ठाणे : ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा कळवा विभागाच्या व्हॉल्वमन कर्मचार्याना ऑगस्ट, सप्टेंबर या दोन महिन्याचे वेतन अद्यापही अदा केलेले नाही. म्हणून काम बंद न करता कामगारांनी काळ्या फिती लावून आंदोलन सुरू केले आहे. ऑक्टोबर महिना संपत आला आहे. घरात रेशन नाही, मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. उधारी वाले कामगारांना सतावत असल्याने कामगारांवर प्रचंड ताण असुन कामगारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.
ठाणे महापालिका आयुक्त यांच्या निदर्शनास कामगारांच्या समस्या आणून दिल्या आहेत. आज कळवा प्रभाग समितीचे उप आयुक्त मनिष जोशी आणि सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना भेटून कैफियत मांडली. थकीत पगारासाठी काळ्या फिती लावून कळवा प्रभाग समितीसमोर रोज एक तास आंदोलन करणार असल्याचे यावेळी युनियनच्या वतीने सांगितले.
कामगारांना त्वरित वेतन अदा करावे. दिपावलीच्या आगोदर बोनस मिळवून देण्याचीही मागणी या वेळी करण्यात आली.उपायुक्त मनिष जोशी यांनी, पाणी पुरवठा विभागाची जबाबदारी ठामपाच्या उपनगर अभियंता विनोद पवार यांच्याकडे आहे. तुमच्या मागण्या मी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे स्पष्ट केले. नागरिकांना त्रास न देता संबंधित कामगारांनी आंदोलन करूनही प्रश्न सुटले नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा श्रमिक जनता संघ युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी दिला आहे. या आंदोलनात सुमारे ७०- ७५ कामगार सहभागी झाले होते.