इस्रायल आणि गाझा पट्टीतील ‘हमास’ दहशतवादी संघटना यांच्यात सध्या युद्ध चालू आहे. त्याच्या अनेक बातम्या प्रतिदिन येत आहेत आणि या सर्व परिस्थितीत भारताने इस्रायलकडून काय शिकावे, याविषयी केलेले विश्लेषण.
इस्रायलमधील अंतर्गत वादाचा ‘हमास’ला लाभ
एखाद्या देशातील अंतर्गत राजकीय, सामाजिक परिस्थिती नाजूक असते, तेव्हा त्या देशावर आक्रमण केले की, मग आपसुकच संबंधित देशाची पुष्कळ हानी होते. इस्रायलमध्येही तेच घडले. तिथे गेल्या दोन वर्षांत चार वेगवेगळी सरकारे स्थापन झाली. इस्रायलचे लष्कर, समाज, न्यायव्यवस्था, राजकीय नेत्यांमध्येही मतभेद निर्माण झाले. ते एकमेकांबरोबर अंतर्गत वादांमध्ये गुंतले. ज्यावेळी अशा प्रकारे स्थिती निर्माण होते, त्यावेळी शत्रूवरील लक्ष आपसुकच कमी होते. अशा वातावरणाचा ‘हमास’ने पुरेपूर लाभ घेतला. इस्रायलमध्ये आक्रमण झाल्यानंतर जेव्हा नवे सरकार स्थापन झाले, तेव्हा ते सगळे मतभेद विसरून एकत्र आले. अत्यंत कठोर प्रतिआक्रमण इस्रायली सैन्याने केले. इस्रायलच्या प्रत्युत्तराची तीव्रता प्रचंड होती, यात शंकाच नाही. म्हणूनच देशाच्या सुरक्षेबाबत राजकीय पक्षांचे एकमत असायला पाहिजे. ‘राष्ट्र प्रथम’ हीच विचारधारा महत्त्वाची. राजकीय मतभेद त्यानंतर. मग अशी परिस्थिती उद्भवल्यास देशाच्या शत्रूंच्या विरोधात भारत एक होऊ शकतो का?
इस्रायलची सर्वच स्तरांवरील लढवय्या वृत्ती कमी
‘हमास’ने अत्यंत जुन्या पद्धतीने इस्रायलच्या सीमेवरील कुंपण ट्रॅक्टर, हॅण्ड ग्रेनेड आणि अन्य वस्तू यांचा वापर करून उद्ध्वस्त केले. अशा प्रकारे कुंपण तोडले जाईल, याची इस्रायलने कधीही कल्पना केली नव्हती. त्या कुंपणापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर युवकांचा कार्यक्रम चालू होता. या कार्यक्रमात चार हजारांहून अधिक तरुण-तरुणी सहभागी होते, तर आक्रमण करणारे दहशतवादी केवळ १५-२० असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे. संख्याबळ खूप जास्त असूनही, ते युवक दहशतवाद्यांशी लढू शकले नाहीत; कारण इस्रायलसुद्धा आता ‘सॉफ्ट कंट्री’ (मवाळ देश) बनत चालला आहे. शहरीकरण वाढले की, लढाऊ वृत्ती कमी होते. लोकांना पांढरपेशी नोकर्या हव्या असतात. त्यामुळे लढाई करण्याचे धाडस गायब होते. म्हणूनच मग या चार हजार युवकांना लढता आले नसते का?
या संदर्भात १०-१५ वर्षांपूर्वी भारतात घडलेली एक घटना आठवते. भारतात आलेल्या चार इस्रायली पर्यटकांना दहशतवाद्यांनी पकडले होते. तेव्हा त्या दहशतवाद्यांना मारून, हे इस्रायली पळून आले होते. ती लढवय्या वृत्ती कमी झालेली दिसते. एकूणच या दहशतवादी आक्रमणाचा पुरेसा प्रतिकार पहिल्या २४ तासांत झाला नाही. इस्रायलची गुप्तचर यंत्रणा, सरकार आणि प्रशासन या सर्वच स्तरांवरील लढवय्या वृत्ती कमी झाली, अशी शंका उपस्थित करायला म्हणूनच वाव आहे. आपत्ती काळात कसे वागायचे, याचे सर्वसामान्य नागरिकांना शिक्षण देणे आवश्यक आहे. देशभक्ती आणि लढाऊ वृत्ती देशात कशी वाढवायची? तर ‘अग्निवीर’ योजना हे एक उत्तर होऊ शकते.
