रामायण-महाभारत या दोन महान आर्ष महाकाव्यांचा समावेश इतिहासाच्या अभ्यासक्रमात करावा, अशी शिफारस नुकतीच ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’च्या (एनसीईआरटी) समितीने केली. जीवनमूल्ये, नैतिकतेचे महत्त्व देणारे हे ग्रंथ. धर्म आणि कर्म यांचे महत्त्व अधोरेखित करणारी ही महाकाव्ये न्याय तसेच शांततेची शिकवणही देतात. एक आदर्श नागरिक म्हणून विद्यार्थ्यांना घडवण्यात, त्यांची मोलाची भूमिका असेल, म्हणून ही शिफारस महत्त्वाची ठरावी.
रामायण, महाभारत या महाकाव्यांचा शालेय इतिहासाच्या अभ्यासक्रमात समावेश करावा, अशी शिफारस ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’च्या (एनसीईआरटी) समितीने केली आहे. देशाभिमानाच्या अभावामुळे दरवर्षी हजारो तरूण परदेशी स्थायिक होतात. किशोरवयापासूनच विद्यार्थ्यांमधील देशभक्ती वाढीस लागावी, यासाठी महाकाव्यांचा इतिहासात समावेश करावा, अशी शिफारस समितीने केली आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यासाठी परिषदेने गेल्यावर्षी सात सदस्यांची समिती नेमली होती. या समितीने सामाजिक शास्त्र विषयासंबंधी शिफारसी सादर केल्या आहेत. त्यानुसार इतिहासाच्या कालखंडाची नव्याने ओळख करून देण्यात यावी, अशा आशयाची शिफारस आहे.
प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास अशी कालखंडानुसार विभागणी करण्यात येते. त्याऐवजी पारंपरिक, मध्ययुगीन, ब्रिटिश कालखंड आणि आधुनिक भारत अशा कालखंडांची ओळख करून द्यावी. त्यातील पारंपरिक कालखंडात रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये इतिहास म्हणून शिकवण्यात यावीत, असे सूचवण्यात आले आहे. याच समितीने ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ असा उल्लेख पाठ्यपुस्तकांमध्ये करण्यात यावा; तसेच हिंदू राज्यकर्त्यांच्या यशोगाथा तिसरी ते बारावीच्या अभ्यासक्रमांत समाविष्ट कराव्यात, असेदेखील सूचवले होते. विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारत शिकवणे का महत्त्वाचे आहे, याची अनेक कारणे आहेत.
ही महाकाव्ये केवळ महान साहित्यकृतीच आहेत, असे नव्हे तर त्यामध्ये जीवन, मूल्ये आणि नैतिकतेचे महत्त्वाचे धडेही आहेत. विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती तसेच इतिहासाबद्दल शिकवण्याचा हा एक सर्वोत्तम मार्ग. ही महाकाव्ये भारतीय संस्कृती, इतिहास आणि मूल्यांचा समृद्ध स्रोत आहेत. ते विद्यार्थ्यांना धर्म, कर्म आणि भक्तीचे महत्त्व शिकवू शकतात. ते विद्यार्थ्यांना गंभीर विचार कौशल्ये आणि सामाजिक जबाबदारीची भावना विकसित करण्यात मदत करू शकतात. या दोन्ही महाकाव्यांत ‘धर्म’ ही मध्यवर्ती संकल्पना आहे. मात्र, ती एक आदर्श आचारसंहिता म्हणून मानली जाऊ शकते, जी सामान्यांना स्वतःशी, एकमेकांशी आणि त्यांच्या सभोवतालच्या जगाशी सुसंगत राहण्यास मदत करते. रामायण आणि महाभारत या दोन्हींतील कर्म हा आणखी एक महत्त्वाचा सिद्धांत. कर्म हा कारण आणि परिणामाचा नियम. प्रत्येक कृतीची प्रतिक्रिया असते आणि प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या कृतीसाठी जबाबदार असते, हा धडा यातून मिळतो.
