नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यापुर्वी पुण्यात घातपाताचा कट असल्याचा गौप्यस्फोट भाजप आमदार महेश लांडगे यांनी केले आहे. नागपूर येथे विधानपरिषदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असून सोमवारी सभागृहात समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी आणि भाजप आमदार महेश लांडगे यांच्यात खडाजंगी रंगली.
यावेळी अबू आझमी यांनी नुकत्याच ठाणे जिल्ह्यात झालेल्या एनआयएच्या छापेमारीवर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, "देशात जे लोक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई होणे आवश्यक आहे, यात शंका नाही. परंतू, शनिवारी देशातील कानाकोपऱ्यातील ५०० हून अधिक पोलिस ठाण्यातील बोरिवली जिल्ह्यातील पडघा गावात कोणतेही समन्स न देता आले. लोकांच्या घरात घुसून त्यांनी तोडफोड केली, हे चुकीचे आहे."
यावर उत्तर देताना महेश लांडगे म्हणाले की, "१८ जुलै २०२३ रोजी पुण्यात पंतप्रधान आणि गृहमंत्री येणार होते. पण त्याच्या महिनाभराच्या आधी तिथे काही अतिरेकी कारवाया होणार असल्याच्या सुचना एनआयए आणि एटीएसला मिळाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी यावर कारवाईदेखील केली. या कारवाईत त्यांनी मशीदीमध्ये छापा टाकून तिथे असलेल्या दहशतवाद्यांना ताब्यात घेतले होते. त्यामुळे एकट्या मुंबईमध्येच नाहीतर अशा चार ठिकाणी एनआयएने छापे टाकले असून ४० जणांना ताब्यात घेतले आहे," असे ते म्हणाले आहेत. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावता कामा नये. त्यामुळे आम्ही सगळे वेगवेगळ्या पक्षाचे आणि विचारांचे असलो तरी हा देश सुरक्षित रहायला हवा, असेही महेश लांडगे म्हणाले आहेत.