आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे: संजय राऊत
03-Oct-2023
Total Views | 45
मुंबई : नांदेड जिल्ह्यातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात २४ तासांत तब्बल २४ जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेवर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असं राऊत म्हणाले आहेत.
"ही गेल्या वर्षभरातली पहिली घटना नाही. कळव्याच्या पालिका रुग्णालयात काय झालं होतं? महाराष्ट्रातल्या प्रत्येक शासकीय रुग्णालयात सध्या ही परिस्थिती आहे. कळव्याच्या रुग्णालयातील प्रकारानंतर अजित पवारांनी प्रश्न विचारला होता की मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात हे कसं घडू शकतं? त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं नाही. ते संपूर्ण राज्याचे पालक आहेत. सरकारला फक्त जमिनीच्या व्यवहारात, परदेश दौऱ्यात, माणसं फोडण्यात रस आहे."
“जर थोडीतरी माणुसकी शिल्लक असेल, तर मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा ताबडतोब घ्यावा. आरोग्यमंत्र्यांना त्यांच्या खात्यात रस नसून ते वेगळ्याच कामात अडकलेले असतात. सरकार अस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न आहे. महाराष्ट्रात कुठलं दुर्लक्षित मंत्रालय असेल, तर तो आरोग्य विभाग आहे.” असं राऊत म्हणाले आहेत.