हॉलिवूडमधील चित्रपट निर्मात्यांकडून चित्रपटाची केवळ संहितालिहिणार्या लेखकांना पुरेसे मानधनच दिले जात नाही, अशी वर्षानुवर्षाची तक्रार कायम आहे. यामुळे हे सर्व जण रस्त्यावर उतरले असून, त्यांचा गेल्या १५० दिवसांहून अधिक अमेरिकेत संप सुरुच आहे. या संपामागे बरीच कारणे असून यानिमित्ताने त्याचा आढावा घेण्याची गरज आहे.
चित्रपट हिंदी असो की इंग्रजी, तो आवडीने बघणारे लगेच सांगू शकतील की, उत्तम चित्रपटाचा गाभा कोणता, तर त्या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, योग्य पात्रांची निवड वगैरे आणि अर्थातच पात्ररचना. अर्थात, हे जगातील सर्वच देशातील आणि सर्व भाषांमधील चित्रपटांना लागू होणारे तत्त्व. हिंदी चित्रपटांमध्ये एकेकाळी सलीम-जावेद यांचे नाव आवर्जून चित्रपटाच्या पोस्टरवर लिहिलेले असावयाचे. सलीम-जावेद हे चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहीत असत. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटाकडे आकृष्ट करण्यासाठी चित्रपटाचा दिग्दर्शक जेवढा महत्त्वाचा, तेवढाच कथा, पटकथा लिहिणारा लेखकही महत्त्वाचा. आता हे सर्व सांगावयाचे कारण म्हणजे हॉलिवूडमधील ‘डिस्ने’, ‘ट्वेन्टीएथ सेंच्युरी फॉक्स’, ‘पॅरामाऊंट’ आणि इतर तत्सम बड्या कंपन्यांकडून ज्या चित्रपटांची निर्मिती केली जाते, जे चित्रपट प्रदर्शित केले जातात, तेथे ही चित्रपटाचा दिग्दर्शक आणि चित्रपटाचा पटकथा लेखक या दोघांमुळे त्यांनी बनविलेला चित्रपट, हा रसिकांना आकृष्ट करतो. वानगीदाखल उदाहरणच द्यावयाचे झाले तर ख्रिस्तोफर नोलन, स्टीव्हन स्पीलबर्ग यांची उदाहरणे देता येतील. यामध्ये अनेक चित्रपट दिग्दर्शक हे स्वतःच कथा आणि पटकथा लिहिणारेही असतात.
पण, हॉलिवूडमधील चित्रपट निर्मात्यांकडून चित्रपटाची केवळ संहिता लिहिणार्या लेखकांना पुरेसे मानधनच दिले जात नाही, अशी अनेकवर्षे तक्रार होती आणि अजूनही ती तक्रार कायम आहे. यामुळे हे सर्व जण रस्त्यावर उतरले असून, त्यांचा गेल्या १५० दिवसांहून अधिक अमेरिकेत संप सुरुच आहे. या संपकर्यांना पाठिंबा देण्यासाठी आता तेथील चित्रपट कलाकार, वेबसीरिज कलाकार हेही आता रस्त्यावर उतरलेले दिसतात. या संपामागे बरीच कारणे असून, याचा आढावा घेण्याची गरज आहे.
’रायटर्स गिल्ड ऑफ अमेरिका’ या चित्रपट उद्योगातील लेखकांच्या संघटनेतर्फे, हे आंदोलन अमेरिकेत चालू आहे. त्यामुळे चित्रपटाचे डबिंग, संकलन, रेकॉर्डिंग आणि अशीच अनेक तत्सम कामे खोळंबली असून, अनेक चित्रपटांचे प्रदर्शनही लांबणीवर पडले आहे. पण, चित्रपट निर्माते एवढे निगरगट्ट झाले आहेत की, अजूनपर्यंत कोणत्याही चित्रपट निर्मात्याने, या संपकर्यांशी बोलणी करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे ऐकीवात नाही. हे चित्रपट निर्माते एकापेक्षा एक श्रीमंत अब्जाधीश असून, प्रत्येकाचे अनेक एकरांवर पसरलेले बंगले, त्यांची स्वतःची विमाने, स्वतःच्या क्रूज, बोटी आहेत. पण, वर उल्लेखलेल्या पडद्यामागील कलाकारांना त्यांचा योग्य मेहनताना देताना, या सर्वांचे हात आखडतात, हे दुर्दैवच.
‘रायटर्स गिल्ड ऑफ अमेरिका’ ही या संपकर्यांची संघटना असून, त्या संघटनेकडून त्यांनी या संपकरी लोकांकडून पूर्वी वेळोवेळी सभासदत्व शुल्क आणि ’इमर्जन्सी’ निधी जो गोळा केला होता, त्यामधूनच थोडी रक्कम या संपकर्यांच्या उदरनिर्वाहासाठी देणे, या संघटनेला भाग पडत आहे. हा संप कधी मिटणार, हे तूर्तास कोणीही सांगू शकत नाही. पण, सध्या ’आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि ’चॅट जीपीटी’ या सॉफ्टवेअरच्या आगमनामुळे, हे संपकरी अजूनच भयभीत झालेले दिसतात.
