चौथ्यांदा आरबीआयने रेपो रेट ' जैसे थे ' ठेवला
वित्तीय धोरण समितीच्या बहुमताने रेपो दर पुन्हा एकदा ६.५ टक्के ठरले असल्याचे शक्तिकांता दास यांनी बोलताना सांगितले.
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एमपीसी ( Monetary Policy Committee) च्या बैठकीनंतर पुन्हा एकदा चौथ्यांदा रेपो रेट ६.५ टक्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे याचा सरळ फायदा शेअर बाजारात दिसून आला आहे. ६ सदस्यांपैकी ५ सदस्यांच्या पाठिंब्यावर हा निर्णय घेण्यात आल्याचे आरबीआय गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी सांगितले आहे. शुक्रवारी सकाळी दास यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
पुन्हा एकदा ' Withdrawal of Accommodation ' या तत्वावर आरबीआयने शिक्कामोर्तब केले आहे. शेअर बाजारात सेन्सेक्स ३२४ पूर्णांकांने वाढून ६५९५५ पर्यंत व निफ्टी १९६०० वर स्थिर पहायला मिळाला. याबरोबरच रिटेल महागाई वाढण्याचा धोका यावेळी दास यांनी बोलताना सांगितला.आरबीआय याच कारणास्तव वित्त पुरवठ्यावर अंकुश ठेवून महागाई नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
भाज्या, इंधन, क्रुड यांच्या दरातील चढ्या किंमतीमुळे महागाईचे संकट आले होते. शेतातील उत्पन्न खरीप मोसमाच्या धर्तीवर घटल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आर्थिक वर्ष २३ - २४ च्या जुलै सप्टेंबर तिमाहीमध्ये जीडीपी दर ६.५ टक्के राहू शकतो असा अंदाज व्यक्त केला. ऑक्टोबर ते डिसेंबर २३ मध्ये ६ टक्के व जानेवारी ते मार्च २४ मध्ये ५.७ टक्के इतका जीडीपी दर राहण्याची शक्यता आरबीआयने वर्तवली आहे. मे २०२२ आणि फेब्रुवारी २३ मध्ये आरबीआयने रेपो रेट मध्ये बदल करून २५० बेसिस गुणांने वाढवून दर ६.५ टक्के पर्यंत आणला होता. धोरणात झालेल्या बदलामुळे भाज्या व एलपीजी गॅस सिलेंडरचा भावात कपात झाल्यास ग्राहकांना त्याचा दिलासा मिळू शकेल.
रिझर्व बँकेच्या एटंरप्राईज सर्वेनुसार, उत्पादन कंपन्यासाठी इनपूट दर वाढीस लागू शकतो.परंतु मागील आर्थिक वर्षातील तुलनेत विक्री दर वेगाने वाढण्याची संभाव्यता कमी आहे. सेल प्रेशरमुळे याचा विचार होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान दास यांनी बोलताना, सध्याच्या जागतिक परिस्थितीत अडचणींचा सामना करत देखील भारताची अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीने पुढे जाणार असल्याचा विश्वास शक्तिकांता दास यांनी व्यक्त केला.
याविषयी मुंबई तरूण भारत शी बोलताना होम्सफायचे चीफ फायनान्स ऑफिसर शशांक मेवाडा म्हणाले,' पुन्हा एकदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ( आरबीआय) ने विद्यमान रेपो दर ६.५ टक्के वर कायम ठेवून चांगला निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या या सातत्यपूर्ण स्थिर दराने आर्थिक समतोल व वाढीसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. आर्थिक आव्हाने, जागतिक अनिश्चितता यामध्ये व्यवसायिक व गुंतवणूकदारांना लक्षात घेऊन आरबीआय आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करतो. त्याच वेळी रिअल इस्टेटसह जिथे घराचे स्वप्न आवाक्यात आहे त्या सेक्टरमध्ये गुंतवणूकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय आर्थिक नियोजन व तज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. रेपो रेट मध्ये कोणताही बदल न झाल्याने आरबीआयच्या भूमिकेने अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. म्हणून हा निर्णय आनंदाने स्विकारतानाच आपण सावध राहण्याचे महत्व देखील ओळखले पाहिजे.'
