कोलकाता : "या भागात अनेक बांगलादेशी राहतात. जे बांगलादेशातून इथे आले आहेत आणि मतदार यादीत नाव नोंदवताना अडचणी येत आहेत त्यांनी झाकीर भाई यांच्याशी संपर्क साधावा. अशा सर्वांनी या कार्यालयाशी संपर्क साधावा. हे काम जलदगतीने करण्यात यावे." असे धक्कादायक विधान तृणमूल काँग्रेसच्या नेत्या रत्ना बिस्वास यांनी केले आहे.
भारतातील आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) नेत्याच्या विधानाने वाद निर्माण झाला आहे. टीएमसी नेत्या रत्ना बिस्वास यांनी पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील मतदार यादीत बांगलादेशींचा समावेश करण्याबाबत बोलले आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. या वादानंतर स्थानिक पंचायत समितीचे माजी अध्यक्ष झाकीर हुसेन यांनी दावा केला की, “रत्ना बिस्वास यांचा असा अर्थ नव्हता. माझ्या परिसरात राहणारे बहुतेक लोक १९६०-६५ पूर्वी इथे आले. १९९० नंतर अनेकांची नावे मतदार यादीतून काढून टाकण्यात आली आहेत. त्यांची नावे यापूर्वी मतदार यादीत होती.
झाकीर हुसैन पुढे म्हणाले, “खरं तर त्यांनी (रत्ना बिस्वास) या लोकांना मदत करण्याबद्दल बोलले आहे. मतदार यादीतील दुरूस्तीसह सेवा आम्ही सर्वसामान्यांना नक्कीच मोफत पुरवतो आणि हे सर्व कायद्यानुसार केले जाते. त्यांनी त्या सर्वांचे बांगलादेशी असे चुकीचे वर्णन केले आहे."
बांगलादेशींची नावे मतदार यादीत जोडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल भाजपने तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार म्हणाले, “सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस आधीच अशी मतदार ओळखपत्रे बनवण्याचे काम करत आहे. मतदार यादीत घुसखोरांची नावे जोडली जातात." या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.