'खर्गे' आणि 'मोदी' यांच्यामध्ये जनता मोदींनाच निवडेल!

अजित पवार; दोघांच्या नेतृत्त्वात मोठा फरक

    22-Dec-2023
Total Views |
Mallikarjun Kharge

मुंबई : 'इंडी' आघाडीचे नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात मोठा फरक आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनता नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा कौल देईल, असे ठाम मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
 
नरिमन पॉइंट येथील महिला विकास मंडळ सभागृहात शुक्रवार, दि. २२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) संघटनात्मक बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. पवार म्हणाले, आम्ही जी भूमिका घेतली आहे, त्यात आता कोणताही बदल होणार नाही. हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आलो, की कार्यकर्त्यांना वाटते, आम्ही एकच आहोत. त्यामुळे कशाला वाईटपणा घ्यायचा, असे काहींचे मत आहे. पण, आता आपण पुढे आलो आहोत. कुठेही कसलीही मॅच फिक्सिंग नाही. जी भूमिका घेतली, त्यात आता कोणताही बदल होणार नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

भाजपच्या तिकिटावर लढणार नाही!

येत्या मार्चपर्यंत आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे संघटनात्मक बांधणी वाढवा. लोकसभेनंतर चार महिन्यातच विधानसभा लागणार आहेत. मागच्या वेळेपेक्षा अधिक जागा आपल्याला जिंकायच्या आहेत, असा निर्धार करून तयारीला लागा. आरक्षणाविषयी बोलता काळजी घ्या. कायद्यानुसार आरक्षण सगळ्यांना मिळाले पाहीजे, बोलताना गैरसमज निर्माण करु नका. कोणतीही चर्चा अथवा काम करताना मित्रपक्षांना इजा होईल, असे करू नका. आपण भाजपच्या तिकीटावर लढणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच महायुतीत लढणार आहोत, असेही पवार म्हणाले.