गेल्या १३ वर्षांपासून गडकिल्ले संवर्धनासोबतच पर्यावरण संरक्षण-संवर्धन, अभिनय यांसारख्या विविध क्षेत्रांत मुशाफिरी करणार्या शैलेंद्र कंधारे यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेणारा हा लेख...
शैलेंद्र यांना अगदी लहानपणापासूनच गडकिल्ले, जंगल खुणावत होते. एक प्रकारचे हे आकर्षण नंतर आपसुकच त्यांच्या आवडीत परावर्तित झाले. पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर शैलेंद्र छोटीमोठी नोकरी करण्यासाठी घराबाहेर पडले. पण, गडकिल्ल्यांविषयीची मनातील आस्था शैलेंद्र यांना स्वस्थ बसू देत नव्हती. मग त्यांनी सुरू केली, ती भटकंती. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत, तालुक्यांतील गडकिल्ल्यांची माहिती काढून त्या ठिकाणी भेटी द्यायला शैलेंद्र यांनी प्रारंभ केला. नुसत्या भेटीच दिल्या नाही, तर आपल्या समाजाचा, संस्कृतीचा इतिहास आणि या अनमोल ठेवींचा अभ्यास करण्याचा विचार शैलेंद्र कंधारे यांनी सुरू केला. याच माध्यमातून पुढे जंगल, प्राणी आणि निसर्गसौंदर्य संरक्षण आणि संवर्धनाचे कार्य त्यांनी हाती घेतले.
राज्यातील जवळपास १२७ गडकिल्ले शैलेंद्र यांनी सर केले असून, त्याची इत्थंभूत माहितीही संकलित केली. यावेळी प्रत्येक किल्ल्याची एक स्वतंत्र अशी ओळख व अस्तित्व असल्याचेही शैलेंद्र यांना प्रकर्षाने जाणवले. याबाबत अधिक माहिती घेताना, ‘विरगळ संवर्धन’ या विषयावरही मग शैलेंद्र यांनी सखोल अभ्यास सुरू केला. विरगळी या प्रत्येक जिल्ह्यांत, तालुक्यात अगदी गावोगावी आढळतात. विरगळींचा हा दडून राहिलेला इतिहास जगापुढे आणण्याचे काम शैलेंद्र यांनी सुरू केले आणि त्यांच्या या कार्यात सोबतीला अनेकजण जोडले गेल्याचेही ते सांगतात.महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा इतिहास, त्याची माहिती सर्वांना व्हावी, या उद्देशाने लहान मुलांपासून ते अगदी तरुणांपर्यंत गडकिल्ल्यांची सफर घडविणे शैलेंद्र यांनी सुरू केले. या भटकंतीतूनच जंगलातील वृक्षसंपदा, वन्यजीव यांच्याशीही शैलेंद्र यांचा संबंध आला. मग काय, यानिमित्ताने वेगवेगळ्या प्रजातींचे पक्षी, साप, फुलपाखरे, कीटक आणि जलचरांचाही अभ्यास त्यांनी सरू केला. जवळपास १५० च्या आसपास फुलपाखरांचाही शैलेंद्र यांनी अभ्यास केला.
