काँग्रेसचे केरळमधील ‘मोहब्बतचे दुकान’

    18-Nov-2023   
Total Views |
INC Political Agenda in Kerala

दहशतवादाला विरोध दर्शविणार्‍या सर्वच देशांनी ‘हमास’च्या दहशतवादी कृत्याचा धिक्कार करत, इस्रायलच्या गाझामधील हल्ल्याचे समर्थन केले. केरळमध्ये कोझीकोड बिचवर दि. २३ नोव्हेंबर रोजी काँग्रेसने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ विशाल रॅलीचे आयोजन केले आहे. त्यात किमान ५० हजार लोक जमतील, असा अंदाज काँग्रेसने व्यक्त केला. केरळातील सत्ताधारी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) समस्त डावे पक्ष, ’इंडियन मुस्लीम लीग’ आणि काँग्रेस पक्ष पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ अशा या विशाल रॅलीचे आयोजन करत आहेत. केरळ हे ’इस्लामिक स्टेट’चा आदर्श म्हणून प्रस्तावित व्हावा आणि त्याचे पडसाद देशभरात उमटावेत, असा एकूणच प्रयत्न चाललेला दिसतो. त्याचाच या लेखात घेतलेला हा मागोवा...

केरळमध्ये जणू जगण्या-मरण्याचा प्रश्नच आहे, अशा आविभार्वात भाजप सोडून तिथले इतर राजकीय पक्ष पॅलेस्टाईन समर्थनार्थ रॅली काढण्यात व्यस्त आहेत. गुरुवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी काँग्रेसने केरळमध्ये अशाच एका पॅलेस्टाईन समर्थनार्थ विशाल रॅलीचे आयोजन केले आहे. ’बाटग्याची बांग मोठी’ अशी म्हण सर्रास आजही वापरली जाते, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे काँग्रेसची दहशतवादाला समर्थन देणारी ही मानसिकता म्हणायला हवी. काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी ते राहुल गांधी आणि सर्वच काँग्रेसी नेत्यांनी इस्रायल-’हमास’ संघर्षात पॅलेस्टाईनचे समर्थन केले. अर्थात, काँग्रेस आता काही भारताचा सत्ताधारी पक्ष नाही की, त्याची भूमिका ही आंतरराष्ट्रीय पातळीवर विचारात घेतली जाईल. मात्र, तरीही भारताच्या राजकारणात काँग्रेसने ही भूमिका केवळ आणि केवळ भारतीय मुस्लीम समाजाला गृहीत धरून घेतलेली आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. सगळेच मुस्लीम देशांपेक्षा त्यांच्या धर्माला आणि धर्मबांधवांना जवळचे मानतात, अशी एक धारणा आणि दुर्देवाने ती बहुसंख्यपणे बरोबरही आहेच म्हणा. पण, याच मताला सर्व मुस्लिमांची मानसिकता आणि आग्रह समजत केवळ त्या मुस्लिमांनी आपल्याला मतदान करावे, यासाठी काँग्रेसने पॅलेस्टाईनचे समर्थन केले, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाहीच!

केरळचे राजकारण पाहता स्पष्ट जाणवते की, कम्युनिस्ट पक्षाला (मार्क्सवादी) तिथला हिंदू समाज समर्थन करायचा. आता २०१४ नंतर हळूहळू का होईना राज्यातील हिंदूंचे समर्थनही भाजपकडे वळताना दिसते. काँग्रेसला केरळमध्ये पारंपरिकरित्या ख्रिस्ती समुदायाची मतं मिळायची. काँग्रेस सोबत साथसंगत करणार्‍या ’इंडियन युनियन मुस्लीम लीग’ची केरळी मुस्लिमांमध्ये चांगली पकड. त्यामुळे हिंदू, मुस्लीम आणि ख्रिस्ती मतं अशाप्रकारे विभागलेली होती. मात्र, ’लव्ह जिहाद’ आणि ’ड्रग्ज जिहाद’ने केरळमध्ये वातावरण ढवळून निघाले. केरळच्या सायरो मलबार चर्चचे बिशप जोसेफ कल्लारंगाट यांनी दावा केला की, ”केरळमधील ख्रिस्ती मुलींना ’लव्ह आणि नार्कोटिक्स जिहाद’चे शिकार बनवले जात आहे. जिथे हत्यार काम करत नाहीत, तिथे दहशतवादी ’लव्ह आणि ड्रग्ज जिहाद’चा वापर करत आहेत आणि इतर धर्मांचे नुकसान करत आहेत.” केरळच्या ख्रिस्ती समाजाने ’लव्ह आणि ड्रग्ज जिहाद’वर वारंवार प्रश्न उपस्थित केले, चिंता व्यक्त केली.

