मुंबई : "सनातन कधी संपणार नाही, तो सर्वत्र राहतो. तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. सनातनच्या आधारे जग चालते. सनातनचा नाश करणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे आहे."; असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी हरियाणा येथे केले. गुरुवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी रोहतकमधील बाबा मस्तनाथ मठात ब्रह्मलिन महंत चाँदनाथ योगी यांच्या स्मरणार्थ शंखढाल आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान मंचावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, योगगुरु स्वामी रामदेवबाबा यांच्यासह इतर संत आणि मान्यवर उपस्थित होते.
सरसंघचालक यावेळी म्हणाले की, "सनातन हेच हिंदूराष्ट्र आहे. आपली संपूर्ण संस्कृती यात तत्त्वावर आधारित आहे. आज कार्यक्रमस्थळी एकत्रित झालेले विविध पंथ हे आपल्या सनातन अस्तित्वाचेच स्वरूप आहे. सनातनच्या जोरावरच आजवर जग चालत आले आहे. ते यापुढेही चालत राहिल. जेव्हा कोरोनाचे संकट आले तेव्हा आपला संपूर्ण देश संघटित होऊन उभा राहिला. त्याचप्रमाणे सनातनप्रती जागृत होऊन आता आपल्याला संघर्ष करावा लागेल."
सनातनसाठी लोककल्याण आणि राष्ट्रकल्याण हे सर्वोपरि!
जगात शांततेची हमी देणारा असा सनातन धर्म आहे. त्यामुळे केवळ सनातन धर्म आणि भारतच जागतिक शांततेची हमी देऊ शकतात. संत शक्ती कधीच पळून जात नाही, आव्हानांना सामोरे जाण्याचे धैर्य त्यांच्यात असते. प्रतिकूल परिस्थितीत संयम न गमावता काम करणे आवश्यक आहे. कारण त्याचा मूळ उद्देश लोककल्याण, सनातन धर्माचे बळकटीकरण आणि राष्ट्रकल्याण हे आहे. अयोध्येत भव्य अशा श्री राम मंदिराचे निर्माणकार्य सुरू आहे. भारत आणि सनातन धर्माने ते शक्य करून दाखवले आहे. सनातनची पुनर्स्थापना करणे हे सर्व धर्म आणि पंथांचे उद्दिष्ट आहे. सनातनसाठी लोककल्याण आणि राष्ट्रकल्याण हे सर्वोपरि आहे. सनातन कधीही जात, धर्म, पंथ यांच्या आधारावर भेदभाव करत नाही.
- योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश