मुंबई : "तुम्ही जे स्वप्न पाहिले होते ते तुमच्याकडून पूर्ण झाले नाही तर तुम्हाला वाईट वाटते. खरंतर, हे सोपे नाही, पण आयुष्य पुढे जात असते अशा भावना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर रोहित शर्मा मीडियापासून दूर गेला होता. पराभवाच्या धक्क्याविषयी त्याने भाष्य केले आहे.
रोहित शर्मा म्हणाला, या पराभवातून सावरणे खूप अवघड होते. त्यामुळेच ही गोष्ट माझ्या मनातून बाहेर काढण्यासाठी मी कुठेतरी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. पण मी जिथे होतो तिथे लोकांनी माझ्याकडे येऊन आमच्या प्रयत्नांची आणि संघाची प्रशंसा केल्याचे तो सांगत आहे. दरम्यान, अंतिम सामन्यातील पराभवानंतर रोहित शर्मा खूपच उदास दिसत होता आणि तो ड्रेसिंग रूममध्ये गेला होता. तेव्हापासून तो मीडियामध्ये फारसा दिसला नाही. पत्नी रितिका सजदेह सोबतचा फोटोसुध्दा त्याने शेअर केला होता. त्यात दोघेही कुठेतरी फिरताना दिसले.
इंस्टाग्रामवर रोहित शर्माच्या टीमने चालवलेल्या Team45Ro या पेजने रोहित शर्माचा ४ मिनिटांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो पराभव, संघाची कामगिरी आणि त्यातून रिकव्हरीबद्दल बोलत आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने विश्वचषक २०२३ च्या अंतिम फेरीतील पराभवानंतर प्रथमच एक निवेदन जारी केले आहे आणि या पराभवातून तो कसा सावरला आहे हे सांगितले आहे. दि. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी ५० षटकांच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता.