिद्ध करावं, अन्यथा यात सामील होऊ नये. कोणतीही सक्ती नसेल. जर तुम्ही चांगले असाल, तर त्यानंतर (चार वर्षांनंतर) तुम्हाला कायमस्वरूपी समाविष्ट केलं जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.योजनेच्या नियमांनुसार, १७ ते २१ वर्षे वयोगटातील युवक अर्ज करण्यास पात्र आहेत. २०२२ मध्ये भरतीसाठी उच्च वयोमर्यादा २३ वर्षे केली.

दरवर्षी ५० हजार ‘अग्निवीर’

दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शंकांचं वादळ आता अजून शांत होईल. या योजनेंतर्गत सुमारे ५० हजार ‘अग्निवीर’ दरवर्षी भरती केले जातील. ही योजना सशस्त्र दलात चार वर्षांच्या सेवाकालासाठी असून, यातील २५ टक्के ‘अग्निवीरां’ना कायमस्वरूपी केडर म्हणून आणखी १५ वर्षं सेवेत कायम राहता येणार आहे. ‘अग्निवीर’ योजनेअंतर्गत पार पडलेल्या भरतीप्रक्रियेत तरुणांचा लाखोंच्या संख्येने सहभाग पाहता ते राष्ट्रसेवेसाठी इच्छुक असल्याचे दिसून येतं. त्यात ‘अग्निवीरां’च्या पहिल्या तुकडीने आपापल्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता या योजनेचं अधिक परिपक्व आणि व्यावहारिक पद्धतीने पुनरावलोकन करणं शक्य होईल.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात जुन्या प्रशिक्षणपद्धती सुरू ठेवणं चुकीचे १९९८ मध्ये सशस्त्र दलांसह सर्व केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांचं सेवानिवृत्तीचं वय हे दोन वर्षांनी वाढविण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे सैन्यदल, हवाई दल आणि नौदलातील जवानांच्या सेवाशर्तींमध्ये वेळोवेळी बदल होत गेले आहेत.याआधी भरतीनंतर तांत्रिक प्रशिक्षणामध्ये मोठा कालावधी जात असे. सध्याच्या काळात देशातील सर्व तरुण तंत्रज्ञानस्नेही आहेत, त्यामध्ये खेड्यांतील नागरिकांचाही समावेश आहे. सध्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहेत, प्रत्येक जण ‘डिजिटल पेमेंट’चा वापर करत आहे. अनेकांनी ‘आयटीआय’सारख्या संस्थांमध्ये प्रशिक्षण घेऊन भरतीच्या आधीच तांत्रिक शिक्षण घेतले आहे, अशा आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात जुन्याच प्रशिक्षणपद्धती सुरू ठेवणं चुकीचे व खर्चिक आहे. यामुळे, प्रशिक्षण कालावधी कमी करणं शक्य असून, मूलभूत प्रशिक्षण दिलं, तर लष्करात प्रावीण्यही मिळवता येईल. जगातील अनेक सशस्त्र दलांमध्ये असंच केलं जातं. ‘अग्निपथ’ योजना तयार होत असतानाही या मुद्द्यांबाबत परदेशी सेवाप्रमुख आणि शिष्टमंडळांशी चर्चा करण्यात आली होती, त्यामुळे प्रशिक्षणाच्या कालावधीपेक्षा प्रशिक्षणाची गुणवत्ता आणि कौशल्य जास्त महत्त्वाचे आहे.
 
‘अग्निवीर’ युनिटचा कार्यक्षम भाग बनतील

योजनेअंतर्गत ‘अग्निवीरां’चं ‘बाँडिंग’ आणि सहकार्याची भावना, तसंच वेळ आल्यावर ‘अग्निवीर’ याचं प्रदर्शन कसं करतील, या पैलूंवरही चर्चा झाली आहे, त्याची जबाबदारी युनिट्सवर आहे. भारतीय सैन्यदलात एक म्हण आहे - ‘कोणतीही युनिट चांगली किंवा वाईट नसतात, तर केवळ चांगले आणि वाईट अधिकारी असतात.’ जर युनिटमधील ‘वरिष्ठ’ चांगले असतील, तर ते ‘अग्निवीरां’ना युनिटचा कार्यक्षम भाग बनवतील.१९७१च्या युद्धापूर्वी कमी प्रशिक्षण कालावधीनंतर भरती झालेल्या जवानांना युनिट्समध्ये समाविष्ट केलं गेलं आणि काही महिन्यांतच ते लढाईला गेले होते. एक किंवा दोन महिन्यांत त्यांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली. तसेच या योजनेतील ‘अग्निवीर’ही सक्षम होतील.

तरुण जवानांमध्ये अधिक जोखीम घेण्याची क्षमता असते. आजवर बहुतांश ‘शौर्य’ पुरस्कार मिळालेल्यांमध्ये तरुण जवान जास्त आहेत. सुभेदार मेजर,योगेंद्रसिंह यादव फक्त १९ वर्षांचे होते. जेव्हा त्यांना कारगिल युद्धात त्यांच्या विशिष्ट शौर्यामुळे परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आलं होतं.‘अग्निपथ’ योजना तयार करताना केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राज्य पोलीस, तसेच इतर मंत्रालयांमध्ये या ‘अग्निवीरां’ना सेवेचा कार्यकाळ संपल्यानंतर ‘लॅटरल इंडक्शन’च्या (पुन्हा नियुक्ती) पैलूवर विचार केला गेला. ‘अग्निपथ’ योजनेच्या घोषणेनंतर ‘अग्निवीरां’च्या पुनर्वसनाच्या मुद्द्यावरून गृहमंत्रालय आणि काही राज्य सरकारांनी लगेच दहा टक्के ‘लॅटरल इंडक्शन’ची घोषणा केली होती.