‘चॅट जीपीटी‘मार्फत एखादे कथासूत्र आणि त्याला पूरक असणारी माहिती त्याला देण्यात आली की, या सॉफ्टवेअरमार्फत एकदम तयार संहिता थोडक्या काळात हातात येते. अर्थात, ही संहिता पूर्णपणे स्वीकारता येण्याजोगी नसली तरी पटकथा लेखनामधील आराखडा आणि इतर बरीच कामे ’चॅट जीपीटी’ मुळे सुलभ होतात, हे सत्य आहे. त्यामुळे बाडेच्या बाडे संहिता लिहिण्याचे कष्टप्रद काम आता ’चॅट जीपीटी’मार्फत होणार आहे. त्यामुळे एखादा अनुभवी आणि मुरलेला पटकथा लेखक हे सॉफ्टवेअरकडून मिळालेली संहिता तपासून त्यामध्ये रूपरेषा, विषय, भाषाशैली यामध्ये सुधारणा करून देखील वापरू शकतो. आगामी काळात हे काम हळूहळू का होईना, सुलभ आणि सोयीस्कर होत जाणार आहे. त्यामुळे संहिता लिहिणार्या अनुभवी लोकांची गरज कमी-कमी होत जाणार आहे. गरजेनुसार ’चॅट जीपीटी’च्या नवनवीन आवृत्त्या येत जातील आणि हे काम जास्तीत जास्त सोपे कसे होईल, याकडे लक्ष दिले जाऊ शकते. त्यामुळे संहिता तपासणार्यांची गरज यापुढील काळात वाढणार आहे. पण, यामुळे आपला रोजगार जाऊ शकतो, या कल्पनेने हे संपकरी हैराण झालेले आहेत. या नवीन तंत्रज्ञानाच्या आगमनाचा आवाका आणि वेग जबरदस्त असून, लोकांना हे बदल स्वीकारून भविष्यासाठी सज्ज होणे आवश्यक बनले आहे. जे लोक या तंत्रज्ञानाशी लवकरात लवकर जुळवून घेतील, तेच या क्षेत्रात टिकू शकतील, ही वस्तुस्थिती. चित्रपट निर्माते त्यांचे पैसे वाचत असतील, तर या तंत्रज्ञानाच्या उपयोगाला प्राधान्य देतील, हे स्पष्ट आहे.
‘चॅट जीपीटी‘ तंत्रज्ञान हे काही कामे वेगवान आणि स्वयंचलित करून विविध व्यवसाय आणि करिअर यांच्यामध्ये याआधी कधीही न झालेला बदल घडवून आणत आहे. काही सर्जनशील (क्रिएटिव्ह) व्यवसाय बदलत आहेत आणि काही नवीन व्यवसाय ही जन्माला येणार आहेत. जनरेटिव्ह ‘एआय‘ (कृत्रिम बुद्धिमत्ता) मध्ये लोगो, लेआऊट्स आणि इतर व्हिज्युअल घटकांचे डिझाईन स्वयंचलित करण्याची क्षमता आहे. जनरेटिव्ह ‘एआय’चा लेखन आणि साहित्य निर्मिती उद्योगांवरही परिणाम झाला आहे. ‘चॅट जीपीटी‘ विशेषतः लेख, कथा आणि इतर लिखित सामग्री तयार करण्यासाठी वापरले जात आहे. ‘ओपन एआय’सारख्या कंपन्यांनी, असे मॉडेल विकसित केले आहे, ज्यामुळे बातम्या, लेख आणि एवढेच काय या तंत्रज्ञानामुळे लेखन साहित्य तयार करणे सोपे झाले आहे. अर्थात, यामुळे एकूणच लिखाणाच्या गुणवत्तेवर होणार्या परिणामाबद्दलही चिंता निर्माण झाली आहे. पण, त्यावरही पुढील काळात उपाय सापडू शकतात, ही वस्तुस्थिती आहे.
’चॅट जीपीटी’चा वापर करून एखाद्या प्रसंगासाठी गीताचे शब्द सूचविण्यास ’चॅट जीपीटी’ला सांगितले, तर वेबवरील उपलब्ध शब्दसंचयातून कच्चा माल ’चॅट जीपीटी’ देऊ शकेल. मग त्या शब्दभांडारातून घासून पुसून कदाचित एखादे गीत बनूनही जाऊ शकते. त्या गीताला यमकात बसवायचे असेल, तर गीतकार त्या गीतामध्ये थोडेफार बदल करून त्याला नवीन रूपडे देऊ शकतो. ‘चॅट जीपीटी‘ला वाद्यांची माहिती देऊन, या गीतासाठी एखादा र्हिदम सूचविण्यास सांगितला, तर तोही मोडक्या तोडक्या ’नोटेशन’मध्ये मिळू शकेल. हे सर्व जर-तर यामध्ये बसणारे नाही, तर ’चॅट जीपीटी’चा अमर्यादित आवाका कळावा म्हणून मांडलेले आहे. एखाद्या पटकथेचा जसा उत्तरार्ध लिहिला जातो, तसे ’चॅट जीपीटी’च्या साहाय्याने पूर्वार्धही मिळू शकतो. अर्थात, तो कितपत समर्पक असेल, याबाबत शंका असली तरी याचा आवाका कळू शकतो.
