भिकाऱ्यांचे डॉक्टर

    08-Oct-2023   
Total Views |
Article on Dr Abhijit Sonawane

अनेक गरजूंना मदत करून, उच्च शिक्षण घेऊन, गरिबांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्धी मिळालेले डॉ. अभिजित सोनावणे यांच्याबद्दल..

अडल्या नडल्याला मदत करणं, हा आपला स्वभावच. कुणाची आर्त हाक ऐकू आली आणि आपल्याकडे त्यावर उपाय असेल तर कसलीही अपेक्षा न करता आपण मदतीसाठी धावतो; पण केव्हापर्यंत? आपल्याला काही मर्यादा असतात. इतरही कामे असतात, आपली कर्तव्ये असतात, घर असतं, समाज असतो, आपली माणसं असतात. पण, काहींचा जन्मच समाजसेवा करण्यासाठी झालेला असतो. घरादारावर तुळशीपत्र ठेवून ते समाजसेवेचं व्रत घेतात. आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी समाजसेवेला सुरुवात केली. रस्त्यावर भीक मागणार्‍या कित्येक भिकार्‍यांमध्ये आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणावर असतात. त्यांच्या आजाराचे निदान करून डॉ. अभिजित त्यांच्यावर उपचार करतात.

अभिजित यांचा जन्म सातार्‍यातील मुचवड गावात झाला. घरची परिस्थिती बेताचीच. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर दवाखाना सुरू करण्यासाठी कोणतेही आर्थिक पाठबळ नव्हते. अशावेळी भीक मागणार्‍या एका आजोबांनी अभिजितला मदत केली. हा संदर्भ वाचून कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल. परंतु, अभिजित यांच्या सांगण्यानुसार, हे आजोबा स्वतः सुशिक्षित, चांगल्या घरातील असूनही काही कौटुंबिक घटनांमुळे त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ ओढवली. त्या आजोबांनी अभिजितला अनेक मोलाचे सल्ले दिले. रुग्णांच्या वेदनांना औषध देऊन डॉक्टरचे कर्तव्य संपत नाही, तर पीडितांच्या वेदनांचे वेदन करणे व त्यानुसार त्यांची शुश्रुषा करणे, हा वैद्याचा धर्म आहे, अशी शिकवण त्या आजोबांनी अभिजितला दिली.

सुरुवातीला नोकरी नसल्याने घरोघरी जाऊन अभिजित रुग्णांवर उपचार करीत असत, अशावेळी आर्थिक समस्याही बर्‍याच होत्या. आर्थिक समस्या भेडसावू लागल्या की, माणूस काही काळाने आपसूकच निराश होतो. अभिजित यांनाही त्या काळात नैराश्याने ग्रासले होते, त्यावेळी त्या आजोबांनी त्यांना मानसिक आधार दिला. तसेच वेळोवेळी आर्थिक साहाय्यही केले. ‘वेद शिकण्यासोबतच एखाद्याची वेदना समजून घेणे, हे वैद्य असल्याचं खरं लक्षण,’ हे त्यांनीच मनावर बिंबवलं! पुढे अभिजित यांना नोकरी मिळाली व आजोबांशी येणारा नित्याचा संबंध कमी झाला.

अभिजित एका आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये महाराष्ट्र प्रमुख म्हणून काम करीत होते, मासिक पगार तीन लाखांहून अधिक होता आणि अशातही ते समाधानी नव्हते! याहून अधिक पैसे कमावणे, हे त्यांच स्वप्न होतं. घर हवं, गाडी हवी, सगळ्या प्रकारची भौतिक सुखं हवी आणि त्यासाठी लागणारा पैसा हवा. पैसा मिळवण्यासाठी अजून वरचं पद हवं. महाराष्ट्र प्रमुख झाल्यावर, उद्या भारताचा प्रमुख होणे, जमलंच तर परवा जगातील काही देशांचासुद्धा प्रमुख होणे, हे त्याचं स्वप्न होतं. डॉ. अभिजित सांगतात की, “काळाच्या ओघात प्रतिष्ठेची नशा चढली असताना, मी आजोबांची सर्व शिकवण विसरून गेलो. नेमक्या अशावेळी मला समजले की, त्या आजोबांचे रस्त्यावरच बेवारस म्हणून निधन झाले.”

