मथुरा आणि होळकर घराण्याचे ऋणानुबंध

    23-Dec-2023
Total Views |
Article on Mathura and Holkar Family Relation

भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी असलेल्या मथुरेचा आणि होळकरांचा फार जुना संबंध. सुभेदार मल्हारराव होळकर यांनी स्थापन केलेल्या होळकर राजघराण्याचे पूर्वज मथुरेजवळच्या धनगावचे रहिवासी होते. तेथून ते चित्तोड-मुंगी-पैठण करत, दक्षिणेत आले. पुढे त्यांच्या घराण्यात शूरवीर, पराक्रमी पुरूष देवगिरीचे यादव तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात दाखल झाले असावे. होळकरांनी आपल्या घराण्यांची वंशावळ लिहून घेताना, वंशावळीत मथुरेचा उल्लेखही केलेला आढळतो. त्यानिमित्ताने मथुरा आणि होळकर घराण्याच्या ऋणानुबंधांवर प्रकाश टाकणारा हा लेख...

वंशावळीत म्हटले आहे की, कुळ वीरकर. वाल्ह्याचा वीरकर. दुसरे आडनाव होळकर. कुळगोत्र जयवसी देवरुसी कपीला गोकुळ मथुरा, दुसरी वस्ती चितोडगड, तिसरी वस्ती मुंगी पैठण, चौथी वीर वोहोळ, पाचवी वस्ती वोहोळ मुरूम मोगलाई आहे, सहावी वस्ती वाफगाव पाटीलकी आहे, सातवी वस्ती कातराबाद मांडवगण पाटीलकी आहे, आठवी वस्ती चांदवड, नववी वस्ती महेश्वर नर्मदाकाठी, दहावी वस्ती इंदौर. याप्रमाणे होळकरांचा वंश विस्तार झालेला असल्याने, मथुरा ते इंदौरदरम्यान सात-आठ पिढ्यांचा कालखंड दिसून येतो. मल्हारराव होळकर माळव्याचे सुभेदार झाल्यानंतर, ते उत्तरेत मोहिमेवर असताना, त्यांनी मथुरेच्या राधाकृष्णभट तिवारी यांना आपल्या घराण्यांचे पुरोहितपण दिल्याचे पत्र आढळून येते. पत्रात म्हटले आहे की, “आमच्या वंशाचे पुत्र पौत्र अर्थात वंशपरंपरागत आपणास व आपल्या वारसदारांना पूजतील. आपण भगवान श्रीकृष्ण यांची पूजा नियमित करून, ज्या-ज्या वेळी मथुरेत आमच्या घराण्यांचे सदस्य येतील, त्यांच्या हातून भगवान श्रीकृष्ण यांची पूजा-अर्चा करावी.”

पत्राची सुरुवात श्रीमोरया असून, वेदमूर्ती राजश्री राधाकृष्णभट तिवारी, वास्तव्य मथुरा यांच्या नावाचे सदरील पत्र आहे - “स्वामीचे सेवेसी आज्ञाधारक मल्हारजी होळकर कृतानेक सा. विनंति. उपरि तुम्ही भले ब्रज क्षेत्र वासी जाणून श्री क्षेत्राचे पुरोहितपण दिले, असे आमचे वंशाचे पुत्र पौत्रादि करून, ते तुम्हास पूजतील. मिति ज्येष्ठ संवत् १७६८ सल्लास श्रार्बेनमय्या व अलफ विनंति. श्री मोर्तब सुद.” असा मजकूर पत्रात आढळतो.

कुंभेरीच्या सूरजमल जाटाकडून एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी सुभेदार मल्हारराव होळकर कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा देतात, यावेळी त्यांचे पुत्र श्रीमंत खंडेराव होळकर हे जयपूर येथे माधवसिंह आणि इश्वरसिंह यांच्यातील उत्तराधिकारीपदाचा वाद सोडवण्यासाठीच्या मोहिमेवर असतात. तेथील मोहीम आटोपून, ते डिसेंबर १७५३ दरम्यान दिल्लीत येतात. दिल्लीत असताना, त्यांना मल्हारराव होळकर पत्र लिहून, तातडीने कुंभेरीस बोलावून घेतात. दिल्ली येथून फरिदाबाद, पलवल, धुन करीत ते जानेवारी १७५४ मध्ये कुंभेरीस येत असताना, खंडेरावांनी आपल्या चार हजार सैन्यांच्या तुकडीला घेऊन जोरू, बरसाना, गंगूला गढ्या ताब्यात घेऊन, घासेरा किल्ल्यावर विजय मिळवला होता. खंडेराव होळकर यांच्या मोहिमेमुळे जाट सैनिकांत भीती पसरली होती. होळकरांनी डीग ते कुंभेरी असा मोठा प्रदेश ताब्यात घेतला होता. मराठ्यांची छावणी गांगरसोली, नौलखादरम्यान पसरलेली होती. सूरजमल जाटाचा पुत्र जवाहीरसिंग भयभीत होऊन, बरसाना येथून तो डिग येथे पळाला होता.