कर्म हे जगातील अन्यायाचे संतुलन साधण्याचा सर्वोत्तम मार्ग. भक्ती ही रामायणाची मध्यवर्ती कल्पना. महाभारतातही भक्तीला अनोन्य असे स्थान दिले आहे. रामायण हे न्यायाचे महत्त्व शिकवते, तर महाभारत शांततेचे. अशी ही महाकाव्ये भारतीय संस्कृती तसेच इतिहासात खोलवर रुजलेली आहेत. विद्यार्थ्यांना प्राचीन भारताची ओळख करून देण्याचा तो एक मार्ग आहे. शतकानुशतके भारतीय समाजाला ज्यांनी आकार दिला, त्या मूल्ये आणि श्रद्धा समजून घेण्यास ती मदत करतील. ही महाकाव्ये जीवन, मूल्ये आणि नैतिकतेबद्दल महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करतात. हिंदू धर्मावर आधारित हे ग्रंथ धर्म, कर्म, मोक्ष यांसारख्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करतात. त्यांचा अभ्यास विद्यार्थ्यांना हिंदू धर्म तसेच भारतीय संस्कृतीत त्याची असणारी भूमिका सांगेल. ही दोन महाकाव्ये सांस्कृतिक समज आणि सहिष्णुता वाढवण्यास मदत करू शकतात. आदर्श नायकाच्या या कथा आहेत. कठीण काळातही धर्माचे पालन कसे करायचे, हे श्रीराम शिकवतात. एक चांगला व्यक्ती म्हणून विद्यार्थ्यांना घडवण्यास तसेच आत्मसन्मानाची भावना विकसित करणारे गुण यातून ठळकपणे मांडले गेले आहेत. कल्पनाशक्ती तसेच सर्जनशीलतेने परिपूर्ण हे ग्रंथ सृजनशील प्रतिभा विकसित करू शकतात. जीवन, मूल्ये, नैतिकता आणि भारतीय संस्कृती यांची शिकवण देण्यासाठीची मौल्यवान संसाधने म्हणजे रामायण, महाभारत. राष्ट्रीय अस्मितेचा ते अविभाज्य भाग आहेत.
इंग्रजांनी १८३५ मध्ये मॅकाले शिक्षण पद्धत भारतीयांवर लादली. या पद्धतीने भारतातील प्राचीन गुरुकूल परंपरा मोडीत काढली. तसेच वसाहतवादी मानसिकता लादण्यावर या पद्धतीने भर दिला. इंग्रजी भाषेवर आधारित या पद्धतीने समृद्ध अशा भारतीय परंपरांचा विसर पाडला आणि इंग्रजीचे भूत डोक्यावर लादले. शिक्षण हे इंग्रजी भाषेतूनच घेतले पाहिजे, असा चुकीचा संदेश तिने दिला. आज एकविसाव्या शतकात शिक्षण मातृभाषेतून घेतले, तर प्रगती अधिक होते, हे जगात सर्वमान्य झाले आहे. मात्र, इंग्रजांनी पारंपरिक शिक्षण पद्धतींचा र्हास कसा होईल, तसेच संस्कृती आणि मूल्ये यांचा कसा विसर पडेल, याचीच पूर्ण काळजी घेतली. २०१४ मध्ये केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने म्हणूनच शिक्षण धोरणाकडे लक्ष केंद्रित केले आहे. नवीन शैक्षणिक धोरण भारतीय शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करणारे असेच आहे. शिक्षण हे अधिक समावेशक, न्याय्य तसेच उच्च गुणवत्तेचे कसे होईल, याची पुरेपूर काळजी त्यात घेण्यात येत आहे. म्हणूनच भारतीयत्व हे यात केंद्रस्थानी आहे. भारतीय इतिहास, संस्कृती आणि भाषा यांच्या शिकवणीला महत्त्व आहे. भारतीय शिक्षण व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्याबरोबरच भारतीय संस्कृतीची ओळख विद्यार्थ्यांना करवून देण्यावर ही पद्धती भर देते. जो देश आपली संस्कृती, आपला इतिहास विसरतो, त्याचे भविष्य धोक्यात येते. संस्कृती ही देशाची ओळख असते. मूल्ये आणि श्रद्धा बळकट करण्यास ती महत्त्वाची भूमिका बजावते.
‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचा एक प्रसंग इथे मुद्दाम उद्धृत करावासा वाटतो. मुस्लीम मुलगी हिंदू देवदेवतांना नावे ठेवते, खोटे संदर्भ देते. मात्र, हिंदूंना त्याविषयी कोणतीही माहिती नसल्याने, त्या मुलींना तिचा प्रतिवादच करता येत नाही. म्हणूनच आपल्या धर्माचे, संस्कृतीचे ज्ञान आवश्यक. हे ज्ञान नसल्यानेच पाश्चात्य संस्कृतीची भुरळ नव्या पिढीला पडते. रामायण-महाभारत या महाकाव्यांकडे पाहताना, केवळ धार्मिक दृष्टिकोनातून न पाहता, जीवनाचा धडा देणारी, मानवी भाव-भावनांचे व्यवस्थापन करणारी महाकाव्ये म्हणूनही त्यांच्याकडे पाहता येते. या दोन महान ग्रंथांनी अनेक पाश्चिमात्य तज्ज्ञांना भुरळ घातली. त्यांच्या जीवनावर त्यांचा सकारात्मक परिणाम घडून आला. आपल्याकडे मात्र याबद्दल उदासीनता दिसून येते. हे चित्र बदलायचे असेल, तर मग तुम्ही कुठल्याही जातीधर्माचे असाल, तरी शिक्षण महत्त्वाचे आहे. मुस्लीम देशात कुराण शिकवले जाते. धर्मशिक्षण दिले जाते. भारतालाही आज आधुनिक शिक्षणाबरोबरच धर्मशिक्षणाचीही नितांत गरज आहे. रामायण-महाभारत हे दोन महान ग्रंथ ही गरज नक्कीच पूर्ण करतील, हे नि:संशय!