सत्यजित तांबे हा तर ‘ट्रेलर’ आहे. तांबे ज्यांना कुटुंबप्रमुख मानतात, तेही सत्यजित तांबेंसारखे वागले, तर काँग्रेसचे काही खरे नाही!
अपक्ष म्हणून निवडून आल्यावर सत्यजित तांबे आता कोणत्या पक्षात जाणार किंवा कुंपणावर बसून कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. एकेकाळी राजकारणात भवितव्य आजमावू पाहणार्या सगळ्यांसाठी निषिद्ध असलेला पक्ष म्हणून ओळखल्या जाणार्या भारतीय जनता पक्षाने आपल्यासाठी दारे खुली करावी म्हणून एकेकाळचे रथी-महारथी आज पक्ष कार्यालये आणि नेत्यांचे उंबरे झिजवत आहेत. अर्थात, यांचे श्रेय मोदी-शाह व महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांना जाते. पण, मूळ मुद्दा आज भारतीय जनता पक्षाच्या महिमामंडनाचा नाही. मोदी प्रक्रियेचे कळस झाले असले, तरी ‘सुखाने पत्थर पायतले’ही अगणिक आहेत. आता मुद्दा आहे, तो सत्यजित तांबेंसारख्या उमेदवाराचा, जो स्वत:ची आणि पक्षाची मते मिळवून सहज निवडून येऊ शकत होता. मग तो स्वत:च्या पक्षापासून परागंदा का झाला? फडणवीसांनी काय चाल खेळली?
कोणाला कसे भेटत होते? कोणी कोणाला कोणती आश्वासने दिली? या सगळ्या गप्पा आता चालूच राहतील. पण, आपल्या पक्षात प्राण राहिला नाही, असे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटू लागले असेल, तर त्याला जबाबदार कोण? या प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल, तर आपल्याला थोडे मागे म्हणजे, गोव्याच्या निवडणुकांपर्यंत जावे लागेल. गोव्यात न्यायालयाच्या आदेशामुळे बंद झालेला खाण उद्योग, त्याचा गोव्याच्या जीवनमानावर झालेला परिणाम मतदानावर प्रभाव टाकेल, असे भाजपला वाटत होते. भाजपलाच काय, तर काँग्रेस आणि आपसारख्या गोव्यात काहीच पाया नसलेल्या पक्षांनाही तसेच वाटत होते. सगळे सर्व्हे गोव्यात काँग्रेसचे सरकार येण्याचा अंदाज वर्तवत होते. भाजप तिसर्या क्रमांकावर जाण्याची शक्यताही वर्तविली जात होती. खरोखरच स्थिती तशी होती की नव्हती? मग त्याचा मतदानावर का परिणाम झाला नाही? हे सर्व राजकीय गुलदस्त्यातले प्रश्न आहेत.
देवेंद्र फडणवीसांनी या निवडणुकीची जबाबदारी घेतली आणि ती यशस्वी करून दाखविली. गोव्यात भाजपचे सरकार स्थापन झाले. नंतर डॉ. प्रमोद सावंत यांनी उरलीसुरली काँग्रेसही संपवून टाकली. मग नेमके काय झाले होते? झाले असे होते की, आता देशभर पदयात्रा करत फिरणारे राहुल गांधी त्यावेळी गोव्यात गांभीर्याने गेलेसुद्धा नव्हते. एखादी ‘बाईक रॅली’ करून ते परत आले.महाराष्ट्रात जे आज काँग्रेसमध्ये चालू आहे, त्याला गांधी परिवार आणि त्यांचे खुशमस्करेच कारणीभूत आहेत. त्यांना कर्तृत्ववान माणसे नकोच आहेत. जी हजुरी करणारी, यात्रांचे महिमे गाणारी अशीच माणसे त्यांना लागतात. याची सुरुवात इंदिरा गांधींपासून झाली. सुरुवातीला त्यांनी राज्या-राज्यातली नेतृत्वे संपविली व आज स्थिती अशी आहे की, काँग्रेसकडे राज्यात औषधाला सुद्धा नेता उरलेला नाही. विलासराव देशमुखांनंतर तर राज्यात काँग्रेसकडे नेताच उरला नाही.
