परकीयांची या टाकू पुसुनी, येथील नावनिशाणी...

    16-Dec-2023
Total Views |
Indian navy new flag inaugurated By PM Modi

मराठ्यांच्या आरमाराला समुद्राचे दरवाजे उघडणार्‍या, छत्रपती शिवाजी महाराजांचा देशाने केलेला मोठा सन्मान होता. नव्या ध्वजाच्या अष्टकोनी बोधचिन्हाच्या खाली देवनागरीत ‘शं नो वरुणः’ हे भारतीय परंपरेतील बोधवाक्य आहे. याचा अर्थ ’पाण्याची देवता वरूण आपल्यासाठी मंगलकारी होवो.’ नौदलाचा नवीन ध्वज म्हणजे आपली स्वतंत्रतेकडे केलेली वाटचाल आहे.

सिंधुदुर्ग हा,
विजयदुर्ग हा,
हा अंजनवेल।
शिवरायांच्या मर्दुमकीची
ग्वाही सांगेल!
दि. २६ नोव्हेंबर २००८...मुंबई भारताची अर्थिक राजधानी. मूठभर दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. सुमारे तीन दिवस मुंबईत दहशतीचे थैमान घातले. हे सर्व दहशतवादी समुद्रमार्गे भारतात ‘जिहाद’ करण्यासाठी आले होते. देशाच्या सागरी सुरक्षेकडे आमचे लक्ष होते का? पण, ३५० वर्षांपूर्वी भारतभूमीच्या एका सुपुत्राने किती दूरगामी विचार केला होता, समुद्रामार्गे देशाला असणारा धोका ओळखला होता, त्या रणधुरंधर सुपुत्राचे नाव होते-छत्रपती शिवाजी महाराज!

१५-१६व्या शतकात निरनिराळ्या युरोपियन राजवटींनी व्यापाराच्या निमित्ताने कोकणात शिरकाव करून घेतला होता. इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांनी व्यापारासाठी आरमार बनवले. व्यापाराबरोबरच येथे आपले राज्यच थाटावे, अशी त्यांची महत्त्वाकांक्षा होती. जंजिरेकर सिद्दी तर वेळोवेळी वेगवेगळ्या मुसलमानी सत्ताधार्‍यांचा पाठिंबा घेऊन वाटेल, तसा हैदोस घालत होते. आदिलशाही, सिद्दी व पोर्तुगीजांचे अत्याचार, जबरदस्तीने केली जाणारी धर्मांतरे, पाडले जाणारे मंदिरे, कोकण प्रांतातील जनतेला परदेशात गुलाम म्हणून पाठवले जाणे, हा किनार्‍यावर नेहमी होणारा प्रकार होता. प्रजेवर पुत्रवत प्रेम करणार्‍या शिवाजी महाराजांना हे सहन होणे शक्यच नव्हते.

कोकण किनारपट्टीवरील प्रजेवर अत्याचार करणार्‍या जलचर राजवटींना पायबंद घालण्यासाठी, महाराजांनी बलाढ्य आरमाराची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि धनत्रयोदशी अर्थात वसुबारसच्या शुभमुहूर्तावर दि. २४ ऑक्टोबर १६५७ रोजी महाराजांनी आरमाराचा पाया घातला. कल्याण, भिवंडी आणि पेण इथे मराठी आरमाराची जहाजं बांधायला सुरुवात झाली. गलबत, गुराब, पाल, शिबाडे, तारवे आदी नौकांची निर्मिती सुरू झाली.

महाराजांना दर्‍याभवानी प्रसन्न झाली. आरमाराची उभारणी सुरू असताना, महाराज स्वस्थ बसले नाहीत. हिंदूंवर अत्याचार करणार्‍या गोव्यातील पोर्तुगीजांवर महाराजांनी झंझावाती हल्ले चढवले. डोंगरातला शिवाजी आता समुद्रात उतरतो आहे, हे ऐकून परकीय सत्ता भयभीत झाल्या! इसवी १६६६ शिवरायांचे आरमार इतके मोठे झाले होते की, त्याचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य इंग्रजात नव्हते, ही त्यांचीच कबुली आहे. त्यावर्षी शिवरायांच्या आरमारात १६० जहाज होती. आपण जगातील उत्तम दर्यावर्दी आहोत, अशी घमेंड मारणार्‍या इंग्रजांचा शिवाजी महाराजांनी समुद्रात पराभव केलेला आहे. बसरूर शहरावर महाराजांनी समुद्रमार्गेच स्वारी केली होती.

