राहुल गांधी अन विरोधकांनी मोदींसह देशाची माफी मागावी!

    03-Jan-2023
Total Views |
   

राहुल गांधी अन विरोधकांनी मोदींसह देशाची माफी मागावी!
नोटबंदी बाबतच्या निर्णयावर विश्वास पाठक यांची पत्रकार परिषद
मुंबई : नोटाबंदीची संपूर्ण प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवल्यानंतर सातत्याने देशात आणि परदेशात नोटाबंदीविरोधात मोहीम चालवणा-या विरोधकांना भाजपकडून घेरण्यात येत आहे. नोटबंदीवरून देशाची दिशाभूल करणाऱ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आगपाखड करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यासह विरोधकांनी देशाची माफी मागायला हवी,' अशी मागणी राज्य वीज कंपन्यांचे स्वतंत्र संचालक व भाजपचे नेते विश्वास पाठक यांनी केली आहे. मंगळवार, दि. ३ जानेवारी रोजी मुंबईतील भाजपच्या प्रदेश मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत विश्वास पाठक बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बबन चौधरी, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये व प्रवक्ते गणेश हाके उपस्थित होते.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. नोटाबंदीच्या संदर्भात घेण्यात आलेला निर्णय वैध होता असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. नोटाबंदीच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या विरोधकांना सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने मोठा झटका बसला असून भाजपने देखील यावर संधी साधत काँग्रेस सह इतरांवर निशाणा साधला आहे.
 
विश्वास पाठक म्हणाले की, ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घोषित केल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व कम्युनिस्ट नेत्यांनीही त्या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, नंतर याच मंडळींनी नोटबंदीच्या विरोधात विधाने करायला सुरुवात केली होती. मात्र, विरोधकांनी केलेल्या दाव्यांमध्ये काहीही तथ्य नव्हते ते न्यायालयाने दिलेल्या निर्णयातून स्पष्ट झाले आहे असे पाठक यांनी म्हटले आहे.
 
 
'सर्वोच्च न्यायलयाने नोटाबंदीच्या निर्णयप्रक्रियेत कोणत्याही स्वरुपाच्या त्रुटी नसून तो निर्णय वैध ठरवला आहे. या निकालावरून पंतप्रधान मोदी कुठलाही निर्णय बेजबाबदारपणे, घाईघाईत घेत नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यांनी पूर्ण विचारांती व कायदेशीर प्रक्रीयेचे पालन करत नोटाबंदीचा निर्णय घेतला होता यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. या निर्णयामुळे बनावट चलन, काळा पैसा, कर चोरीला आळा बसला ,कॅशलेस व डिजिटल व्यवहार वाढले, दहशतवाद्यांचा निधीपुरवठा तोडला गेल्याने काश्मीरमध्ये होणारी दगडफेक थांबली आहे. या निर्णयानंतर देशाची अर्थव्यवस्था ३ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढली आहे. आता रिक्षावाला, चहावाला देखील डिजिटल व्यवहार करू लागला आहे.१२ लाख कोटींची उलाढाल डिजिटल व्यवहारातून होत आहे.' असे म्हणत त्यांनी नोटबंदीमुले झालेल्या सकारात्मक परिणामांचा पाढाच वाचून दाखवला आहे.
 
'अर्थसंकल्पाचा आकार १५ लाख कोटींवरून ४० लाख कोटींवर पोहोचला. त्यावेळी जगात ११ व्या स्थानावर असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेने आज ५ व्या क्रमांकावर उसळी मारली आहे. प्रत्यक्ष कर न वाढवता अर्थव्यवस्थेने ही लक्षणीय कामगीरी केली आहे, याचे श्रेय नोटाबंदीलाच द्यावे लागेल. महत्त्वाची बाब म्हणजे नोटाबंदीचा निर्णय रिझर्व्ह बँकेशी सल्लामसलत करुनच घेण्यात आला होता हे घटनापीठाने नमूद केले आहे,' असेही पाठक यांनी म्हटले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.