‘नॅशनल पॉलिसी स्टडीज इन द लाईट ऑफ एकात्म मानव दर्शन’ या इंग्रजी ग्रंथाचे प्रकाशन पुणे येथे दि. 18 ऑक्टोबर 2013 रोजी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते संपन्न झाले होते. समाजजीवनाच्या प्रमुख क्षेत्रातील समाजहितैषी मान्यवरांच्या प्रदीर्घ विचारमंथनातून हा ग्रंथ सिद्ध झाला. धारणक्षम विकास, समावेशक-समुचित विकास या विषयात रुची असणार्या सर्व विचारी कार्यकर्त्यांच्या छष्ठीने, या ग्रंथाच्या रुपाने एक मौल्यवान दस्तावेज उपलब्ध झाला आहे. याला आता दहा वर्षे होतील. दीनदयाळजींची एकात्म मानव दर्शनावरील मूळ व्याख्याने व दत्तोपंत ठेंगडींचे (पुण्यस्मरण दि. 14 ऑक्टोबर) ‘थर्ड वे’ (तिसरा पर्याय) हे संकलन यांचे विशदीकरण करून भांडवलशाही व कम्युनिझम यांना हा पूर्ण भारतीय पर्याय व तदअंतर्गत धोरणे यांची मांडणी केली आहे. त्यानिमित्ताने या महत्त्वपूर्ण व आधारभूत विषयाचा धांडोळा.
कासाची सर्वसमावेशक, समुचित आणि स्थायी संकल्पना कोणती, यावर जगभरातील विचारवंतांमध्ये निरंतर मंथन चालू आहे. व्यक्तिमात्राच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे, गरिबीचे उच्चाटन, संपत्तीचे न्याय्य-समतोल वाटप, सर्वांना रोजगार हे सामान्यपणे विकासाचे निकष मानले जातात. या निकषांवरही चर्चा होऊ शकते. परंतु, तूर्त ते योग्य निकष आहेत, असे मानले तरीही जगातल्या कोणत्याही देशात त्यानुसार ’परिपूर्ण’ विकास साध्य झालेला दिसत नाही. जिथे भौतिक प्रगतीने वेगवान वाटचाल केली, त्या पश्चिमी देशांमध्येही विकासाचे आणि त्याविषयीच्या समाधानाविषयीचे प्रश्न सुटलेले माहीत. किंबहुना, ते अधिक जटिल बनलेले दिसतात. त्याशिवाय पर्यावरणाच्या असंतुलनासारखे काही नवे प्रश्रही उभे राहिलेले आहेत.
गेल्या विसाव्या शतकाचा विचार करायचा झाला, तर विकासविषयक धडपडीमागील दृष्टिकोनाची स्थूलरुपाने दोन प्रकारात विभागणी करता येईल ः 1) साम्यवाद/समाजवादप्रणित विचारप्रणाली आणि 2) भांडवलप्रधान प्रणाली. विशेषतः महायुद्धानंतरचे जग या दोन प्रणालींच्या (काही सूक्ष्म छटांच्या विविध प्रकारांत) दरम्यान विभागले गेले. दृष्टिकोनाचा थेट संबंध आर्थिक संरचनेशी असला तरी त्याच्या नैष्ठिक आगारातून राजकीय-सामाजिक भेदविभेद स्वाभाविकपणे निर्माण झाले. याच भेदविभेदांच्या भोवती आंतरराष्ट्रीय स्तरावरील विचार तसेच राष्ट्राराष्ट्रांमधील परस्पर संबंधांचे धागे, ताणतणाव यांचे विश्व उभे राहिले. शतकाची अखेर होता-होता साम्यवादाचा डोलारा कोसळत गेला आणि उदारीकरण, अगतिकीकरण, खासगीकरण अशी लेबलं लावून ’आर्थिक सुधारांचा’ अर्थातच भांडवल प्रधानतेचा जमाना गाजावाजा करीत आला. ‘महाकाय’ अर्थव्यवहारावर (Macroeconomics) सर्वात जास्त भर दिला जाऊ लागला. ‘मल्टीनॅशनल’, ‘ग्लोबल’ या शब्दांना विशेषतः उद्योग आणि अर्थव्यवहारांच्या संदर्भात सर्वात ठळक महत्त्व प्राप्त होऊ लागले.
