महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते ’यशस्वितांचा सत्कार’ करताना ‘जन शिक्षण संस्थान’ला खूप आनंद होत आहे. ‘जन शिक्षण संस्थान’ रायगड दि. ४ एप्रिल, २००४ रोजी स्थापन झाले. या संस्थेचे अलिबाग येथे त्याचे मुख्य कार्यालय आहे. या कार्यालयातून रायगड जिल्ह्यातील नवसाक्षर, अल्प साक्षर, साक्षर आणि शाळाबाह्य विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे होत असते. यासाठी आम्हाला भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाकडून मदत मिळत असते. आज यशस्वी झालेल्या आणि स्वतःच्या पायावर उभे असलेल्या व्यक्तींचा सन्मान आणि त्यांना प्रोत्साहन देणं, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. सहाण, अलिबाग येथे संस्थेची भव्य इमारत आहे. तेथे शैक्षणिक सहली, पर्यावरण संवर्धन माहिती, ज्येष्ठ नागरिकांना सहली अशा सुखसोयी पूर्ण निवासी सुविधा उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क - पर्यावरणपूरक प्रशिक्षण केंद्र ९९२२९९२९७१
मेधा सोमय्या एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. तरुण वयात राजकारण, लेखन, समुपदेशन. परंतु, त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे समाजाभिमुख दृष्टिकोन. बहुतेक वेळा समाजसेवा करताना फ्री सल्ला देणारे, त्याबद्दल लेखन करणारे, स्वप्न बघणारे बरेच जण असतात. परंतु, स्वप्न प्रत्यक्षात उतरवून १९ वर्षांत सातत्याने त्यात मग्न राहून त्या स्वप्नांना कृतीचे, प्रगतीचे पंख देणे हे फारच थोड्या लोकांकडून घडतं. या स्वप्नांमध्ये ‘जन शिक्षण संस्थान’, रायगड ही एक वेगळीच संस्था मेधा सोमय्याने दि. ४ एप्रिल, २००४ पासून केंद्र सरकारच्या मदतीने अलिबाग येथे सुरू केली.
माझे वडील पंत मराठे आणि वेद प्रकाश गोयल हे दोघे घनिष्ठ मित्र. मूलत: संघाचे स्वयंसेवक. मेधाने त्यांच्या हाताखाली समाजसेवेचे धडे गिरवले होते. त्याची आठवण ठेवून ‘जन शिक्षण संस्थे’च्या स्वतःच्या इमारतीत तिने दोघांच्या नावाने एका खोलीला ‘मैत्री कक्ष’ असे नाव दिले. त्या नामकरणाच्या कार्यक्रमाच्या वेळी मी, माझे बंधू तसेच पत्नी आणि श्री. व सौ प्रदीप गोयल संस्थेत गेलो होतो, अशा तर्हेने मला २०२२ मध्ये या संस्थेचे काम प्रत्यक्ष बघण्याचा योग आला आणि मी भारावून गेलो. बरेच वर्षं या संस्थेबद्दल ऐकून होतो. पण, संस्थेला भेट देण्याचा आणि प्रत्यक्ष काम बघण्याचा योग आला तो २०२२ साली. समाजातील अंतिम घटकांपर्यंत कौशल्यांची माहिती, प्रशिक्षण, उद्योगशीलता व आरोग्य याची ओळखच नाही तर प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊन त्यांच्यातील उद्योगशीलता कशी वाढेल? त्यांना ती कशी समजेल? याकडे अत्यंत बारकाईने लक्ष घालून या संस्थेने विविध उपक्रम राबवले आहेत.
या संस्थेचे सहाण, अलिबाग येथील मुख्य कार्यालय आहे. तिथे असलेली भव्य इमारत या कार्याची साक्ष आहे. गावागावातील विविध घटकांतील स्त्रियांना वेगवेगळ्या उद्योगांसाठी लागणारे प्रशिक्षण देणे, त्यांच्याकडून विविध गृहोपयोगी वस्तू बनवून घेणे आणि त्यांची विक्री करावी याचेही प्रशिक्षण देणे, हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.या माध्यमातून स्वतःच्या पायावर घर चालवणे इतकी क्षमता देणे हे काही सोपे काम नाही. जेव्हा संस्थेच्या दालनात विविध वस्तू, वारली चित्रांच्या तसबिरी बघितल्या, तेव्हा कलाकार कुठे कुठे लपलेला आहे, हे जाणवले. अनेक कौशल्य क्षेत्र शिवाय आरोग्य या विषयातील शिक्षण देऊन घरगुती औषधे, विविध फुलझाडांची लागवड आणि विक्री कशी करावी, खतांचा वापर रसायनांशिवाय कसा करता येतो, त्याचेही प्रशिक्षण दिले जाते. दररोजच्या कचर्यातून खत निर्मिती कशी करावी? आणि ती खते बाजारात विकण्यासाठी काय योजना राबवावी, हेसुद्धा शिकवले जाते. स्त्रियांना शिवणकाम हा विषय खूप आवडीचा विषय. त्यांना शिवण मशीनवर प्रशिक्षण देऊन त्याचाही अर्थार्जनाचा कसा उपयोग होतो, हे शिकवले जाते, त्याबरोबरच आधुनिकतेकडे ही लक्ष दिले गेलेले आहे.
येथे सौरऊर्जामार्फत विविध उपकरणे वापरून वीजनिर्मिती कशी करावी आणि विद्युतबिल कसे वाचवावे हेसुद्धा दाखवलेले आहे. या सर्व उपक्रमात वाचन संस्कृतीसाठी सुसज्ज वाचनालय उपलब्ध आहे. या संस्थेची इमारत म्हणजे समाजसेवेचे एक मंदिरच आहे, असा मला नक्कीच विश्वास आहे. येत्या काही वर्षांत अजून प्रगती होऊन त्याच्या अनेक शाखा निघतील आणि त्यातून समाजातील स्त्रिया, मुले यांना स्वबळावर आवश्यक ते प्रशिक्षण आणि उद्योगशीलता दिली जाईल, असे मला वाटते.\मी मेधा सोमय्या यांच्या ‘जन शिक्षण संस्थान’ या संस्थेस अनेक शुभेच्छा देतो आणि उत्तरोत्तर तिची प्रगती होत राहो ही प्रार्थना !
-अनंत मराठे