इस्रायलला ‘लक्ष्य’ ठरवताना आव्हान
प्रतिआक्रमण करताना ‘लक्ष्य’ (टार्गेट) ठरवावे लागते. इस्रायलला ते ठरवता येत नाही; कारण गाझामध्ये अनेक नागरिकही राहत होते. गाझामधील इमारतींमध्ये वरच्या मजल्यांवर नागरिक, तर खालच्या मजल्यांवर दहशतवादी, अशी स्थिती. त्यामुळे इस्रायलला ‘लक्ष्य’ ठरवणे आव्हानात्मकच. त्यामुळे अनेक सामान्य नागरिकांचाही या युद्धात मृत्यू झाला. हासुद्धा ‘हमास’च्या डावपेचांचा एक भाग आहे, ज्यामध्ये सामान्य नागरिकांचा वापर ढाल म्हणून केला जातो. ‘हमास’ने गेल्या नऊ ते दहा वर्षांत भूमीच्या खाली भुयारे बनवली आहेत. ती भुयारे ५०० किलोमीटर लांब आहेत. या भुयारांवर सामान्य शस्त्रांचा काही परिणाम होत नाही; कारण ती भूमीखाली २५ ते ३० मीटर खोलीवर आहेत. त्यामुळे आता इस्रायल भूमीवरून आक्रमण करण्याच्या सिद्धतेत आहे.
आधुनिक आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारे तंत्रज्ञान वापरता, आता तंत्रज्ञान पुष्कळ पुढे गेले आहे. इस्रायलचेच उदाहरण घ्यायचे झाले, तर त्यांच्याकडे क्षेपणास्त्रे हवेत नष्ट करणारे ‘आयर्न डोम’ (क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा) होते; पण ते वेळेत चालले नाही. भारताकडेही असे अनेक प्रकारचे तंत्रज्ञान सज्ज आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी शेवटी माणूसच लागतो. ती व्यक्ती कमी पडून चालत नाही. तिचे प्रशिक्षण चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. पुण्यातच बघितले, तर हजारो ठिकाणी ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसवलेले आहेत. त्यावर कोणाचे लक्ष आहे? चोरी किंवा अन्य प्रकरणांमध्ये त्यांचा वापर किती उपयोग झाला आहे?
नेहमीच शस्त्राविरुद्ध प्रतिआक्रमण करणारे शस्त्र बनवले जातेच. क्षेपणास्त्र बनवले, तर ते नष्ट करणारे अधिक क्षमतेचे क्षेपणास्त्र बनवले जाते. असे सतत घडतच असते. तंत्रज्ञान वेगाने वाढत आहे. त्यापैकी आपल्या शत्रूविरुद्ध आपण सर्वात आधुनिक आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारे तंत्रज्ञान आपल्याला वापरता आले पाहिजे. वर्ष २०२२ मध्ये पाकने पंजाबमध्ये तब्बल २८८ वेळा ड्रोन्स पाठवून १५ ते १६ हजार किलो चरस, अफू, गांजा पाठवला. पाकच्या या ‘ड्रोन युद्धा’ला भारताने अपेक्षित प्रत्युत्तर दिले नाही, असेच म्हणावे लागेल.