मात्र, जितक्या वेगाने हा महाकायतेचा फुगा फुगत गेला, तितक्या अल्पावधीतच त्यातील हवा विरत जाऊ लागली. अमेरिकेत आणि पाठोपाठ युरोपमध्ये आर्थिक संकटाचे काडे ढग दाटून आले. या संकटांनी केवळ त्या देशांच्याच नव्हे, तर जगभरातल्या अर्थव्यवस्थांना डळमळीत केले. एकविसावे शतक सुरू झाले, ते साम्यवादापाठोपाठ भांडवलवादावरही प्रश्नचिन्ह उमटवून!या पार्श्वभूमीवर जगभरातील विकासाचे शोधयात्री आता समुचित विकासाच्या तिसर्या पर्यायाचा शोध घेऊ लागले आहेत. ’एकात्म मानव दर्शन’ या नावाने एकत्र येणार्या मुंबई आणि पुण्यातल्या कार्यकत्यांच्या एका समूहाने 2000 सालच्या प्रारंभापासूनच, या विषयीच्या स्थिरचित्त विचारमंथनाला सुरुवात केली. या उपक्रमाच्या शीर्षकातूनच त्यामागील वैचारिक बैठक कोणती आहे, हे निश्चित होते. पंडित दीनदयाळ अध्याय यांनी 50-55 वर्षांपूर्वी ’एकात्म मानव दर्शन’ या नावाचे, भारतीय चिंतनावर आधारलेले, अर्थरचनेचे एक प्रारूप मांडले. मात्र, या प्रारुपाचा अधिक विस्तार करण्यापूर्वी आणि त्याविषयीच्या व्यापक विचारमंथनाला चालना देण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वीच दीनदयाळजींची हत्या झाली. तरीही त्यांनी मांडलेल्या चिंतनाचे स्वरूप कालोचित आणि समग्र विकासाच्या संकल्पनेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असण्यावर दृढ विश्वास ठेवणार्यांनी, त्या चिंतनाचा पाठपुरावा विविध स्तरावर सुरूच ठेवला होता.
याच प्रयत्नाचे सूत्र हातात घेऊन ’एकात्म मानव दर्शन’ याच नावाने एकत्र चिंतन करण्याची प्रक्रिया रवींद्र महाजन, डॉ. कुलकर्णी (आयआयटी मुंबईच्या धातुशास्त्र विभागाचे निवृत्त प्रमुख), ‘एनआरबी’ कंपनीचे माजी संचालक नाना लेले, ‘राटा इकोनॉमिक कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’मधील निवृत्त अधिकारी अलाटे, ‘अग्रीकल्चरल फायनान्स कॉर्पोरेशन’चे माजी कार्यकारी संचालक प्रमोद क्षीरसागर, ‘नाबार्ड’मधून अधिकारीपदावरून निवृत्त झालेले अनिल जवळेकर, ‘रिझर्व्ह बँके’चे निवृत्त अधिकारी सुहास बाक्रे, भारतीय मजदूर संघाचे अशोक भिडे इत्यादी समाजप्रेमी व्यक्तींनी सलग दहा-बारा वर्षे चालविली.
पंडित दीनदयाळजींच्या ‘एकात्म मानव दर्शना’च्या समर्थकांवर नेहमीच एक आक्षेप नोंदवला जातो. समाजरचना आणि आर्थिक संरचनेविषयीचे तत्त्वज्ञान तर या दर्शनात लिहिले गेले आहे. मात्र, व्यवस्थेच्या स्तरावर ते व्यवहारात कसे उतरवायचे, त्याच्या आधारावर व्यवस्था कशी उभी करायची, याचा मात्र निर्देश त्यात नाही. या (तथाकथित) त्रुटीवर मात करणे, याच उद्देशाने दहा-बारा वर्षे प्रदीर्घ विचारमंथन करण्यात आले आणि या मंथनातून समाजाच्या व्यवस्थात्मक रचनेविषयीच्या धोरणात्मक आखणीचे मसुदे तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. शिक्षण, उद्योग, कृषी, सेवाक्षेत्र, विज्ञान-तंत्रज्ञान, प्रशासन, सुरक्षा, परराष्ट्र संबंध, कामगार, सहकार, आर्थिक विकास अशा सर्व महत्त्वपूर्ण क्षेत्रांविषयीची राष्ट्रीय धोरणे (National Policies) काय आणि कशी असावीत, यांचे मसुदे (Drafts) सखोल विचारांती तयार करण्यात आले.