सुशीलकुमार शिंदेंसारख्या पक्षाने सर्वकाही दिलेल्या नेत्याने तर पक्षाकडे पाठच फिरविली आहे. पृथ्वीराज चव्हाण हे खरेतर दिग्गज, बुद्धिमान आणि सक्षम; पण त्यांना जनाधार नाही. संपूर्ण आयुष्य दिल्लीच्या आधाराने घालविल्याने त्यांना इथे स्वत:ची काहीच पाळेमुळे बसविता आली नाही. यानंतर जी काही मंडळी आहेत, ती सगळीच दुसर्या पिढीतील आणि घराण्यातून आलेली. धीरज देशमुख, अमित देशमुख, प्रणिती शिंदे, विश्वजित कदम ही त्यातली काही नावे. ही सगळी मंडळी उच्चविद्याविभूषित वडिलांच्या नावाने निवडून आलेली. आता निवडून आल्यावर त्यांना सदनात जाण्यापासून तरी कोण रोखणार, पण सदनातही या मंडळींचा वकुब अगदीच कमकुवत. कोणीही जीव तोडून लोकांचे प्रश्न मांडायचा प्रयत्न करीत नाहीत. सत्ताधारी पक्षासमोर प्रश्न विचारायचे तर सोडा, पण सत्तेत असताना विरोधी पक्षाला ताळ्यावर आणण्याचीही यांची हिंमत नव्हती. यातल्या एकालाही देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पक्षासमोर आव्हान उभे करता येणार नाही.
काँग्रेसची आजची ही स्थिती खुद्द काँग्रेसनेच करून घेतली आहे. जिथे कुणीच नेता नाही, अशा वेळी महसूलमंत्रिपद तरी मागण्याच्या स्थितीत ही मंडळी येतात. कारण, काँग्रेसचे मतदान असते आणि ते काँग्रेसलाच होते. विरोधाची म्हणून जी काही एक पोकळी आहे, ती काँग्रेसच्या माध्यमातून उत्तमरित्या भरून येऊ शकते. मात्र, ती आज कोणी भरायची, हाच प्रश्न आहे. ज्यांना पक्षाची पदे किंवा विधान परिषदेच्या, राज्यसभेच्या जागा मिळतात, ते ती मिळाली की पक्षाकडून पाठ फिरवतात. इतक्या अडचणीच्या क्षणालाही काँग्रेस राज्यसभेच्या जागा कुमार केतकरांसारख्या पत्रकाराला देऊन मोकळे होते, ज्याचा पक्ष, पक्ष संघटन किंवा सरकार यांना काहीच उपयोग नाही. घराणेशाही, कंपूशाही आणि खुशमस्कर्यांनी काँग्रेसला ग्रासले आहे. काँग्रेस संपणार नाही. मात्र, एखाद्या मरतुकड्या घोड्यासारखा टाचा घासत हा पक्ष टाचा झिजवत फिरत राहिला. महाराष्ट्रात जे सुरू आहे, ते पक्षाने स्वत: ओढावून घेतले आहे, तिथेही ज्यांना या गोष्टी पटत नाहीत, त्यांचे सूर क्षीण आहेत. सत्यजित तांबे हा तर ‘ट्रेलर’ आहे. नाना पटोलेंसारख्या वाचाळवीरांच्या हातात असलेली काँग्रेस उद्या सत्यजित तांबे ज्यांना कुटुंबप्रमुख मानतात, त्यांनाही गमावून बसली, तर महाराष्ट्रात एकही प्रतिभावान नेता काँग्रेसकडे राहणार नाही.