खंडेरावांची पित्यासारखीच शत्रूंमध्ये दहशत होती. कुंभेरीतील वेढा मल्हाररावांनी अधिक कडक केल्याने, सूरजमल जाटास बाहेरून येणारी रसद बंद झाली. किल्ल्यात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ लागला. दररोज होळकरांच्या आणि जाटांच्या फौजेत चकमकी होत होत्या. दि. १७ मार्च १७५४ रोजी खंडेराव होळकर युद्ध मैदानाचे निरीक्षण करत असताना, कुंभेरीच्या किल्ल्यावरून अचानक तोफांचा मारा सुरू झाला. खंडेरावांना तोफगोळा लागताच, जागीच गतप्राण झाले. खंडेराव होळकर यांचे कुंभेरीत बलिदान झाल्याचे समजताच युद्ध थांबले. त्यांचे पार्थिव गांगरसोली येथील छावणीत आणून, त्यांच्यावर अंतिम संस्कार केले. यावेळी खंडेरावांना मालेराव आणि मुक्ता ही दोन छोटछोटी मुलं होती. पतीसोबत सती जाण्यासाठी निघालेल्या, पुत्रवधू अहिल्यादेवींना मल्हाररावांनी थांबवले.

मथुरेतील यमुनेत खंडेरावांच्या अस्थी विसर्जन करताना, मल्हारराव खंडेरावांच्या बलिदानाचा बदला घेण्याची शपथ घेतात की, “कुंभेरीची माती खनून यमुनेत टाकीन, तरच मल्हारराव नाव लावीन.” रागाने लालबुंद झालेल्या मल्हाररावांनी पुन्हा युद्ध सुरू केले. जाटांच्या सैन्याची कत्तल सुरू झाली. या युद्धाचा गंभीर शेवट होईल, असा अंदाज सूरजमल जाटाची पत्नी राणी किशोरी हिला आल्याने, राणी किशोरीने सेनापती रूपराम कटराचा पुत्र तेजराम कटरा यांस जयप्पा शिंदे यांच्याकडे मल्हाररावांपासून पती सूरजमल यांस जीवदान मिळावे, यासाठी पगडी आणि पत्र पाठवते. जयप्पा शिंदेच्या मनात मल्हाररावांबद्दल आधीच ईर्षा होती, त्याने राणी किशोरीचे पत्र मिळताच, राघोबादादास आपल्या पक्षात करून मल्हाररावांना युद्ध थांबवण्याचे साकडे घातले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. मल्हाररावांनी आपल्या एकुलत्या एक पुत्राचा वियोग करत, युद्ध थांबवण्याचा निर्णय घेतला, तर सूरजमल जाटाने ३० लाख रुपये खंडणी देऊन, कुंभेरीचा तह केला.

तहानंतर लगेच किल्ल्याचा वेढा काढून घेण्यात आला. मल्हारराव कुंभेरी सोडताना, शास्त्री सूर्यनारायण पौंडरीक यांना अंत्यसंस्कार विधीबद्दल सरकार कोईल परगणा शाहबाद येथील पछावरा नामक गाव जहागीर स्वरुपात भेट देऊन रवाना होतात.
वृंदावन येथे अहिल्यादेवींच्या नावाने ‘अहिल्या गंज’ नावाने एक गाव वसलेले असून, येथील रहिवासी हे दक्षिणेतून उत्तरेत पानिपतच्या युद्धासाठी होळकरांच्या फौजेत गेले होते. लढाईतून परत येत असताना, चैनबिहारी मंदिर परिसरात होळकरांची मोठी छावणी होती. या छावणीचे रुपांतर गावात बदलले गेले. मथुरेच्या आसपास अनेक लोकांनी वस्ती केलेली आढळून येते. अहिल्यादेवींनी भारतातील बारा ज्योतिर्लिंग, चार धाम आणि सप्तपुरीसह दहा हजारांपेक्षा अधिक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. तसेच शेकडो नवीन मंदिर निर्माण केले. हे लोकोत्तर व धाडसाचे काम करण्यासाठी त्यांनी कुठेही युद्ध केले नाही वा फौजेचा उपयोग केला नाही.

स्थानिक शासकांच्या मदतीने भारताची क्षतिग्रस्त आस्था मोठ्या अभिमानाने त्यांनी उभी केली, म्हणून त्यांना ’गंगाजळ निर्मळ पवित्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ असे म्हटले जाते. भारतातील तीर्थक्षेत्र, तेथील पूजारी, गुरव, सेवेकरी यांना संरक्षण, पूजा-अर्चा आणि विविध उत्सवांचा मान बहाल करून त्यांना वर्षासन बहाल केले. यातून सर्व मंदिरात पूजा-अर्चा, वार्षिक उत्सव, जत्रा-यात्रा सुरू झाल्या, ज्यातून हिंदू धर्माची पताका डौलाने फडकत आहे.

होळकर राजघराण्यातील थोरले सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराजा यशवंतराव होळकर यांनी मथुरा येथे भगवान श्रीकृष्ण दर्शनासाठी भेटी दिल्याच्या नोंदी असून, होळकरांच्या दोन्ही देवघरांत भगवान श्रीकृष्ण यांची सुवर्णाची मूर्ती असून, रत्नजडित पाळणादेखील पाहायला मिळतो.

रामभाऊ लांडे
(लेखक होळकर राजघराण्याचे अभ्यासक आहेत.)
९४२१३४९५८६