जे. जे. महाविद्यालयाच्या जुन्या आठवणीत रमणारे नाना पाटेकर

    22-Dec-2023
Total Views | 63
Talk With Actor Nana Patekar

विश्वनाथ दिनकर पाटेकर अर्थात नाना पाटेकर यांनी ५० वर्षं मराठी, हिंदी नाटक-चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारल्या. कधी देशभक्तीवर आधारित भूमिका, तर कधी एका सच्च्या मित्राची त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा मनाला भावून गेली. वयाची सत्तरी पार केल्यानंतरही एका वात्रट, मस्तीखोर वडिलांची भूमिका साकारण्याची संधी नाना पाटेकर यांना ‘ओले आले’ या चित्रपटातून मिळाली. वडील आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणारा, हा चित्रपट एक प्रवासपर चित्रपटदेखील असून, आनंदी जगणं विसरलेल्या मुलाला जीवनाचा खरा आनंद कशात आहे, हे शिकवणार्‍या वडिलांची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. ‘ओले आले’ चित्रपट दि. ५ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाच्या निमित्ताने नानांशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला हा खास संवाद...

महाविद्यालयीन काळात मी एक वात्रट मुलगा होतो!


नाना पाटेकर जे. जे. महाविद्यालयाचे विद्यार्थी. आपल्या तरूण वयातील मजा-मस्तीचे किस्से सांगताना, नाना जुन्या आठवणीत रमले. नानांनी बसच्या कंडक्टरचा एक मजेशीर किस्सा सांगितला. ते म्हणाले की, ”जे. जे. महाविद्यालयाचे आम्ही सगळे विद्यार्थी होतो. त्यावेळी महाविद्यालयातून घरी बसने जाताना, खरं तर खूप वात्रटपणा करत होतो. त्यावेळी माझ्यासोबत जे सहकलाकार किंवा विद्यार्थी होते-ते म्हणजे संध्या, वीणा, आशा, रेखा, राजेश, सतीश पुळेकर अशी आमची टोळी महाविद्यालयातून घराकडे निघाली की, आम्ही बस पकडायचो. पण, बसने प्रवास करताना, तिकिटाचे पैसे माझ्याकडे नसायचे. मग कुणीतरी माझे तिकीट काढायचे. बसमधल्या त्या कंडक्टरला आम्ही भंडावून सोडायचो. ४० पैशांची आठ तिकिटे आम्ही मागायचो, त्यावर कंडक्टर आम्हाला कोणत्या स्टॉपला उतरायचे, असं विचारायचा. पण, आम्ही त्यांची खिल्ली उडवण्यासाठी, ४० पैशांची तिकीट ज्या स्टॉपला संपेल, त्या ठिकाणाच्या आठ तिकीट द्या, असा जोर लावून बसायचो. त्या कंडक्टरला येणार्‍या रागात आम्हाला काय सुख मिळायचं माहीत नाही; पण आम्ही खोड्या काढायचो.”

काळानुरूप विनोदाच्या व्याख्या बदलल्या. कधी कुणाची टिंगल केली आणि त्यांना ती आवडली नाही, तर त्यावर व्यक्त होण्याची माध्यमं आणि स्वभावदेखील बदलत गेले. यावर आपले मत नोंदवताना नाना म्हणाले की, ”६०-७०च्या दशकात कुणाची टिंगल केली किंवा कुणावर विनोद केला, तर त्यावर लोक फार हसत व्यक्त व्हायचे. पण, आता परिस्थिती बदलली असून, कोणाला कधी वाईट वाटेल आणि त्याचा कसा परिणाम होईल, हे सांगता येत नाही.” असेदेखील नाना यांनी म्हणत, सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले. जाती-धर्म नव्हते. शाळेत किंवा महाविद्यालयात सगळे एकत्र बसून डबे खात होते. ‘तुझी जात कोणती’ हे विचारून कोणी डबा खात नव्हतं. मात्र, काळानुरूप सगळ्याच बाबी बदलल्या असल्याची खंतदेखील नानांनी व्यक्त केली.

माणूस कितीही वयाने मोठा झाला, तरी आपल्यातील लहान निरागस मूल कधीच मोठं होऊ देऊ नये, असे म्हटले जाते. याच वाक्याला अनुरूप आपले विचार जोडत, जीवनात कायम आनंदी राहण्याचे त्यांचे तत्त्व सांगत नाना म्हणाले की, ”आज मी ज्या हुद्द्यावर आहे किंवा अभिनेता म्हणून माझी ओळख आहे, उद्या कदाचित हे सारं पुसलं जाईल. त्यामुळे भविष्यात जर का आपली ओळख पुसली जाणार असेल, तर त्याचा मिजास वर्तमानकाळात का मिरवायचा?” असा प्रश्न उपस्थित करत, प्रत्येक क्षण सुखाचा घालवावा, असा सल्लादेखील नानांनी दिला.

रसिका शिंदे-पॉल
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121