मोहित सोमण
भारताने यदाकदाचित सर्वात मोठी अर्थशक्ती बनली तरी भारताचा मूळ गाभा समजून घेणे तितकेच महत्वाचे आहे. कदाचित हे सगळे स्विकारतील असे नाही पण केवळ एकदा विचार म्हणून करायला काही हरकत नाही. नारायण मूर्ती यांनी मध्यंतरी भारतीय तरूणाईने आठवड्यात ७० तास काम करण्याचे आव्हान केले.' हा आपला देश आहे या भावनेतून किमान ७० तास करून कामाची उत्पादकता वाढवल्यास भारत अग्रगण्य होईल अशा आशयाचे विधान केले. मूर्ती हे कायमच पारंपारिक ओल्ड स्कूल बिझनेसमन म्हणून विचारवंत राहिलेले आहेत. सुधा मूर्तींचा साधेपणा लोकांना भावतो. त्यामुळे एक आदर्श कुटुंब म्हणून त्यांना मानणारा चाहता वर्ग मोठा आहे.
विचार हा व्यक्तिसापेक्ष असतो असे मान्य केले तरी अशी सार्वजनिक विधाने करताना भारताची भौगोलिकता, भारताची राजकीय परिस्थिती, विविधता, अर्थतंत्र, उद्योग क्षेत्रातील विविधता, शिक्षण, पदवी ,पार्श्वभूमी, निवडलेले क्षेत्र, व माणसाची मानसिक स्थिती या गोष्टींचा सर्वांगाने विचार केल्यास ७० तास काम करणे व्यवहारिक नाही. आणि सर्वात भयावह गोष्ट म्हणजे सगळ्याच गोष्टींना नैतिकतेच्या नावान देशभक्ती जोडणे. खरं तर देशभक्ती, उद्योगाची उपयुक्तता, कामाचे तास हे वेगवेगळे विषय आहेत. परंतु प्रत्येक गोष्टीला राष्ट्रीय विचारांशी जोडणे हे अपरिपक्वतेचे लक्षण आहे परंतु त्यातून गैरसमज वाढण्याची शक्यता वाढते. पाश्चात्य संस्कृतीच्या औद्योगिक धोरणांचे पालन जरी केले तरी आपल्याला त्या राष्ट्राशी सुसंगत अशा औद्योगिक उत्पादकता (Productivity) शक्य नाही. अगदी सुरूवात विकसित व विकसनशील देश यातील फरकापासून ते अगदी सिलिकॉन व्हॅली कल्चर ते भारतीय कंपन्यापर्यंत, भारतीय वेतन श्रेणी पासून ते पाश्चात्य देशांच्या सकल उत्पन्नांपर्यंत. कामाची कार्यपद्धती, व कामाच्या संस्कृतीपर्यंत प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. पाश्चात्य कार्यपद्धतीतील सार्वजनिक सुट्ट्या, बँक सुट्यांटासून ते अगदी पाश्चात्य देशांच्या हॅलोविन, ख्रिसमस सुट्टीपर्यंत.
देशाच्या अंतर्बाह्य परिस्थितील फरक, खाजगी क्षेत्रातील संस्कृती, सरकारी कार्यालयांचे वातावरण, पब्लिक सेक्टर कंपन्या, स्टार्ट अप सगळ्या विभागातील औद्योगिकतेची परिमाणे व मर्यादा वेगळ्या आहेत. सगळ्या सेक्टरच्या मागण्या वेगळ्या आहेत, उत्पन्न वेगळी आहेत, नियमावली वेगळी आहे. त्यामुळे एकाच फूटपट्टीवर माप मोजण्याला काही एक अर्थ नाही. मुळात शिक्षण व दैंनदिन कामाच्या व्याप्तीत दुरापास्त संबंध नाही. मार्गदर्शन सारखे मिळत नाही. मग कुठल्या आधारावर सगळ्या तरूणांनी ७० तास काम करावे हा मूलभूत प्रश्न आहे.