बापासारखा खंबीर आधार देणार्‍या आजोबांचे बेवारस म्हणून निधन झालेले ऐकताच अभिजित यांना मोठा धक्का बसला. दि. १५ ऑगस्ट रोजी देश स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना अभिजित यांनी स्वतःला पैशाच्या शर्यतीतून स्वतंत्र केले. नोकरी सोडली आणि त्यांनी पुण्यात ‘सोहम ट्रस्ट’ची स्थापना केली. मोटरसायकलवर आपला दवाखाना थाटला. सुरुवातीला भिकारी अभिजित यांना आपल्या जवळ फिरकू देत नसत. त्यांना वाटे आपल्याला पकडून हे पोलिसात देतील किंवा आपल्याला फसवून आपल्या किडन्या काढतील. २०१५ पासून २०१८ पर्यंत त्यांची जवळ-जवळ अडीच ते तीन वर्षं फक्त भिकार्‍यांमध्ये मिसळून जाण्यात गेली. यावेळी अभिजित त्यांच्यासोबत बसत असत, त्यांच्या पानात जे शिळं, नासलेलं अन्नसुद्धा ते खात असत. हळूहळू त्यांचा विश्वास संपादन करण्यात त्यांना यश आले. यानंतर भिकारी त्यांना आपली दुखणी सांगू लागले. या काळात अभिजित यांच्या पत्नी मनीषा यांनी संपूर्ण घराची जबाबदारी घेतली. अभिजित सांगतात की, “मनीषाच्या सहकार्याशिवाय हे काम मी करूच शकलो नसतो.”

आज पाच वर्षांनंतर डॉ. अभिजित सोनावणे यांचं भिक्षेकर्‍यांचं कुटुंब १ हजार, १०० इतक्या लोकांचं आहे. या कुटुंबात २०० ते ३०० इतके आईबाप आहेत. २०० ते ३०० लहान मुलेही आहेत आणि तितकेच आजीआजोबा आहेत. यातील ५२ मुलांचे शिक्षणसुद्धा डॉ. अभिजित पाहत आहेत. त्याचबरोबर त्यांनी सुमारे ५५० जणांची डोळ्यांची शस्त्रक्रियाही करून दिली आहे; तसेच या कार्यातून संपर्कात येणार्‍या भिकार्‍यांना पुढच्या आयुष्यात भीक न मागण्याचा आग्रह ते करतात. बेवारस म्हणून कित्येक वर्षे खितपत पडलेल्या १६ आजी आणि आजोबांना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वृद्धाश्रमांमध्ये निवारा मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आणि आता ते आजीआजोबा सोनावणे हे आडनाव आपल्या नावामागे लावतात. ‘भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी’ हे ‘सोहम ट्रस्ट’च्या कामाचे ब्रीदवाक्य आहे. भिकार्‍यांनी भीक मागणे सोडायला प्रवृत्त करणे सोपे नव्हते, त्याचबरोबर अभिजित यांनी त्यांना त्यांच्या कुवतीप्रमाणे वेगवेगळे व्यवसायही सूचवले. या प्रयत्नांना यश येऊन आतापर्यंत ८५ कुटुंबांनी भीक मागणे सोडलं आहे आणि ही कुटुंबं आज सन्मानाने जगत आहेत.

धर्मादाय आयुक्त कार्यालय, आयकर विभाग, महिला व बालकल्याण विभाग, दिनानाथ मंगेशकर रुग्णालय, लेले रुग्णालय, पोलीस विभाग यांसह पुण्यातील अनेक नामांकित संस्था आणि व्यक्तींनी त्यांना या कामात मदत केली आहे. भिकार्‍यांवर उपचार करणे, त्यांना सन्मार्गावर आणणे आणि यासाठी अखंडपणे प्रयत्न करीत राहणे, यासाठी ‘सोहम ट्रस्ट’ यापुढेही तत्पर राहीलच. दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने त्यांच्या कार्यास अनेकानेक शुभेच्छा!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.