याविषयी मुंबई तरूण भारत शी बोलताना हाउसिंग डॉटकॉम, प्रॉपटाईगर डॉटकॉम व मकान डॉटकॉम चे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव अगरवाला यांनी,' आरबीआयच्या रेपो रेटच्या निर्णय विकासाशी सुसंगत आहे. रेपो दर अपरिवर्तित ठेवल्यामुळे आगामी सणासुदीच्या काळात भारतातील बँकांकडे गृहखरेदीदारांना चांगले प्रोत्साहन देण्यासाठी अधिक लेगरूम असतील.देशातील निवासी मालमत्तेची मागणी सध्या उच्च पातळीवर असल्याचे लक्षात घेतल्यास भारतासाठी हे उल्लेखनीय आहे.
द्वैमासिक पतधोरण प्रतिक्रिया देताना श्रुती शिधये बँकिग प्रशिक्षक व अभ्यासक यांनी मुंबई तरूण भारत शी बोलताना, अपेक्षेप्रमाणे रेपो दर स्थिर ठेवून RBI नि ग्राहकाभिमुख धोरण राबवले अन्यथा ऐन सणासुदीला वाढीव व्याजदराचा फटका सोसावा लागला असता. त्यामुळे येऊ घातलेल्या सणात गृह तसेच वाहनखरेदीचा उत्साह द्विगुणित करण्याची शक्यता आहे.सहकारी बॅंका साठी मात्र सध्याच्या सगळ्यात लोकप्रिय product अर्थात गोल्ड लोन साठी आनंदाची बातमी दिली म्हणजे आता सहकारी बॅका 4 लाख पर्यंत बुलेट रिपेंमेंट चे गोल्ड लोन देऊ शकतात. एकूणच ' उत्साह वर्धक पतधोरण ' अस म्हणायला हरकत नाही.' अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अर्थसंकेतचे डॉ अमित बागवे यांनी 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दर ६.५० टक्के कायम ठेवला आहे. सलग चौथ्यांदा भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर ‘जैसे थे’च ठेवला आहे. मागील वर्षातील मे महिन्या पासून व्याजदरात एकूण अडीच टक्के वाढ केली आहे. वाढती महागाई नियंत्रणात ठेवणे हे रिझर्व्ह बँकेचे उद्दिष्ट आहे.ऑगस्ट २०२३ मध्ये किरकोळ महागाई दर जुलैच्या तुलनेत ६.८३% वर घसरला आहे. यामुळे कर्जाच्या व्याजदरात वाढ झाली नसल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.
याविषयी मत व्यक्त करताना अर्थतज्ज्ञ व चार्टर्ड अकाऊंटट केतन जोगळेकर यांनी, ' भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या अलीकडील घडामोडीत, आरबीआय किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेने बेंचमार्क रेपो दर 6.5% वर अपरिवर्तित ठेवला आहे.आजचा अपरिवर्तित रेपो रेट वाढत्या महागाईच्या चिंतेमुळे आणि स्थिर कर्ज खर्च राखण्यासाठी आवश्यकतेने प्रेरित आहे. ह्या धोरणामुळे बॅंकेंचे कर्ज व्याज दर स्थिर रहाणार आहेत आणि त्यामुळे बाजारावर फारसा परिणाम होणार नाही. तसेच रेपो रेट हा स्थिर राहिल्यामुळे मार्केट मधे तरलता कायम राहुन सणासुदीच्या काळात मार्केट स्थिर राहील.
मागील काही काळात बांधकाम व्यवसाय हा प्रामुख्याने रेपो रेट स्थिर असल्यामुळे तेजीत आहे तर तो तसाच राहण्याची आगामी काळात आशा आहे.गेल्या एक वर्षात गृहकर्जाचा इ एम आय बोजा वाढला आहे.काही बँकांनी थेट मासिक हप्त्यात वाढ केली आहे.तर काही बँकांनी कर्ज परतफेडीचे वर्ष वाढवली आहेत. दोन्ही प्रकारात ग्राहकांचे मरण होत आहे. चौथ्यांदा रेपो दर कायम ठेवल्याने ग्राहकांवर नवीन बोजा पडणार नाही. गेल्या काही काळात रेपो रेट वाढवल्यामुळे ग्राहकांना त्याचा फटका बसला होता पण आजच्या धोरणाप्रमाणे ह्याही तिमाहीत रेपो रेट स्थिर ठेवल्यामुळे ग्राहकांना एक प्रकारे दिलासाच म्हणता येइल ' असे उद्गार काढले आहेत.