मात्र, त्यांचा आवडता काँग्रेस पक्ष मात्र तोंडात मूग गिळून गप्पच बसला. उलट तत्कालीन केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पी. टी. थॉमस यांनी बिशपलाच धारेवर धरले. ते म्हणाले की, ”बिशपचे म्हणणे धार्मिक सलोखा बिघडवणारे आहे. आम्हाला माहिती नाही की, कोणत्या आधारावर ते असे बोलले. मात्र, काँग्रेस पक्षाला वाटते की, त्यांच्या अशा बोलण्याने सामाजिक एकतेला तडा जात आहे. त्यांना कुणीही समर्थन देऊ नये.” ओमन चंडी सोडले तर केरळमधील कोणत्याही नेत्याने ’लव्ह जिहाद’च्या विरोधात शब्दही उच्चारला नाही. त्यामुळे केरळमधला ख्रिस्ती समाज काँग्रेसपासून दूर जाऊ लागला. त्याचा परिणाम ख्रिस्ती समाजाची एकगठ्ठा मिळवता आली नाहीत, म्हणून मग काँग्रेसला विरोधी पक्षात बसावे लागले. दुसरीकडे केरळच्या हिंदू समाजामध्येही भाजपबद्दल समर्थन वाढत आहे. अशावेळी पक्षाचे मतदान वाढवण्यासाठी मुस्लीम मतदारांना जाळ्यात ओढणे, हाच पर्याय काँग्रेसकडे उरला. त्यामुळे काँग्रस केरळमध्ये पॅलेस्टाईन समर्थनार्थ विशाल रॅलीचे आयोजन करत आहे. इथे एक लक्षात घेणे गरजेचे आहे की, काश्मिरी आणि जानवेधारी पंडित असलेले राहुल गांधी केरळमध्ये हिंदुत्वासाठी बोलताना कधीही दिसत नाहीत. अर्थात, लोकांना मूर्ख बनवण्याची ती त्यांची कला आहेच म्हणा.
 
केरळमध्ये काँग्रेस असो की, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) की, इंडियन युनियन मुस्लीम लीग या तिघांमध्ये मुस्लिमांचे लांगूलचालन करण्याची आणि हिंदूंची श्रद्धा दुर्लक्षित करण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे. केरळमध्ये सरस्वती मंडपम् आणि नवरात्री मंडपम् ही ऐतिहासिक मंदिरे आहेत. मात्र, केरळच्या सत्ताधारी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) पक्षाने नुकतेच या मंदिराचे त्यांच्या पक्षाचा प्रचार करणार्‍या कार्यालयात रुपांतर केले. हिंदूंनी याला तीव्र विरोध केला. सत्तेच्या बळावर तो विरोध भारतीय कम्युनिस्ट पक्षाने मोडून काढला. दुसरीकडे केरळातील मंदिरामध्ये रा. स्व. संघाची शाखा आणि त्यासंदर्भात काहीही कृती-विचार करण्यास केरळ प्रशासनाने बंदी आणली आहे, हे विशेष. देशनिष्ठ, धर्मनिष्ठ विचार कार्य करण्यासाठी बंदी मात्र राजकीय प्रचार करण्यासाठी मंदिरांचा वापर असे, कम्युनिस्ट पक्षाचे धोरण. ‘केरळ मॉडेल’साठी पाण्यासारखा पैसा मोजून केरळमधील इस्लामी संस्कृतीचे प्रदर्शन करू इच्छिणारा भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) त्यालाही जाणवत आहे की, केरळमधला त्यांचा पारंपरिक हिंदू मतदार त्यांना ‘टाटा-बाय बाय’ करणार आहे. केरळचा दुसरा मोठा प्रादेशिक पक्ष ‘इंडियन मुस्लीम लीग.’ पाकिस्तान निर्मिती करणारा मुस्लीम लीग स्वातंत्र्यानंतर कुठे गेला? तर तो गेला नाही, त्याचा नव्याने पुनर्जन्म झाला, तो म्हणजे ’इंडियन युनियन मुस्लीम लीग’ हा पक्ष. या इंडियन युनियन मुस्लीम लीगच्या युवा शाखेने नुकतीच एक रॅली काढली. हजारो मुस्लीम त्यात सामील झाले आणि त्यांचे नारे होते - ”हिंदूंनो, तुम्हाला मंदिरात उलटे लटकवू, तुम्हाला जाळून टाकू, तुमची कबर खणू.” या अशा पक्षासोबत ‘मोहब्बत की दुकान’ उघडणार्‍या राहुल गांधींनी केरळमध्ये सत्तासोबत केली आहे.