संतुलन साधण्यासाठी लष्कर भरतीत बदल

भरती प्रक्रियेतून निवडले जाणारे उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि बुद्धिमान असतील. उमेदवारांच्या शारीरिक आणि वैद्यकीय चाचण्या या लेखी परीक्षेनंतर घेतल्या जातील, लेखी परीक्षेसाठी आता प्रत्येकी ५०० रुपये शुल्क असेल. त्यातही भारतीय लष्कर प्रत्येकी २५० रुपये देईल. त्यामुळे, उमेदवारांना प्रत्येकी २५० रुपयेच द्यावे लागतील. ‘अग्निवीरां’च्या भरतीची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, त्याची अधिसूचनाही जारी केली आहे.‘अग्निवीर’ भरतीसाठी परीक्षा ऑनलाईन हिंदी किंवा इंग्लिशमध्ये आहे. बोनस अंक ज्याने दहावी पासशिवाय, ‘आईटीआय’ दोन वर्षांचा कोर्स केला आहे, ‘एनसीसी’चे ‘बीसी’प्रमाणपत्र आहे, उत्कृष्ट खेळाडू आहेत, याला दिले जातील. यानुसार यापुढे लष्करात भरती होऊ इच्छिणार्‍या उमेदवारांना आधी ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षा (सीईई) द्यावी लागणार आहे.


त्यानंतर शारीरिक तंदुरूस्ती (फिजिकल फिटनेस) आणि वैद्यकीय चाचण्या द्याव्या लागतील. नव्या बदलानुसार आता आधी ही ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. २०२३-२४च्या भरतीद्वारे लष्करात भरती होऊ इच्छिणार्‍या उमेदवारांना हा नवा बदल लागू होईल. ‘अग्निवीर’ भरतीसाठी पहिली ऑनलाईन चाचणी एप्रिलमध्ये देशभरात सुमारे २०० ठिकाणी घेतली जाणार आहे. नव्या बदलामुळे भरतीदरम्यान होणारी गर्दी कमी होईल आणि भरतीचे व्यवस्थापन व आयोजन सोपे होईल.जे ‘सीईई’ पार होतील, त्यांना दुसर्‍या टप्प्यात, सैन्य भरती कार्यालयांद्वारे ठरविल्या जाणार्‍या ठिकाणी भरती मेळाव्यासाठी बोलावले जाईल, जिथे त्यांची शारीरिक क्षमता चाचणी आणि शारीरिक मोजमाप चाचणी घेतली जाईल. शेवटी तिसर्‍या टप्प्यात निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी होईल.


भरतीची तयारी कशी करावी?

भरती वैद्यकीय चाचणी एका चांगल्या डॉक्टरकडून करून घ्यावी. शारीरिक चाचणीमध्ये १६०० मीटर धावणे, लांब उडी मारणे आणि सिंगलबारवरती दहा पुलप्स काढणे हे सामील असते. त्याचा सराव करावा, व्यायाम करावा.लेखी परीक्षेची तयारी करावी. त्याकरिता पुस्तके मोठ्या पुस्तकाच्या दुकानात मिळू शकतील.भरतीसाठी राज्य शासनाची भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सातारा, कोल्हापूर, बुलढाणा या ठिकाणी आहेत. तरुणांनी या ठिकाणी जाऊन प्रशिक्षण घ्यावं.

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, भारताची लोकसंख्या जगातील सर्वांत तरुण लोकांमध्ये असल्याचं स्पष्ट होतं. मात्र, ही लोकसंख्या शिस्तबद्ध आणि राष्ट्रीय प्रेमाने प्रेरित असेल, तर ही त्या देशासाठी लाभदायक बाब असेल. ‘अग्निपथ’ योजनेचे देखील हेच तत्त्वज्ञान आहे, जे सशस्त्र दल, राष्ट्र आणि ‘अग्निवीरां’च्या फायद्याचं ठरेल. सर्व नवीन योजनांमध्ये सुरुवातीला काही अडचणी असतात. याचा विचार करता अभ्यासक्रम दुरूस्तीसाठी नेहमीच जागा असेल. त्यामुळे ‘अग्निपथ’योजना यशस्वी करण्यासाठी सामूहिक संकल्पाची, तसेच आवश्यक असल्यास सकारात्मक बदलांची गरज आहे.



 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

हेमंत महाजन

लेखक निवृत्त ब्रिग्रेडियर असून भारतीय सैन्य दल, राष्ट्रीय सुरक्षा तसेच भारताचे परराष्ट्रीय संबंध या विषयांवर त्यांचा खास अभ्यास आहे. ‘आव्हान चिनी ड्रॅगनचे’, ‘नक्षलवादाचे आव्हान-चीनचे भारताशी छुपे युद्ध’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.