सामाजिक बांधिलकीच्या कायद्याची ‘विद्या’

    19-Oct-2023
Total Views | 28
vidya 2

शिक्षणाच्या मुळाशी ’विनय’ असायला हवा, या संदर्भातील लोकप्रिय सुविचार ‘विद्या विनयेन शोभते’ हा आजही तितकाच लोकप्रिय आहे. त्यानुसार आचरण करणार्‍या ठाण्यातील कायदेतज्ज्ञ विद्या मोहिते या आहेत. सामाजिक बांधिलकी जपणार्‍या आजच्या युगातील त्या नवदुर्गाच आहेत.

कोकणात चिपळुणातील छोट्याशा गावातून ठाण्यात आलेल्या विद्या मोहिते पुढे याच शहराच्या झाल्या. त्यांनी कायद्याचे मार्गदर्शन करण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा आपला व्यासंग कायम ठेवला आहे. मुंबई महानगरला लागून असलेल्या ठाणे शहरात स्थिर होणे आणि आपले अस्तित्व टिकवण्यासाठी केलेला संघर्ष आणि त्यातून समाजसेवेसाठी स्वतःला वाहून घेण्याचे कार्य विद्या यांनी केले आहे. कोणताही स्वार्थ न बाळगता उपेक्षितांच्या मदतीसाठी धावून जाणे त्यांच्या प्रश्नांसाठी स्वतःला झोकून देणे, त्यासाठी वेळप्रसंगी मोर्चे काढणे, आंदोलने करणे, अधिकार्‍यांना भेटणे ही कामे विद्या यांच्या जीवनातील नेहमीचीच आहेत. त्याचबरोबर स्वच्छता मोहीम राबवणे, झोपडपट्टीवासीयांच्या अस्तित्वासाठी हातात झेंडा घेऊन रेल्वे अडवणे अशा विविधांगी कार्यक्रमातून लोक काय म्हणतील याची तमा न बाळगता जनसेवेसाठी संघर्ष करण्याचा विडाच अ‍ॅड. विद्या मोहिते यांनी घेतला आहे. विद्या मोहिते यांच्या सामाजिक संघर्षाची सुरुवात ठाण्यातूनच झाली. त्यावेळी एक मोठी कंपनी बंद पडली होती. त्यामुळे शेकडो कामगारांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली. कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना वार्‍यावर सोडले होते. अशाप्रसंगी कामगारांना एकत्र आणून विद्या यांनी वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी कंपनी विरोधात दंड थोपटले. त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि केलेल्या आंदोलनामुळे अवघ्या सात दिवसात कंपनी प्रशासनाला दखल घ्यावी लागली. त्यांनी कामगारांच्या मागण्या मान्य केल्या आणि कामगारांना पुन्हा कामावर घेतलं.

या घटनेनंतर विद्या यांच्या सामाजिक कार्यकाळात अनेक कठीण प्रसंग आलेत. एका महिलेवरअत्याचार झाला होता. तिच्या बाजूने बोलणारे कोणीच नव्हतं. त्यावेळी विद्या यांनी पुढाकार घेत अन्य महिलांना एकत्र करून पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि त्या महिलेला न्यायही मिळवून दिला. कायद्याचे मार्गदर्शन करण्याबरोबरच झोपडपट्टीतील गरजू मुला-मुलींना त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन गरजेनुसार शैक्षणिक साहित्याचे वाटपही त्यांनी केले आहे. दुर्गम भागातून येणार्‍या शालेय मुलींसाठी सायकली भेट दिल्या. ज्यांना शाळेची फी भरणे शक्य नाही त्यांच्यासाठी शाळा व्यवस्थापनाला भेटून शालेय शुक्ल रद्द किंवा कमी करायला लावले. या कामांमुळे विद्या यांना मनापासून समाधान मिळते. पर्यावरणाबाबत अधिक जागरुक असलेल्या विद्या यांनी प्रदूषण नियंत्रणासाठी समाजातील विविध भागात जाऊन जनजागृती केली. लोकवस्तीत वृक्षारोपण केले, तर कमी दाबाने पाणीपुरवठा होणार्‍या ठिकाणी महानगरपालिका आयुक्तांना भेटून पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. शहरातील विविध ठिकाणी कचर्‍याचे ढीग पडून असायचे, अशावेळी आयुक्तांकडून कचरा कुंडीची व्यवस्था करण्यासाठी सतत पाठपुरावा केला. निस्वार्थपणे समाजसेवा करणार्‍या एकीकडे सामाजिक कार्य करत असताना दुसरीकडे त्यांनी आपलं महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण करून कायद्याची पदवी प्राप्त केली. गोरगरीब व खोट्या केसेसमध्ये अडकलेल्या गुन्हेगारांना स्वतःची पदरमोड करून त्यांनी न्याय मिळवून दिला. गेली १२ वर्ष म्हणजेच एक तप त्या लीगल एडमध्ये सक्रिय असून कल्याण येथील प्रथम वर्ग लोहमार्ग न्यायालयात त्या सेवा बजावत आहेत. अशा या नवदुर्गेला सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा!



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121