पुन्हा चर्चा करूया केरळ काँग्रेसची. काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा राहुल गांधी अदानी- अंबानी भ्रष्टाचार वगैरेंवर सातत्याने आरोप करीत असतात. पण, दिव्याखाली नव्हे, पंज्याखालचा अंधार ते बघत नाहीत. केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुधाकरन. त्यांच्यावर मागे गुन्हे दाखल करण्यात आले होते. तीसुद्धा एक अतिरंजक कथाच आहे. केरळच्या कोच्ची कलुरमध्ये मॉनसन मावुंकल नावाचा माणूस ऐतिहासिक दुर्मीळ वस्तूंचा संग्राहक आणि विक्रेता आहे असे सांगायचा. तो सांगायचा की, त्याच्या संग्रहात येशूने परिधान केलेल्या वस्त्राचा तुकडा, जगातले पहिले मुद्रित केलेले बायबल, मोहम्मद पैगंबर यांनी वापरलेला प्याला, त्रावणकोरच्या राजाचे सिंहासन, टिपू सुलतानचे सिंहासन, सद्दाम हुसेनकडचे कुराण, मुसाची लाठी आणि लिओनार्डो द विंची आणि राजा रवी वर्माने स्वतः बनवलेले चित्र इतकेच काय, तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे असलेली गीतासुद्धा संग्रही आहे, असे त्याचे म्हणणे. या मॉनसन मावुंकलवर २४ कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला. त्याने काही लोकांना सांगितले की, आखाती देशातील राजघराण्यातील २.६२ लाख कोटी रूपयांच्या दुर्मीळ ऐतिहासिक वस्तूंसाठी वाटाघाटी सुरू आहेत. त्यामुळे सहा जणांनी त्याला दहा कोटी रूपये दिले. मात्र, या सहा जणांची मावुंकलने फसवणूक केली. या लोकांनी सांगितले की, आम्ही ज्यावेळी मावुंकलला भेटलो, तेव्हा तिथे काँग्रेस नेता सुधाकरन उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, आखाती देशातून येणाार्‍या दुर्मीळ ऐतिहासिक वस्तू सोडवण्यासाठी ते दिल्लीला जाणार आहेत. सुधाकरन सारखा नेता सांगतो म्हणून आमचा विश्वास बसला. यामुळे सुधाकरन यांचीही चौकशी करण्यात आली. त्यात स्पष्ट झाले की, सुधाकरन आणि मावुंकल अनेक वेळा भेटले होते आणि दोघांचे एकत्रितरित्या अनेक फोटोही उपलब्ध होते. मात्र, पुराव्याअभावी पुढे सुधाकरन यांच्यावरचा आरोप सिद्ध होऊ शकला नाही. इतकेच काय तर मावुंकल याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा गुन्हाही सिद्ध झाला. ही मुलगी त्याच्याघरी मोलकरीण म्हणून काम करायची. या मुलीने चौकशीत सांगितले की, मावुंकल बलात्कार करत होता, त्यावेळी सुधाकरन तिथे उपस्थित होते. मात्र, या आरोपालाही पुराव्याअभावी बळ मिळाले नाही. असे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष.

