नाशिकमध्ये नुकतेच दोन दिवसीय अवयवदानविषयक राज्यस्तरीय अधिवेशन ‘श्रेष्ठदान महाअभियान’पार पडले. ‘मृत्युंजय ऑर्गन फाऊंडेशन’, ‘दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अॅण्ड बॉडी डोनेशन’ आणि ‘मविप्र’ संस्थेने आयोजित केलेल्या महाभियानाद्वारे शहरात अवयवदान संस्कृतीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले. मरणोत्तर देहदान आणि अववयदान याविषयी समाजात असलेले गैरसमज दूर व्हावे, तसेच या श्रेष्ठ दानाविषयी जनसमान्यात जनजागृती व्हावी, या उद्देशाने भरवण्यात आलेल्या महाधिवेशनचा उद्देश सफल झाल्याचे दिसून आले. अधिवेशनात वैद्यकीय शिक्षण अणि श्रेष्ठदान याबाबत वैद्यकीय क्षेत्राची अपेक्षित भूमिका, अवयव प्रत्यारोपण केंद्र आणि त्यांच्या समन्वयाची भूमिका, अवयवदान कायदा आणि अंमलबजावणीतील सुसूत्रता व सुधारणा, अवयवदान आणि स्वयंसेवी संस्थांची अपेक्षित भूमिका, अवदान चळवळ पोलिसांची भूमिका, प्रत्यक्ष देहदान आणि उतिदान प्रकियेतील अडचणी आणि उपाय, या आणि अशा महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांनी आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले. मरणोत्तर देहदान अथवा अवयवदानात समाजातील परंपरा रुढी, गैरसमज याचाही मोठा अडथळा असतो. मरणोत्तर नेत्रदान केल्याने दुसरा जन्म अंधाचा मिळतो, हा त्यातील एक गैरसमज. मात्र, हे सर्व शास्त्रोक्त अधिष्ठानावर पडताळून घासूनपुसून पाहण्यासाठी आणि त्याचे कार्यन्वयन करण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरले. मरणोत्तर देहदान केल्यास त्याचा फायदा वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेणार्याला जसा होतो तसाच तो समाजातील अवयवाची प्रतीक्षा करत असलेल्यांनाही होतच असतो. एका व्यक्तीच्या मरणोत्तर नेत्रदानाने दोन अंध व्यक्तीच्या जीवनात प्रकाश निर्माण होतो. त्यामुळे नेत्रदानाची चळवळ अधिक रुजण्याची गरज आहे. भारतासारख्या अधिक लोकसंख्येच्या देशात नेत्रदानाची चळवळ गतिमान व्हावी. मरणोत्तर त्वचादान चळवळहीनेही अद्याप बाळसे धरले नाही. या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचे आयोजन औचित्यपूर्णच. पथनाट्य, स्मरणिका, पुस्तिका, महादानाची लोकधारा हे अधिवेशनातील कार्यक्रम प्रभावी, बोधप्रद ठरले. अधिवेशानातून अधोरेखित झाले. एकूणच ‘महाअभियान २०२३’ सर्वाथाने सार्थ ठरले.
‘नंदिनी’साठी तात्पुरती मलमपट्टी
शहरातून वाहणार्या नद्या केवळ जीवनदायिनीच असतात असे नव्हे, तर त्यामुळे तिथे संस्कृती विकसित होण्यासह विकास अणि समृद्धीही येत असते. नदी प्रदूषणमुक्त आणि प्रवाही नितळ असते तिथे मानवी जीवन प्रवाही आणि समृद्ध झाले हा इतिहास. नाशिकमधून अनेक नद्या वाहत होत्या, आता त्यातील काहीच जीवंत आहेत. दक्षिणगंगा गोदावरीसह तिच्या अनेक उपनद्यांनी शहर एकेकाळी समृद्ध होते. कधीकाळी नंदिनी नदीही खळखळून वाहत असे, आज नंदिनीची ’नासर्डी ’झाली आणि तिला कचरा, नाल्याचे रुप मिळाले. आता ‘स्मार्ट सिटी’ कंपनीने नंदिनी नदीकिनारी २६ ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे लावण्यासाठी कार्यादेश आरंभ केला. हे योग्य पाऊल असले, तरी निसर्गाच्या जलप्रवाहांवर ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे लावण्याची वेळ का यावी, हा प्रश्न आहे. नंदिनी पात्रात नागरिक घाण, कचरा, प्लास्टिकचे तुकडे टाकून प्रदुषित करत असल्याचे वास्तव आहे. गदुर्ले, मद्यपी नंदिनीकाठी नशा करतात आणि घाण, प्लास्टिक नदीत टाकतात. नदी मृतप्राय होत नालासदृश झाली आणि गुन्हेगारांना या भागात लपण्यासाठी जागा मिळाली. मानवाने अशा पद्धतीने नदीचा गळा घोटल्यानंतर आता नंदिनी नदीकिनारी ‘सीसीटीव्ही’ लावण्याचा प्रयोग केला जात आहे. नदीचे पावित्र राखणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्यच आहे, ही जाणीव प्रत्येक नागरिकांमध्ये जोपर्यंत विकसित होत नाही, तोपर्यंत शेकडो ’सीसीटीव्ही’ लावून नदीप्रदूषणाचा प्रश्न सुटणार नाही, हेही तितकेच खरे. नदीस्वच्छता करणे हे केवळ राज्य, केंद्र शासन यांसह प्रशासनाचे काम नाही. त्यात लोकसहभाग, लोकजागृतीही आवश्यक ठरते. निसर्गाच्या प्रवाहांवर केवळ तिसर्या डोळ्यांची नजर ठेऊन प्रदूषण करणार्यांवर वचक बसवण्याचा हा तोकडा प्रयत्न. आज नंदिनीची अवस्था बकाल होण्यास तिच्या आसपासच्या वसातहतीमधील नागरिकही जबाबदार आहेत. नदीची स्वच्छता राखण्यासाठी, या भागात उपक्रम घेणे आणि प्रदूषण करणार्यांवर सक्त दंड लावणे हे पर्याय आहेत. नदी स्वच्छतेसाठी, प्रदूषणमुक्तीसाठी ही तात्पुरती मलमपट्टी आहे. खरा आजार वेगळाच असून त्यावर दीर्घकालीन उपयायोजना आवश्यक आहे. अन्यथा नाशिकमधील गोदावरीच्या सर्वच उपनद्या मृतप्राय होऊन गटारगंगा होतील.
-निल कुलकर्णी