आपल्या प्राचीन काळीही नौकानयनाचा उपयोग व्यापार आणि युद्धासाठी जात होता. चंद्रगुप्ताचे नौदल खाते अतिशय सुव्यवस्थित होते. त्यांचे युद्धासाठीही सुसज्ज नौदल होते. पण, कालौघात समुद्रपर्यटन करणे म्हणजे पाप अशी घातक रूढी तयार झाली; पण देशाच्या सुरक्षेचा दूरदृष्टीने विचार करणार्‍या, शिवाजी महाराजांनी ही घातक रुढी समुद्रात बुडवून टाकली. केवळ लढाया करणे एवढाच आरमाराचा हेतू नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज हे जाणते राजे होते. परकीय लोक आपला माल विकतात आणि नफा मिळवतात त्यांना शह देण्यासाठी आपला माल आपणच विकावा, यासाठी आपली जहाजे इराण, मक्का आणि मस्कतला जाऊ लागली होती, त्यांना संरक्षण देण्यासाठीही आरमाराची आवश्यकता होती.

केवळ सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यातच नाही, तर समुद्रातही शिवरायांनी स्वातंत्र्याचे वादळ आणले. कोकणवासीयांच्या मनात स्वाभिमानाची लाट निर्माण केली आणि सिंधू सागरात स्वतंत्र आरमाराची उभारणी केली. महाराजांनी मालवणमध्ये आरमाराचे केंद्र म्हणून बलाढ्य जलदुर्गाची निर्मिती केली. समुद्रात उभा असलेल्या या भक्कम जलदुर्गाने परकीय शत्रूच्या मनात धडकी भरवली. या जलदुर्गाचे नाव आहे-’सिंधुदुर्ग.’ शिवाजी महाराजांनी कुरटे बेटावर किल्ले सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पायाभरणीचा शुभारंभ मोरयाचा धोंडा येथे केला. दि. २५ नोव्हेंबर १६६४ या पवित्र दिवशी.

हा मंगल सोहळा श्रीगणेश पूजनाने पार पडला होता. बांधकाम मोठ्या हौसेने, उमेदीने केले. पायाचे दगड शिशाच्या रसात बसविले. तीन हजार कामगार अहोरात्र कष्ट करत होते. मदतीला म्हणून काही पोर्तुगीज इंजिनिअर्सही मुद्दाम मागवून घेतले होते. या कामावर महाराजांचे जातीने लक्ष होते. सागरी स्वराज्याच्या या मंगलकार्यात शत्रूने विघ्न आणू नये, यासाठी किनार्‍यावर मराठी फौज तैनात होती. याशिवाय सागरी सीमेच्या रक्षणासाठी महाराजांनी अनेक जलदुर्गांची निर्मिती केली. सिंधुदुर्ग हा भव्य जलदुर्ग सिंधू सागरात शिवचरित्राचे मर्म सांगत उभा आहे. सिंधुदुर्गाच्या भक्कम तटांनी आणि सिंधू सागराच्या लाटांनी स्वातंत्र्याची गर्जना करत, परकीय शक्तींना आव्हान दिले. या आव्हानामागची प्रेरणा होती, अर्थातच शिवछत्रपतींची!

मराठ्यांच्या आरमाराचा पुढील इतिहास म्हणजे कान्होजी आंग्रे आणि त्यांच्या वंशजांनी समुद्रावर बसवलेला जबरदस्त धाक. पोर्तुगालचा राजा म्हणजे ‘सातासमुद्राचा धनी’ अशी समजूत होती, त्यामुळे समुद्रावर संचार करण्यासाठी पोर्तुगीजांचा परवाना अर्थात ’कार्ताझ’ घ्यावा लागत असे. यातून मुघल बादशाहाचीही सुटका नव्हती. त्यामुळे मराठ्यांनी या जलचर सत्तांपेक्षा आपले आरमार बलशाली करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. समुद्रावर संचार करण्यासाठी मराठ्यांचा दस्तक घ्यावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण केली. कान्होजी आंग्रे यांनी मुंबई बंदराची पूर्ण नाकेबंदी करून, ईस्ट इंडिया कंपनीकडून ८७५० पौंडाची खंडणी वसूल केली. १७२० मध्ये इंग्रजांनी कान्होजींच्या विजयदुर्ग किल्ल्यावर हल्ला चढवत तोफांचा मारा केला; पण हा हल्ला अपयशी ठरला. इंग्रजांना पुन्हा माघार घ्यावी लागली.

