मुंबई : चीनमधील हांगझाऊ येथे सुरू असलेल्या १९व्या आशियाई क्रीडास्पर्धेत भारताने बॅडमिंटन पुरुष दुहेरीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताच्या सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी या जोडीने बॅडमिंटनमधील पुरुष दुहेरीत पहिले सुवर्णपदक जिंकले. दरम्यान, या कामगिरीसह भारताच्या सात्विक आणि चिराग यांनी आशियाई क्रीडा २०२२ मध्ये बॅडमिंटन पुरुष दुहेरी स्पर्धेत इतिहास रचला.
यावेळी भारताच्या सात्विक-चिरागने कोरियाच्या चोई सोल्ग्यू आणि किम वोंहो यांचा सरळ गेममध्ये पराभव करून सुवर्णपदक जिंकले. या विजयासर भारताची पदकसंख्या शंभर पार गेली आहे. आजवरच्या इतिहासातील भारताची ही सर्वोत्तम पदकतालिका ठरली आहे.
या अंतिम सामन्यात सात्विक-चिराग यांनी पहिल्या गेममध्ये चांगली सुरुवात केली पण शेवटच्या टप्प्यात ते मागे पडले. भारत १४-१७ ने पिछाडीवर होते. पण पहिला गेम २१-१८ ने जिंकून जबरदस्त पुनरागमन केले. दोन्ही संघांनी फटकेबाजी करत अॅग्रेसिव्ह खेळी केली. या जोरावर सात्विक-चिरागने खेळाच्या सुरुवातीलाच विशेषत्वाने, चिराग शेट्टीने खेळाचा वेग बदलून नेटवर आपली विविधता दाखवून दिली.