कष्ट, अतिकष्ट करण्यात काहीही कमीपणा नाही व चुकीचे नाही उलट ती तरुणांची जबाबदारी आहे. सध्याच्या टेक्नॉलॉजीचा युगात ' Survival for Fittest' या न्यायाने सगळ्यांना रोजीरोटीसाठी झगडाव लागते. पण त्याची परिभाषा एकाच पातळीवर आणून चालणार नाही. भारतात प्रत्येक व्यक्तीला, संस्थेला आवश्यक ते इन्फ्रास्ट्रक्चर (मुलभूत सुविधा) आहेत का याचा देखील तितकच महत्वाचे आहे. एखाद्या तरुणाला योग्य मार्गदर्शन मिळत नसेल तर कष्ट करूनही त्याची फलश्रुती मिळणार नसल्यास त्याच्या उत्पादकतेवर कुठले निकष लावणार ? एखादा तरूण हाजीहाजी करुन पायरी चढत गेल्यास त्याचे उत्पन्न व बौद्धयांक याची कशी सांगड घालणार हा मूर्तींना तरूणांचा मुलभूत प्रश्न आहे. देशातील अर्थव्यवस्था व परिणामी तरूणांचे भविष्य एकाच पटरीवर चालवायचे असल्यास या सगळ्या गोष्टींकरिता एखादी एस ओ पी ( Standard Operating Procedure) आवश्यक आहे. नारायण मूर्ती यांनी अहोरात्र कष्ट केले याबद्दल दुमत नाही. परंतु त्यांचा काळ आत्ताचा काळ यात फरक आहे. किंबहुना तेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुद्धा नव्हते. समाजातील ५ टक्के उद्योजक बनण्याचे स्वप्न पाहत तेव्हाची आव्हाने देखील वेगळी होती. आता टेक्नॉलॉजी मध्ये ५ जणांचे काम ए आय करणार असेल तर त्या व्यक्तीने दिवसरात्र काम करून काय अपेक्षित आहे ७० तासांची खरच गरज आहे का?
मूर्ती यांनी आपले आयुष्य शुन्यातून निर्माण केले याबद्दल भारतीयांना अभिमानच आहे. कदाचित हल्लीच्या तरुणांचे मूर्तींच्या इन्फोसिस मध्ये कॅम्पसमध्येच नोकरी लागण्याचे स्वप्न असते. त्यावेळी देखील सामान्य आवश्यक निकषांवर नोकरी दिली जाते. त्यावेळी त्याला आलेल्या अडचणी, त्याची दूरदृष्टी यांचा विचार खरच मानव संसाधन विभागाचे करतात का ? हा एक प्रश्न आहे. अनेकवेळा आवडेल तशी नोकरीही उमेदवारवाराला मिळत नाही. उलटपक्षी अत्यंत कमी पगारात ते विद्यार्थी दुसरीकडे नोकरी करतात.
माणूस ७० तास कामदेखील करू शकेल परंतु त्याआधी तशी पोषक परिस्थिती निर्माण करण्याची गरज आहे. लोकसंख्येच्या भस्मासुरात आता ए आय ची एन्ट्री हे भारताचे व जगाचेच रूपड बदलवत आहेत. मुंबई, दिल्ली कोलकाता सारख्या महानगरात लोकसंख्येचा विस्फोट झाल्याने मनासारखी नोकरीच मिळणे अशक्य झाले आहे. त्यात लोकलच्या प्रवासात माणूस ५ तास खर्च करत असेल तर कामात उत्पादकता कशी आणणार? आज उत्पादकता कमी आहे हे त्रिवार सत्य आहे. पण सरगसगट निकष कसा लागू शकेल? व तेही राष्ट्रीयत्वाची बरोबरी करत?
माणसांनीच राष्ट्र बनते. सश्रम उत्पादकता ही प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे देशाला हातभारच लावतात. काम केल्याने राष्ट्रभक्ती होणार आहे हे म्हणणेच धाडसाचे ठरेल. आपल्या पोटपूजेसाठीही माणूस नोकरी करतो. राष्ट्राला हातभार म्हणून कोणीही विनामूल्य काम करत नाही.
हल्ली देशभक्ती ही स्वस्त झाली आहे. प्रत्येक गोष्टीवर मोफत मिळते. ती खरंच राष्ट्रभक्त हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर सामाजिक न्याय हा देखील गांभीर्याने घ्यायची गरज आहे. सरतेशेवटी नारायण मूर्ती सरांना एकच विनंती आहे की एकाच परिभाषेत ७० तास काम करणे अर्धवट व एककल्ली विचार वाटतो. लोकांना आता प्रश्न नाही उत्तरे हवी आहेत. लोकांना ज्ञानामृताहून अधिक संधींची गरज आहे. त्यासाठी उपाययोजना केल्यासच ७० तासांचे आव्हान व्यवहार्य ठरेल अथवा नाही.