‘व्हाईल्डलाईफ रेस्क्यू रिसर्च फाऊंडेशन’च्या माध्यमातून सध्या शैलेंद्र यांच्यातर्फे जंगलात जनजागृतीच्या दृष्टीने विविध उपक्रमदेखील राबविले जातात. जंगलातील दुर्मीळ, नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या विविध वन्यजीवांच्या प्रजातींचे संरक्षण करणे, हा या संस्थेचा मुख्य उद्देश. वन विभागाच्या व काही पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संस्थांच्या मदतीने या वन्यजीवांच्या प्रजातींचे संरक्षण कसे करता येईल, यासाठी शैलेंद्र काम करू लागले. उन्हाळ्यात प्राण्यांना पाणी उपलब्ध न झाल्यामुळे ते अनेकदा पाण्याच्या शोधात गावांमध्ये प्रवेश करतात. परिणामी, मानव-वन्यजीव संघर्षाच्या दुर्दैवी घटना घडतात. वन्यप्राण्यांनाही इजा होते. त्यासाठी कोल्हापूर येथील आंबा घाट, विशाळगड आणि ताह्मिणी घाट या परिसरात शैलेंद्र आणि त्यांच्या सहकार्यांनी जंगलातच पाणवठे उभारण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला. या पाणवठ्यांचे काम अजूनही अनेक ठिकाणी सुरू असून, त्यामुळे शेकडो वन्यजीवांची तहान भागणार आहे. जंगलात फिरताना बर्याचदा घाटांमध्ये, दरडीत कोसळलेली झाडेही आढळतात. पण, यापैकी काही वृक्षांचे पुनर्रोपण करणे शक्य असल्याचे शैलेंद्र यांच्या निदर्शनास आले. मग यासंदर्भातही त्यांनी पुढाकार घेऊन कोल्हापूरमधील आंबरेश्वर येथे या झाडांचे पुनर्रोपण केले. ‘वसुरक्षक सोशल फोर्स’ या माध्यमातून हेच काम पुढे सुरू आहे.
यासोबतच ‘सह्याद्री मित्र संस्थे’च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात जवळपास शेकडो देशी वृक्षांची लागवड करण्याचे कामही शैलेंद्र यांनी केले. जंगलात फिरत असताना, औषधी व आयुर्वेदिक वृक्षांच्या बियांचे संकलनही केले जाते. मग याच बियांचा वापर करून हिरडा, बाळगोटी, तुळस यांसह असंख्य आयुर्वेदिक वृक्षांची लागवड करण्यात आली. ताह्मिणी घाटात उभारलेल्या रोपवाटिकेत या झाडांची निगा राखली जाते. या कामात स्वप्निल सनगर, निलेश पाटील, प्रमोद माळी यांसह अनेकांचे सहकार्य शैलेंद्र यांना मिळाले.गडकिल्ल्यांच्या विषयावर काम सुरू असताना शैलेंद्र यांना मित्राकडून अभिनयासाठीही विचारणा झाली. प्रथम अभिनयाची कोणतीही माहिती अथवा तयारी नसल्याने शैलेंद्र यांनी यासाठी स्पष्ट शब्दांत नकार दिला. पण, इतिहासासंदर्भात विषय असल्याने नंतर शैलेंद्र यांनी अभिनयासाठी होकार दिला. ‘जाणता राजा’ या नाट्यात वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची संधी शैलेंद्र यांना मिळाली.
कधी मावळा, सरदार तर कधी अष्टप्रधान मंडळातील एखादी भूमिका शैलेंद्र यांनी निभावली. शैलेंद्र यांचे अभिनयकौशल्य पाहता त्यांना नाट्यक्षेत्रातून विविध भूमिका साकारण्याबाबतही विचारणा झाल्याचे ते सांगतात. लोणावळ्यामध्ये असेच एकदा एका मोठ्या महानाट्यासाठी अभिनय करण्याची त्यांना विचारणा झाली. त्या नाटकात खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायची असे समजताच, हातातील सर्व कामे सोडून शैलेंद्र यांनी तिथे धाव घेतली. अशाप्रकारे २०१७ सालापासून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका विविध व्यासपीठांवर शैलेंद्र साकारत आहेत. आतापर्यंत जवळपास १५०हून अधिक नाट्यप्रयोगांतून शैलेंद्र यांनी आपले अभिनयकौशल्यही सिद्ध केले आहे. मुंबई, पुणे, लोणावळा, खोपोली, कोल्हापूर, सातारा यांसह विविध जिल्ह्यांतील नाट्यरसिकांसमोर अभिनय करण्याची संधी मिळणे, हेच मोठे भाग्य असल्याचे शैलेंद्र सांगतात.अशाप्रकारे गडकिल्ल्यांपासून, पर्यावरण ते अगदी अभिनयापर्यंत विविध क्षेत्रांत मुशाफिरी करणार्या शैलेंद्र यांच्या या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.
पंकज खोले
(अधिक माहितीसाठी संपर्क
९९२३४९३५०६ )