काँग्रेसच्या हिंदूविरोधी राजकारणाचे उत्तम उदाहरण म्हणजे रिजील चंद्रन मक्कुटी. तोच रिजील ज्याने मोदींनी गायीच्या मांसावर निर्बंध लादले म्हणून २०१७ साली गायीच्या वासराची खुलेआम कत्तल केली होती. अत्यंत निर्दयीपणे त्याने त्या लहान वासराला फरफटत आणले आणि सार्वजनिक स्थळी कू्ररपणे वासराची कत्तल केली. त्यामुळे केरळमधीलच नव्हे, तर देशभरातील मुस्लीम आणि ख्रिश्चन खूश होतील असे रिजीलला वाटले. मात्र, रिजीलच्या या क्रूरतेचा देशभरातून निषेध करण्यात आला. त्यानंतर मग राहुल गांधी यांनी समाजमाध्यमांवर संदेश दिला की, ”जे झाले ते वाईट होते, असे कृत्य निंदनीय आहे. काँग्रेस पक्ष याचे समर्थन करत नाही.” काँग्रेस पक्षाने त्याचे निलंबन करण्याची तत्परताही दाखवली. मात्र, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी जेव्हा-जेव्हा केरळात जायचे, तेव्हा-तेव्हा रिजीलला भेटायचे. रिजील त्यांच्या भेटीचे फोटोही समाजमाध्यमांवर टाकायचा. इतकेच काय राहुल गांधींनी ’भारत जोडो’ यात्रेदरम्यानही रिजीलची भेट घेतलीच. आता तर काय रिजील हा केरळमधल्या युथ काँग्रेसचा उपाध्यक्ष आहे. याचाच अर्थ देशभरातल्या हिंदूंना रिझवण्यासाठी समाजमाध्यमांवर रिजीलचा निषेध. मात्र, केरळातील इतर धर्मीयांचे लांगूलचालन करण्यासाठी रिजीलला समर्थन. व्हा रे काँग्रेस!!!
 
सध्या केरळमधील भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), समस्त डावे पक्ष, इंडियन मुस्लीम लीग आणि काँग्रेस पक्ष पॅलेस्टाईनच्या आडून मुस्लीम तुष्टीकरण करताना दिसत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर जगभरातल्या मुस्लीम देशातला सामर्थ्यशाली मुस्लीम देश असलेल्या सौदी अरेबियामध्ये काय घडले? इसलाह अबदूर रहमान हा ब्रिटिश कलाकार नुकताच सौदी अरेबियामधील मक्केला गेला होता. मात्र, त्याला तिथे चार सैनिकांनी अटक केली. त्याची कसून चौकशी केली. चौकशी करताना ते सैनिक अरबी भाषेत सारखे ‘स्कार्फ’, ‘पॅलेस्टाईन’, ’हमास’ वगैरे शब्द वापरत होते. अनेक तासांच्या चौकशीनंतर त्याला सोडण्यात आले. त्यापूर्वी त्याला सांगण्यात आले की, ”मक्का हे पवित्र स्थळ आहे. इथे प्रार्थना होते. पॅलेस्टाईन-इस्रायल करू नकोस. ते चांगले नाही.” इसलाहने हा अनुभव कथन करत म्हटले की, पॅलेस्टाईनच्या ध्वजासारखा स्कार्फ हाताभोवती गुंडाळला होता. त्यामुळे त्यांना वाटले की, मी पॅलेस्टाईन समर्थक आहे. केवळ इसलाहलाच नाही, तर मक्का-मदिना येथे पॅलेस्टाईन समर्थनार्थ प्रार्थना करण्यापूर्वीच अनेकांना सौदी अरेबिया प्रशासनाने अटक केली आहे. सौदी अरेबिया म्हणजे जगभरातल्या मुस्लीम देश आणि मुस्लिमांसाठी अल्लाचा आशीर्वाद असलेला देश. आपल्या भारतातील गल्लीबोळातही काही लोक सौदी अरेबियाला ’हमारे नबी का देश’ असे म्हणतात, तर अशा या नबीच्या देशातच ’मुस्लीम बद्ररहूड’नुसार पॅलेस्टाईनसाठी सामुदायिकरित्या सार्वजनिक ठिकाणी प्रार्थना करण्यास मोकळीक नाही. नव्हे सौदी अरेबियाच्या भूमीवर परक्या पॅलेस्टाईन आणि इस्रायलसाठी का जमायचे, अशी तिथे भूमिका घेतली जाते. मात्र, राहुल गांधी यांचे ‘मोहब्बतचे दुकान’ केरळमध्ये खुलेआम पॅलेस्टाईनचे समर्थन करत, इस्रायलवर ’हमास’ने केलेल्या क्रूर हमल्याचे जणू समर्थनच करत आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसचे केरळमधील ‘मोहब्बतचे दुकान‘ हे असे सुरू आहे!

९५९४९६९६३८
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.