मुंबई - तत्कालीन ठाकरे सरकारने मुंबई महापालिकेतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून तब्बल २० हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करीत भाजप नेते किरीट सोमैया यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
उद्धव ठाकरे सरकारने मार्च २०२२ मध्ये मुंबईत ३५ हजार प्रकल्प बाधितांसाठी सदनिका बांधण्याकरिता निविदा काढल्या. शाहिद बालवा आणि अतुल चोरडिया या विकासकांना त्यातील ६ कंत्राटे देण्यात आली. त्यातला एक प्रकल्प मुलुंड पूर्व केळकर कॉलेजजवळ, तर दुसरा कांजुरमार्गच्या चांदणी बोरी येथे होणार होता. शिवाय, प्रभादेवी, जुहू आणि मालाडमध्येही अशा प्रकारच्या प्रकल्पांचे नियोजन होते. त्या माध्यामातून २० हजार कोटी लुटण्याचे कारस्थान होते, असे सोमैयांनी याचिकेत म्हटले आहे.
सोमैया यांच्या वतीने अॅड. आदित्य भट, अॅड. अमित मेहता यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही जनहित याचिका दाखल केली आहे. त्यात केंद्र सरकार, राज्य सरकार, मुंबई पालिका, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणासह १७ जणांना प्रतिवादी करण्यात आले आहे.