धोरणनिश्चिती विषयीच्या या चिंतन-प्रक्रियेचे आणखी एक वैशिष्ट्य नमूद करायला हवे. दहा-बारा जणांच्या समूहाने नियमितपणे आणि वारंवार एकत्र येऊन सखोल चर्चा केली. त्यातून सर्वांच्या विचारांती एकेका विषयाच्या धोरणाचे मसुदे क्रमशः विकसित करण्यात आले. आवश्यकतेनुसार, त्यात पुन्हा पुन्हा भर घालण्यात आली, दुरुस्ती करण्यात आली. एवढेच नव्हे तर तयार करण्यात आलेले, हे मसुदे विविध क्षेत्रांतील अनेक तज्ज्ञ विचारवंतांमध्ये वितरित करण्यात आले. त्यावरील त्यांची मते घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात आला. थोडक्यात, या विचारमंथनाच्या प्रक्रियेत विविध विचारधारांच्या विचारी मान्यवरांना समाविष्ट करून होण्यात पुढाकार घेतला गेला. समाजधारणेची आणि विविध क्षेत्रांची स्वदेशानुकूल संरचना सामूहिक विचारमंथनातून विकसित केली जावी, याचा असा सघन आणि प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला. या प्रदीर्घ, विस्तृत आणि सखोल विचारमंथनाचे फलित (NATIONAL POLICY STUDIES in the light of EKATMA MANAV DARSHAN) हे पुस्तक आहे.
सामाजिक व्यवहारात स्थिरता, प्रगती आणि सुव्यवस्थित-समुचित स्थिती निर्माण करण्याच्या कामी शासकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेची भूमिका प्रमुख आणि महत्त्वपूर्ण असते. त्यामुळे दोन्ही क्षेत्रांतील (राजकीय आणि प्रशासनिक) विद्यमान स्थितीच्या चिकित्सक विश्लेषणातूनच इष्ट, त्या व्यवस्था परिवर्तनाची दिशा सुनिश्चित करते. एकात्म मानव दर्शनातील प्रत्येक धोरणाची आखणी करताना, अशाच क्रमाने मांडणी करण्यात आली आहे. त्या-त्या विशिष्ट क्षेत्राची एकूण राष्ट्रीय संरचनेतील भूमिका, त्या क्षेत्राची विद्यमान परिस्थिती, गेल्या हजारो वर्षांत विकसित झालेली, त्या क्षेत्रातील परंपरा तसेच त्या क्षेत्राच्या राष्ट्रीय विकासातील योगदानाचा सम्यक विचार मांडण्यात आला आहे.
बदलती जागतिक-राष्ट्रीय परिस्थिती आणि विकासाविषयीच्या भविष्यवेधी आकांक्षा या दोन्हींच्या पार्श्वभूमीवर, त्या क्षेत्राची कालसंगत रचना कशी असावी, याबाबतच्या विचारविमर्शावर भर देण्यात आला आहे आणि त्यातून त्या विशिष्ट क्षेत्राची युगानुकूल आणि स्वदेशानुकूल रचना कशी असावी, याबाबतची चर्चा करून धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, या सार्या विचारमंथनाला आधार आहे-तो पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी केलेल्या ‘एकात्म मानव दर्शनविषयक मूलभूत चिंतनाचा.’ दीनदयाळजीप्रणित या चिंतनाचे वैशिष्ट्य हे की, त्यात मनुष्यमात्राच्या स्वास्थ्याचा केवळ भौतिक अंगाने नव्हे तर इंद्रिय, मन, बुद्धी आणि आत्मा या चारही पैलूंचा समग्र, एकात्मिक विचार सामाविष्ट आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या भारतीय तत्त्वज्ञानप्रणित चतुर्विध पुरुषार्थाच्या समुचित आणि सर्वंकष विचारावर एकात्म जीवनदर्शन आधारित आहे.
जगावर शतकभर अधिराज्य गाजवू पाहणार्या दोन्ही प्रमुख विचारधारा समग्र आणि समुचित विकास साध्य करण्याच्या कामी पराभूत होत असताना आणि जगभरातील विचारवंत विकासाच्या संकल्पनेबाबत, अधिक चांगल्या पर्यायाच्या शोधात असताना, हा ग्रंथ प्रकाशित झाला आहे, ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. स्थायी, समतोल आणि धारणक्षम विकासाच्या प्रक्रियेच्या शोधात असणार्या सर्व विचारवंत, कार्यकत्यांच्या दृष्टीने हा ग्रंथ हा अतिशय महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे.
(NATIONAL POLICY STUDIES in the light of EKATMA MANAV DARSHAN) Editor: Ravindra Mahajan, pp542, Rs 500/-
(Presented by- Ekatma Prabodh Mandal, Munbai; Publisher: Centre for Integral Studies and Research, Pune; Distributor: Bharatiya Vichar Sadhana, Pune;ठ
email: cisrpune@gmail.com