रणगाडे, लढाऊ नौका, लढाऊ विमानांविरोधात क्षेपणास्त्र सज्जता
रणगाड्याला प्रत्युत्तर म्हणून रणगाडा विरोधक क्षेपणास्त्रे बनवली गेली. त्याला प्रत्युत्तर म्हणून अजून जास्त मजबूत रणगाडे बनवले गेले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून अजून ताकदवान रणगाडा विरोधक क्षेपणास्त्रे बनवली जात आहेत. रणगाडा विरुद्ध रणगाडा विरोधक क्षेपणास्त्रे ही लढाई अनेक वर्षांपासून चालू आहे आणि चालूच राहील. सध्या तरी या लढाईमध्ये रणगाडा विरोधक क्षेपणास्त्रे जास्त उपयुक्त ठरली आहे. कारण, त्यांची किंमत फारच कमी आहे. अशीच लढाई आता लढाऊ विमाने विरुद्ध जमिनीवरून हल्ला केली जाणारी विमानविरोधी क्षेपणास्त्रांची सुरू आहे. यामध्ये विमानविरोधी क्षेपणास्त्र जास्त पुढे असल्याचे दिसून येते. कारण, ती अत्यंत स्वस्त आहेत आणि फार मोठ्या संख्येने तैनात केली जाऊ शकतात. सध्या कुठलेही शस्त्र जर दुरून ओळखता आले, तर त्यांना खूप लांबून स्टॅण्ड ऑफ क्षेपणास्त्रांचा वापर करून बरबाद करता येते. म्हणूनच रणगाडे, चिलखती वाहने, मोठ्या तोफा, फायटर एअर क्राफ्ट, मोठ्या लढाऊ नौका यांचे अस्तित्व अत्यंत धोक्यात आले आहे. म्हणूनच भारत रणगाडे विरुद्ध क्षेपणास्त्रे, फायटर एअर क्राफ्ट, विरोधी क्षेपणास्त्रे यांनी सज्ज झाला पाहिजे. याशिवाय ड्रोन म्हणजे मानवरहित छोटी विमाने यांचा उपयोग प्रचंड प्रमाणामध्ये वाढतो आहे. कारण, ती अत्यंत स्वस्त आहेत. म्हणून ड्रोन्सचा वापर आणि तैनाती भारताच्या तिन्ही दलांत अजून जास्त वाढली पाहिजे.
सोशल मीडिया नावाचे शस्त्र
आता पाकिस्तान पारंपरिक युद्ध करणार नाही; कारण त्याने आक्रमण केले, तर आपण (भारत) ‘सर्जिकल स्ट्राईक’ करू, याची पाकिस्तानी सैन्यालाही पुरेपूर कल्पना आहे. त्यामुळेच पाककडून भारतात हजारो किलो अमली पदार्थ पाठवले जात आहेत. पाककडून बनावट नोटा भारतात पाठवल्या जात आहेत. बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढत आहे. ही युद्धाची आव्हाने आहेत. त्याचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे लागेल. सोशल मीडियाचा ‘हमास’ एक शस्त्र म्हणून वापर करत आहे. समाजमाध्यमांच्या वापरावर नियंत्रण आणायला हवे. सोशल मीडिया, फेसबुक यांच्यावरील लिखाणामुळे दंगली भडकतात. त्यासाठी समाजमाध्यमांवरील खाती नोंदवण्यासाठी त्याला आधारकार्ड बंधनकारक करणे आवश्यक आहे, तरच खोटी खाती उघडून केल्या जाणार्या देशद्रोही, प्रक्षोभक लिखाणावर मर्यादा येईल.
भारताने काय शिकावे?
चीन, पाकिस्तान, नक्षलवादी, बांगलादेशी घुसखोर आणि त्यांचे भारतातील समर्थक हे भारताचे शत्रू प्रत्येक वेळी आपल्यावर आक्रमण करण्यासाठी नावीन्यपूर्ण डावपेच (Innovative tactics), आधुनिक तंत्रज्ञान वापरतील. भारतात प्रत्यक्ष युद्ध होण्याची शक्यता अल्प आहे. भारतात हिंसक आंदोलने आणि घातपाताचा जिहाद होईल. वेगवेगळ्या कारणाने आंदोलने, रस्ते बंद करणे, रेल्वेचे घातपात घडवून आणणे अशी माध्यमे वापरली जातील.
जेव्हा देशात पुष्कळ काळ शांतता असते, तेव्हा सतर्कता कमी होते. नागरिक, सैन्य दले असे कुणीच २४ तास सतर्क राहू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती. शांतता काळातही सतत सतर्क कसे राहायचे, हे बघितले पाहिजे. अखंड सावधान राहा. डोळे आणि कान उघडे ठेवा. भारतीय म्हणून एक व्हा!
(नि.) ब्रि. हेमंत महाजन