'ऑपरेशन अजय'अंतर्गत आतापर्यंत ९१८ भारतीय मायदेशी

    15-Oct-2023
Total Views |
operation-ajay-indians-being-evacuated-airlifted-from-israel-palestine-hamas-war

नवी दिल्ली :
इस्त्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष सुरू असून भारताने इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी 'ऑपरेशन अजय' हाती घेतले आहे. भारत सरकारने सुरू केलेले हे लष्करी ऑपरेशन असून ही मोहीम दि. ११ ऑक्टोबर २०२३ रोजी सुरू झाली. या मोहिमेद्वारे होणारा सर्व खर्च मोदी सरकार उचलत आहे.

दरम्यान, ‘ऑपरेशन अजय’च्या माध्यमातून इस्रायलमधून भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढले जात आहे. आतापर्यंत इस्रायलमधील हिंसाचारग्रस्त भागात राहणाऱ्या ९०० हून अधिक लोकांना भारतात आणण्यात आले आहे. इस्रायलमध्ये एकूण १८,००० भारतीय असून हिंसाचारग्रस्त भागातील लोकांना बाहेर काढले जात आहे.

तसेच, इस्रायलहून आलेल्या चौथ्या फ्लाइटच्या प्रवाशांचे केंद्रीय राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही के सिंग यांनी स्वागत केले. या फ्लाइटद्वारे २७४ लोक भारतात उतरले. यावेळेपर्यंत एकूण ९१८ लोक परतले आहेत. सर्व प्रवाशांसोबत पुढील प्रवासात समन्वय साधण्यासाठी त्यांच्या राज्यांतील शिष्टमंडळेही विमानतळावर सतत उपस्थित असतात, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली.