नवी दिल्ली : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी संकल्प पत्र (जाहिरनामा) प्रसिद्ध केले. 'मोदींची हमी, भाजपचा विश्वास' असा जाहिरनाम्याचा गाभा आहे. भगिनींना कायमस्वरूपी घरे देण्याचे आश्वासन दिले असून गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना केजी ते बारावीपर्यंत आणि मुलींना पीजीपर्यंत मोफत शिक्षण देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत भाजपचा जाहिरनामा जारी केला. जाहीरनामा प्रसिद्ध करताना नड्डा म्हणाले, काळानुसार जाहीरनाम्याचे महत्त्व हळूहळू कमी होत गेले, कारण राजकीय पक्षांनी जाहिरनाम्यांचे पालन कधीही केले नाही. भाजप हा एकमेव पक्ष आहे ज्याने दस्तऐवज हे आमच्या रोडमॅपचे माध्यम बनवले आहे आणि जमिनीवर त्याची अंमलबजावणी करण्याचे कामही केले आहे. हा आमचा ट्रॅक रेकॉर्ड असल्चे नड्डा म्हणाले.
भाजप अध्यक्ष म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशचा विकास असो किंवा इतर कोणत्याही राज्याचा विकास असो, गरिबांचे कल्याण नेहमीच केंद्रस्थानी असते. ते म्हणाले, 2003 मध्ये मध्य प्रदेशात औद्योगिक विकासाचा दर 0.61% होता, जो आज भाजप सरकारच्या 20 वर्षांच्या कार्यकाळात 24% इतका वाढला आहे. 2003 मध्ये येथे फक्त 4,231 हेक्टर जमीन सिंचनाखाली आली होती. आज वाढ झाली आहे. १६,२८४ हेक्टर क्षेत्र व्यापले गेले आहे. त्यामुळे आगामी काळातही मध्य प्रदेशच्या विकासासाठी भाजप सज्ज असल्याचेही नड्डा यांनी यावेळी नमूद केले आहे.
ही आहेत प्रमुख आश्वासने
· पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना 5 वर्षांसाठी राबवत असताना सर्व कुटुंबांना मोफत रेशनसह डाळ, सरसो तेल आणि साखर सवलतीच्या दरात उपलब्ध करून देणार.
· मध्य प्रदेशातील एकही कुटुंब बेघर राहणार नाही. त्यासाठी पंतप्रधान आवास योजनेसोबतच मुख्यमंत्री सार्वजनिक गृहनिर्माण योजना सुरू करणार.
· भगिनींना मासिक आर्थिक मदतीसह घरकुलाचा लाभ मिळणार.
· एमएसपीसह गहू 2700 रुपये प्रति क्विंटल आणि 3100 रुपये प्रति क्विंटल धान खरेदी करण्याची व्यवस्था.
· पंतप्रधान किसान सन्मान निधी आणि मुख्यमंत्री किसान कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक 12,000 रुपये देणार.
· तेंदूपत्ता संकलन दर प्रति पोती ४ हजार रुपये करणार.
· गरीब कुटुंबातील सर्व विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत मोफत शिक्षणाची व्यवस्था करणार.
· सरकारी शाळांमध्ये माध्यान्ह भोजनासोबत पौष्टिक नाश्ताही दिला जाणार.
· प्रत्येक विभागात आयआयटीच्या धर्तीवर मध्य प्रदेश इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि एम्सच्या धर्तीवर मध्य प्रदेश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सची स्थापना करण्यात येणार.
· प्रत्येक कुटुंबात किमान एक रोजगार किंवा स्वयंरोजगाराची संधी सुनिश्चित करणार.