नवी दिल्ली : विरोधी पक्षांचे नेते राहुल गांधी, शशी थरूर, राघव चढ्ढा आणि महुआ मोईत्रा यांनी आपले ‘अॅपल’ फोन हॅक झाल्याचा दावा केला आहे. मात्र, ‘अॅपल’सह केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा दावा फेटाळला आहे. फोन हॅकिंग अलर्टच्या ‘अॅपल’ वापरकर्त्यांच्या दाव्याविषयी केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, केंद्र सरकार या समस्येबद्दल चिंतित असून याचा सखोल तपास करण्यात येत आहे.
मात्र, अशाप्रकारे विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन हॅक झाल्याच्या दाव्यात तथ्य नाही. मात्र, देशाची प्रगती मान्य नसणारे अनेक लोक देशात असून ते केवळ स्वतःच्या कुटुंबाचा विचार करतात. त्याचप्रमाणे विविध १५० देशातील विविध लोकांना ‘अॅपल’ फोन हॅक केल्याच्या सुचना मिळाल्या आहेत, असेही केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी म्हटले आहे.
विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या या दाव्यांदरम्यान ‘अॅपल’नेदेखील निवेदन जारी करून विरोधी पक्षांच्या नेत्यांचे दावे नाकारले आहेत. ‘अॅपल’ने म्हटले आहे की, ‘अॅपल’कोणत्याही देशाच्या सरकारला हॅकिंग अलार्मसाठी जबाबदार धरत नाही. शक्य आहे की काही धोक्याच्या सूचना फॉल्स अलार्म असू शकतात. त्यामुळे असा अलार्म का आला, हे सांगणे शक्य नसल्याचेही ‘अॅपल’ने म्हटले आहे.