विद्यापीठांनी देशाला पुढे नेणारी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

एचएसएनसी समूह विद्यापीठाचा पहिला पदवीदान समारंभ संपन्न

    11-Feb-2023
Total Views |
Bhagat Singh Koshyari


मुंबई : एचएसएनसी समूह विद्यापीठ ही एक दूरदर्शी संकल्पना असून विद्यापीठांनी नीतिमत्ता व मानवी मूल्ये यांच्या वाटेने देशाला पुढे नेणारी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी. यामुळे शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण होईल, असे प्रतिपादन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

शनिवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी एचएसएनसी समूह विद्यापीठाचा पहिला पदवीदान समारंभ एचएसएनसी विद्यापीठ, रमा सुंदरी वाटूमल सभागृह येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी राज्यपाल कोश्यारी बोलत होते. यावेळी पद्मश्री ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, विद्यापीठाचे मुख्य संरक्षक डॉ. निरंजन हिरानंदानी, एचएसएनसी बोर्डाचे अध्यक्ष अनिल हरीश, माजी अध्यक्ष किशु मानसुखानी व कुलगुरु डॉ हेमलता बागला आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, अध्यात्मावर आधारित आपल्या देशाची संस्कृती महान आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. आपली शिक्षण पद्धती ही आदर्श असून अनेक देशांनी तिचा स्वीकारही केला आहे. ज्याप्रमाणे आज योगाभ्यास शिकण्यासाठी अनेक देशातील नागरिक आपल्या देशात येत आहेत त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रातही इतर देशातील नागरिक आपल्या देशाला नक्कीच प्राधान्य देत आहे. तसेच विद्यापीठांनी रोजगारक्षम तरूण पिढी घडवावी, अशी आशाही राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

आपल्या देशातील मातृशक्ती महान असून महिलांना नेहमीच सर्वेच्च स्थान दिले आहे. आज आपल्या देशातील महिलांनी सर्वच क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. आज आयएएस परिक्षा पास होणाऱ्या यादीत पहिल्या तीन महिला आहेत. तसेच या विद्यापीठात विद्यार्थ्यांना पदवीप्रदान करतानाही मुलींची संख्या जास्त आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कोणतेही काम छोटे किंवा मोठे नाही नोकरी किंवा व्यवसाय करताना प्रामाणिकपणे कष्ट केल्याने यश नक्की मिळते. या तत्वाचा अवलंब करून समाजासमोर आदर्श निर्माण करावा, असेही कोश्यारी यांनी म्हटले आहे.

भारतीय असल्याचा मला अभिमान

 
पद्मश्री ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर म्हणाले, भारतीय असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण आपल्या देशाची संस्कृती महान आहे आणि अर्थातच आपली शिक्षण पद्धती खूप चांगली आहे. ज्ञान, बुद्धी, आचार, समता आणि मूल्सवंर्धनावर आधारित शिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांमध्ये अमुलाग्र बदल घडून येतील. त्यामुळे या पद्धतीवर आधारित शिक्षण देणे गरजेचे आहे. बदलत्या काळाची आव्हाने लक्षात घेऊन कौशल्यपूर्ण शिक्षणानेच सक्षम विद्यार्थी आणि सक्षम भारत घडेल, असेही ते म्हणाले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते विदयार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.