आतंकवादी कारवायांतील आरोपींविषयी अबू आझमींना पुळका; ‘वॉरंट’ न देता अटक झाली म्हणून विधानसभेत केली आरडाओरड

    11-Dec-2023
Total Views |
abu azmi
 
नागपूर : राष्ट्रविघातक कारवायांमध्ये गुंतत असलेल्या मुसलमान युवकांचे प्रबोधन करण्याऐवजी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी अशा आरोपींना ‘वॉरंट’ न देता अटक झाली म्हणून विधानसभेत चक्क आरडाओरड केली. सोमवार, दि. ११ डिसेंबर रोजी पॉईंट ऑफ इनफॉर्मेशनच्या आयुधाचा वापर करीत त्यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता.
 
आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांवर कारवाई व्हायला हवी; मात्र कारवाई करतांना कोणत्याही प्रकारे समन्स किंवा अटक वॉरंट देण्यात आले नाही. कारवाई करतांना पोलिसांनी घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले. अटक करतांना कुटुंबियांना माहिती देण्यात आली नसल्याचा पुळका अबू आझमी यांनी सभागृहात व्यक्त केला. अबू आझमी यांच्या या वक्तव्याला सत्ताधारी पक्षाकडून तीव्र विरोध दर्शविण्यात आला. भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी अबू आझमी यांच्या वक्तव्याला जोरदार विरोध केला.
 
लांडगे म्हणाले, राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि आंतकवादविरोधी पथकांनी राज्यात सर्वाधिक कारवाया पुणे येथे केल्या आहेत. जुलै महिन्यात पुणे येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सार्वजनिक सभेच्या १ महिना आधी अन्वेषण यंत्रणेला अतिरेकी कारवायांची माहिती मिळाली. यावेळी अन्वेषण यंत्रणेने कारवाई केली. कोंढाणा येथील एका मशिदीवर धाड टाकून अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या एका भूलतज्ज्ञ डॉक्टरला अटक करण्यात आली. अतिरेक्यांच्या विरोधातील कारवाई केवळ मुंबईमध्ये नव्हे, तर संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी या कारवाया करण्यात येत आहे, असे आमदार महेश लांडगे यांनी म्हटले.
 
यावर अबू आझमी यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यांकडे बोलण्याची मागणी केली. या वेळी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी अबू आझमी यांनी आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी मुसलमानांविषयी आवाज उठवण्याऐवजी देशभक्त मुसलमानांचा प्रश्न सभागृहात उपस्थित करावा, असे आवाहन केले.