रुग्णांचे विश्लेषण आणि समन्वय

    09-Oct-2023
Total Views |
Article on Patient Health Issue Analysis And Coordination

शरीर व मनाच्या कार्यामध्ये ज्यावेळी कुठल्याही प्रकारचा अडथळा किंवा ब्लॉक नसतो, त्यावेळी मन व शरीर हे चैतन्यशक्तीच्या नियंत्रणात अतिशय सुंदररित्या व निरोगीरित्या कार्य करते. ज्यावेळी कुठल्याही अटीविना हे कार्य चालते, तेव्हा माणूस निरोगी असतो. परंतु, निरोगी राहाण्यासाठी जेव्हा अटी येतात, त्यावेळी आजाराची सुरुवात होत असते.

जर निरोगीपणा म्हणजे बंधनमुक्तता, तर रोगकारक स्थिती म्हणजे निर्बंधाची स्थिती. ज्यावेळी आपल्या चैतन्यशक्तीला निरोगी राहण्यासाठी अनेक निर्बंधांना तोंड द्यावे लागते, त्यावेळी ही रोगकारक स्थिती चालू होते. आपण स्वतः स्वतःला जेवढे ओळखत असतो, तेवढे इतर कोणीही आपल्याला ओळखू शकत नाही. म्हणून वरील अनुमानाचे उदाहरण म्हणून आपण स्वत:चा अभ्यास करू शकतो. स्वतः स्वत:चे निरीक्षण करा. त्यात आपला स्वत:चा ध्यास काय आहे किंवा सक्तीने आपण कुठल्या गोष्टी करत असतो, हे आपल्या लक्षात येईल.

कुठल्या कारणामुळे आपल्याला निर्बंधात असल्यासारखे वाटत राहाते आणि कुठल्या वातावरणात किंवा परिस्थितीमध्ये आपल्याला आरामदायक व मोकळे वाटते आणि मुख्य म्हणजे असे आपल्याला का वाटते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. स्वत: स्वत:चे अवलोकन केल्यामुळे आपल्याला असे लक्षात येते की, आपल्याला नक्की कशाचे भय आहे? किंवा आपले विचार कुठल्याप्रकारचे आहेत किंवा आपल्या मानसिक कल्पना या कुठल्या प्रकारच्या आहेत? आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये कशाप्रकारे व्यक्त होतो, हेसुद्धा सर्वांत चांगले असे आपल्याच ठाऊक असते.

स्वत:चे निरीक्षण करताना आपल्याला असे लक्षात येते की, आपल्याला बंधनकारक व आपल्याला आरामदायक गोष्टी कुठल्या आहेत आणि आपली ऊर्जा कुठल्या पद्धतीने चांगली राहू शकते. सत्याची ही जाणीव तयार होणे, हे फार उपयुक्त आहे. जेव्हा माणूस सत्यापासून दूर जातो व स्वत:च एकप्रकारचे चित्र स्वत:साठीच तयार करतो, ज्याला ’False perception of Reality’ असे म्हणतात, यालाच भ्रम किंवा व ’Dilusion’ असेही म्हटले जाते आणि जेव्हा आपण सत्य सोडून काही भ्रम किंवा भ्रामक कल्पनांनाच खरे मानू लागतो, त्यावेळी रोगकारकशक्तीची वाटचाल सुरू होते व शरीरामध्ये मेंदूपासून ते शरीरातील पेशींपर्यंत हाच भ्रामक संदेश पाठवला जातो व त्याचप्रमाणे आजाराची सुरुवात होत असते.

जेव्हा माणूस निरोगी (healthy condition) मध्ये असतो, त्यावेळी त्याच्या सर्वसाधारण गुणांचा तसेच शारीरिक अवयव व स्थितीचा व मानसिक स्थितीचा जर आपण आढावा घेतला, तर सर्व सुरळीत चाललेले असते. शारीरिक पातळीवर जर विचार केला, तर त्या माणसाचे सर्व अवयव, सर्व शरीर संस्था उत्तमप्रकारे व co-ordination ने काम करत असतात. त्याची भूक, तहान, झोप एकदम सुखकारक असते. त्याचप्रमाणे शरीरात कुठल्याही प्रकारचे अवघडलेपण, कुठल्याही प्रकारच्या वेदना नसतात. शारीरिक तापमान त्वचेची स्थिती, लैंगिक गरजा सर्वकाही व्यवस्थित प्रमाणामध्ये असते. याचे कारण सत्य परिस्थितीची जाणीव होऊन चैतन्यशक्ती कार्यरत असते, ती भ्रमित अवस्थेत नसते.

डॉ. मंदार पाटकर
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)
९८६९०६२२७६