मुंबई : सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजल नियोजनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली असून, त्यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
साताऱ्यातील दुष्काळप्रवण तसेच जे भाग पाण्यापासून संपूर्णपणे वंचित होते, त्या परिसराला यामुळे कृष्णा प्रकल्पाचे पाणी उपलब्ध होणार आहे. दोन टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार असून मुख्यत्वे चार तालुक्यातील ९००० हेक्टरला यामुळे सिंचन मिळणार आहे. यात सातारा, कोरेगाव, माण आणि खटाव तालुक्यांचा समावेश आहे. स्व. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनासुद्धा यामुळे लाभान्वित होणार आहे. सातारा जिल्ह्यातील विशेषत: या तालुक्यांमधील शेतकऱ्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे.