मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नात्यातील शाहीर दीनानाथ साठे-वाटेगावकर यांचे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, चार मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.
शिक्षणासाठी १९५६ मध्ये साठे वाटेगावहून पुण्यात शिक्षणासाठी आले. त्यानंतर के. टी. मंगल विद्यार्थी मंडळातून टी. डी. गायकवाड, दादासाहेब पवार, शंकरराव मात्रे यांच्यासमवेत त्यांनी सामाजिक कार्यास सुरुवात केली. खासदार अप्पासाहेब मोरे, खासदार देवराम कांबळे, आमदार तात्यासाहेब भिंगारदिवे यांना एकत्र आणून त्यांनी मातंग समाजाचे संघटन केले. लोकशाहीर अण्णा भाऊंच्या शाहिरीचा पगडा असलेल्या दीनानाथ साठे यांनी त्यांची शाहिरी जतन आणि करण्यासाठी हातामध्ये डफ घेतला. १९६९ पासून ते अखेरपर्यंत त्यांनी शाहिरीचे शेकडो कार्यक्रम केले.
साठेंच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे झाल्यास ते पुणे जिल्हा परिषदेत उप जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या माध्यमातून शाहिरांच्या न्याय्य मागण्यांसाठी सातत्यानं लढा दिला होता. याशिवाय त्यांचा अण्णा भाऊ साठे स्मारक समिती, अण्णा भाऊ साठे फाउंडेशन, वीर लहुजी वस्ताद प्रतिष्ठानमध्येही मोठा सहभाग होता. तसेच, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या वतीने त्यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.