या संपामध्ये सामील झालेल्या लोकांकडे असणारा व्यक्तिगत अर्थसंचय उतरणीला लागला असून, १५० दिवसांनंतर या सर्वांना खर्च भागविणे अशक्य बनलेले आहे. उदाहरणच द्यावयाचे तर ’क्वांटिको’ आणि ’न्यू अॅमस्टरडॅम’ या टेलिव्हिजन सीरिज लिहिणारी गिसेल लीगीर हिने तर तिच्याकडे आता १५० दिवसांच्या संपानंतर फक्त एक महिना पुरू शकेल, एवढीच बचत शिल्लक आहे, असे जाहीरपणे सांगितलेले आहे. अनेकजण तर पुरते दिवाळखोर झालेले आहेत. या संपकरी लोकांच्या मागण्यांमध्ये किमान वेतन, आरोग्य विमा आणि निवृत्ती वेतन समाविष्ट आहे.
या संपकर्यांना पाठिंबा देण्यासाठी अमेरिकेतील चित्रपट उद्योगातील, ज्या काही ख्यातनाम व्यक्ती उतरल्या होत्या, त्यांनीही या संपातून हळूहळू काढता पाय घेण्यास सुरुवात केली आहे. हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ड्रयू बॅरिमोर हिने तिच्या ‘टॉक शो’मध्ये परतण्याचे जाहीर केलेले आहे. तसेच बिल महेर यानेही तो निवेदक असणार्या ’रिअल टाईम बिल महेर’च्या पुढील सीझनचे शेड्यूल जाहीर केलेले आहे. त्याने त्याच्या आयुष्यातील १५० दिवस वाया गेल्याचे म्हटलेले आहे. संपकर्यांना आपली सहानभूती असेल, असेही त्याने जाहीर केलेले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि ‘चॅट जीपीटी‘च्या वापराचा चित्रपट उद्योगावर नेमका काय परिणाम होणार आहे, याचा या संपकर्यांना पूर्ण अंदाज आला नसला तरी जो काही आवाका या तंत्रज्ञानाने गाठला आहे, त्याने अभिनेते, संवादलेखक, कथा व पटकथालेखक यांच्या पोटात गोळा आला आहे, हे निश्चित. या ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या तंत्रज्ञानाची झेप एवढी मोठी आहे की, ज्या प्रसिद्ध अभिनेत्यांचे यापूर्वीच निधन झाले आहे, त्यांची उपलब्ध असणारी छायाचित्रे, मुद्रित केला गेलेला आवाज, वेगवेगळ्या संवाद फेकीमध्ये वापरला गेलेला आवाज यांचा मेळ घालून त्या अभिनेत्याकडून छोटी भूमिकाही एखाद्या नवीन चित्रपटातून पार पडताना दिसेल. तसेच एखाद्या अभिनेत्याला एका किंवा दोन दिवसांचे मानधन देऊन विविध कपड्यांतील त्याची छायाचित्रे आणि विविध आवाजांतील संवाद मुद्रित करून त्याचा उर्वरित चित्रपटात वापर केला जाण्याची भीती, या अभिनेत्यांना वाटते.
त्यामुळे चित्रपट निर्मात्यांशी करार करताना ’कृत्रिम बुद्धिमते’च्या तंत्रज्ञानाचा वापर करून जर उर्वरित चित्रपट निर्मिती होणार असेल, तर त्याबद्दल करारामध्ये उल्लेख करावा लागेल, अशी मागणी केली जाऊ शकते. ज्याला इंग्रजीमध्ये ’अन नन टेरिटोरी’ (अज्ञात प्रदेश) म्हटले जाते, तसे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ आणि ‘चॅट जीपीटी‘ या दोघांचा अमर्यादित आवाका आहे. त्याचा पुरेपूर वापर/उपयोग चित्रपट निर्मात्यांकडून होणार, हे उघड आहे आणि ते पैसे वाचविण्यासाठी किरकोळ मानधनावर या कथा, पटकथा, संवाद लेखक आणि अभिनेत्यांची बोळवण करणार, अशीच या सर्वांना भीती वाटते. सुरुवातीला या तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये सफाई दिसून आली नाही, तरी जसजसे याचा वापर सुरू होईल, तसतसे या तंत्रज्ञानाच्या वापरात सुलभता येईल, हे स्पष्ट आहे.
या पुढील काळात नवनवीन तंत्रज्ञानाबरोबर जुळवून घेण्याशिवाय या सर्वांना पर्याय राहणार नाही, हे उत्तरोत्तर स्पष्ट होत जाईल.
सनत्कुमार कोल्हटकर