कान्होजी आंग्रेंच्या नेतृत्वात मराठ्यांच्या आरमारात एवढे सामर्थ्य निर्माण झाले की, १७२१ मध्ये पोर्तुगीज आरमाराने आणि इंग्रज आरमाराने मिळून सहा हजार सैनिकांसह आणि चार मोठ्या जहाजांसह कान्होजींविरुद्ध संयुक्त मोहीम हाती घ्यावी लागली. कान्होजी आंग्रेंना इंग्रज आणि पोर्तुगीज आरमारसुद्धा घाबरून होते. शेवटपर्यंत त्यांनी समुद्र संरक्षण करण्यात आपले आयुष्य खर्ची केले. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा हृदयात धारण करत, आंग्रे घराण्याने समुद्रावर मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले.

पण, दुर्दैवाने आम्ही ही दृष्टी टिकवू शकलो का? आरमाराचा अभाव म्हणजेच पारतंत्र्य हे आमच्या लक्षातच आले नाही. म्हणूनच आम्ही इंग्रजाचे गुलाम झालो. भारताच्या स्वातंत्र्यानंतरही इंग्रज गेले, तरीही गुलामीची मानसिकता कायम राहिली. ती आजही आमच्या व्यवहारात कायम दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला स्वत्वरक्षणाचा आदर्श घालून दिला आहे. स्वभाषेला उत्तेजन देण्यासाठी महाराजांनी ’राजव्यवहारकोशा’ची निर्मिती केली, त्याकाळी मुद्रा या फारसी भाषेत असत; पण महाराजांनी आपली राजमुद्रा संस्कृत भाषेत केली. शिवचरित्राचे संस्कार झालेले आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे पंच-प्रण सांगितले, त्यात गुलामीच्या मानसिकतेतून मुक्ती हेदेखील एक प्रण आहे. शिवभक्त असणार्‍या देशाच्या पंतप्रधानांनी नौदलाच्या ध्वजावरील विदेशी चिन्ह हटवून, त्याजागी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टकोनी राजमुद्रेने प्रेरित चिन्ह आणले.

भारताची सर्वांत मोठी, स्वदेशी विमानवाहू युद्धनौका ’आयएनएस विक्रांत’ भारतीय नौदलात दाखल झाली. त्यावेळी भारतीय नौदलाच्या नवीन चिन्हाचंही अनावरण करण्यात आले, ज्यात पूर्वीच्या दोन लाल रेषा काढून टाकण्यात आल्या, त्यांना ’सेंट जॉर्जेस क्रॉस’ म्हणत असत. या दोन रेषा कायमच भारतीय नौदलाच्या चिन्हावर ब्रिटिश राजवटीपासून कायम राहिल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय नौदलाचे जनक आहेत. हिंदवी स्वराज्याला परकीय शक्तींच्या समुद्रमार्गे होणार्‍या संभाव्य आक्रमणांपासून वाचवण्यासाठी, त्यांनी योजना आखून, स्वतःचं नौदल कसे उभारले, हे यावेळी पंतप्रधानांनी सांगितले होते. शिवाजी महाराजांना मानवंदना अर्पण करत, भारतीय नौदलाने त्यांच्या नवीन चिन्हाचं अनावरण केले.

मराठ्यांच्या आरमाराला समुद्राचे दरवाजे उघडणार्‍या, छत्रपती शिवाजी महाराजांचा देशाने केलेला मोठा सन्मान होता. नव्या ध्वजाच्या अष्टकोनी बोधचिन्हाच्या खाली देवनागरीत ‘शं नो वरुणः’ हे भारतीय परंपरेतील बोधवाक्य आहे. याचा अर्थ ’पाण्याची देवता वरूण आपल्यासाठी मंगलकारी होवो.’ नौदलाचा नवीन ध्वज म्हणजे आपली स्वतंत्रकडे केलेली वाटचाल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ आपली भूमीच स्वतंत्र केली नाही, तर इथल्या समाजाच्या मनातही स्वाभिमान निर्माण केला. गुलामीची मानसिकता नष्ट केली, शिवाजी महाराजांची प्रेरणा घेत, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातही आता गुलामीच्या मानसिकतेला सुरुंग लावला जात आहे. परकीय आक्रमकांची नावे बदलून शहरांची नामांतरे होत आहे. प्रतीकांमध्ये सकारात्मक बदल केले जात आहेत, गुलामीच्या मानसिकतेचा त्याग करून, देश आता स्वाभिमानाकडे वाटचाल करत आहे.

रवींद्र सासमकर
(लेखक ’शिवशंभु विचार मंचा’चे कार्यकर्ते, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त सदस्य आहेत.)